अस्मिताच आपली खरी ओळख असते
By Admin | Updated: June 15, 2014 00:41 IST2014-06-15T00:41:38+5:302014-06-15T00:41:38+5:30
माझी श्रद्धा माझ्या विचारांवर, माणुसकीवर आणि माझ्या कामावर आहे. काम चांगले असले पाहिजे, कुणाचेतरी दु:ख दूर करणारे असले पाहिजे, हाच माझा आग्रह आहे. खूपच सोपे आहे सगळे. मी अमूकवादी की

अस्मिताच आपली खरी ओळख असते
अनिल अवचट : अनुभूती सांस्कृतिक महोत्सवात प्र्रगट मुलाखत
नागपूर : माझी श्रद्धा माझ्या विचारांवर, माणुसकीवर आणि माझ्या कामावर आहे. काम चांगले असले पाहिजे, कुणाचेतरी दु:ख दूर करणारे असले पाहिजे, हाच माझा आग्रह आहे. खूपच सोपे आहे सगळे. मी अमूकवादी की तमूकवादी असा प्रश्न बरेच लोक करतात पण मला हा शब्दच पटत नाही. कट्टरतेची मला भीतीच वाटते. कट्टरता कुठलीही असो, ती वाईटच. आपली अस्मिताच महत्त्वाची असते, ती जपता आली पाहिजे. कारण आपली अस्मिताच आपली खरी ओळख असते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले.
अनुभूती सांस्कृतिक महोत्सवात आज डॉ. अनिल अवचट यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत अजेय गंपावार यांनी घेतली. हा कार्यक्रम चिटणवीस सेंटर, सिव्हील लाईन्स येथे पार पडला. अवचट म्हणाले, कट्टर असणे म्हणजे आपल्या विचारांवर, दृष्टीवर झापड लावून घेण्यासारखे आहे. हा संकुचितपणा मला जमलाच नाही. लोक गरीब आणि श्रीमंत असा भेद करतात. समाजात ते दिसतेही. पण यातील माणूस महत्त्वाचा नाही का? तोच हरवतोय असे वाटतेय. प्रादेशिक ताही मला मान्य नाही. हा देश आपला आहे आणि सगळीकडेच माणसे राहतात ना. ती नाही का दिसत आपल्याला. त्यामुळेच विदर्भ, महाराष्ट्र असल्या सीमांमध्ये मी फारसा अडकत नाही, बरे आहे बुवा तेच. काही गोष्टी आपल्याला जमत नाहीत ना, त्या करूच नये म्हणजे आपण आनंदी राहतो, असे ते म्हणाले. पण जे आपण करू शकतो, जे चांगले आणि समाजाला उपकारक असेल, ते मात्र चांगल्या पद्धतीने करता यावे म्हणून विचार करायला हवा.
डॉक्टर वगैरे होण्याचे माझे इतरांसारखे स्वप्न नव्हते. मनासारखे वागायला आवडत होते. वडिलांचा आग्रह म्हणून डॉक्टर झालो. मनात मत्सर नसला तर मनही दगा देत नाही. राम मनोहर लोहिया विचारांसाठी प्राण देऊ शकतात तर आपण आपल्या विचारांसाठी जगूही शकत नाहीत का, असा प्रश्न युवावस्थेतच मनात आला. भावनाविहीन आणि संवेदना नसलेल्यांना माणूस कसे म्हणायचे. अशाच समविचारी युवकांचा युक्रांत नावाचा समूह तयार झाला. यातून नंतर चळवळच उभी राहिली. बिहार आणि तिथल्या कुपोषणाविषयी लघुपट पाहिला आणि तिकडे वळलो. बेबंद सरंजमशाही व्यवस्थेत कुपोषणात पिचल्या जाणारा समाज पाहिला. वेदना झाल्या, हादरून गेलो. दृष्टीच या घटनेने बदलली. पोटात अन्न नसले तर औषधही काम करीत नाही. अभिव्यक्त होण्यासाठी लिहायला लागलो. आधीच समाजाच्या दृष्टीने वेडा आणि त्यात लिहायला लागलो. पण माझ्यासारख्या वेड्यांना ते आवडायला लागले. लिखाणातून अनेक विषय आणि वास्तव लोकांपर्यंत पोहोचवित राहिलो. राम पटवर्धन यांनी या वास्तववादी लेखनाला प्रोत्साहन दिले. त्यांच्यामुळेच माझे लिखाण होत राहिले, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)