काव्यसौंदर्याने नटलेला ‘असेन मी नसेन मी’
By Admin | Updated: June 16, 2014 01:12 IST2014-06-16T01:12:38+5:302014-06-16T01:12:38+5:30
मराठी साहित्यातील अग्रगण्य लेखिका, कवयित्री शांताबाई शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे ‘असेन मी नसेन मी’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

काव्यसौंदर्याने नटलेला ‘असेन मी नसेन मी’
पद्मगंधा प्रतिष्ठान : कवयित्री शांता शेळके स्मृती कार्यक्रम
नागपूर : मराठी साहित्यातील अग्रगण्य लेखिका, कवयित्री शांताबाई शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे ‘असेन मी नसेन मी’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शांताबार्इंसारख्या विलक्षण प्रतिभावंत व प्रज्ञावंत व्यक्तिमत्त्वाचा वेध त्यांच्याच साहित्य कृतीतून घेणाऱ्या या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती पद्मगंधाच्या अध्यक्षा शुभांगी भडभडे यांची होती. या कार्यक्रमात काव्यसौंदर्याने रसिकांना आनंद दिला. हा कार्यक्रम पद्मगंधा प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक श्यामकांत कुळकर्णी, उज्ज्वला अंधारे यांनी शांताबार्इंच्या लेख व कवितांचे अभिवाचन केले. वीणा कुळकर्णी, विद्या नामजोशी, पल्लवी राजदेरकर यांनी त्यांच्या लोकप्रिय गीतांचे भावपूर्ण सादरीकरण करून रसिकांना आनंद दिला. ६ जून २००२ साली शांताबार्इंचे निधन झाले. पण त्यांच्या कविता मात्र रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आहेत. त्यांच्या सुमधुर गीतांमुळे त्या घराघरांत प्रिय झाल्यात. प्रास्ताविकासह वर्षा देशपांडे यांनी शांताबाईच्या अफाट साहित्य कर्तृत्वाचा उपस्थितांना परिचय करून दिला.
शांताबार्इंची सार्वत्रिक ओळख एक प्रतिभावंत कवयित्री असली तरी त्या उत्तम लेखिकाही होत्या. त्यांना रविकिरण मंडळाचे आकर्षण, कवी माधव ज्युलियन या आवडत्या कवीचा आदर्श आणि अंगभूत प्रतिभा यामुळे शांताबार्इंच्या मनातील शब्द व स्पर्श यांच्याबद्दलच्या अबोध आकर्षणावर प्रकाश टाकणाऱ्या कवितांचे वाचन रसिकांना अंतर्मुख करणारे होते. शब्द म्हणजे असतात केवळ बेटे, पाण्याने वेढलेली, एकमेकांपासून तुटलेली अशा त्यांच्या ओळींसह या भाववेड्या हळव्या कवयित्रीच्या मनोव्यथांना कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले.
‘असेन मी नसेन मी...फुलाफुलात येथल्या उद्या हसेल गीत हे...’ या शांताबार्इंच्या स्वलिखितावर प्रकाश टाकणाऱ्या सादरीकरणाने रसिकांची दाद घेतली. श्यामकांत कुळकर्णी यांनी शांताबार्इंच्या अपरिचित लेखनाबद्दल माहिती दिली.
वीणा कुळकर्णी, विद्या नामजोशी, पल्लवी राजदेरकर या हौशी गायकांनी काही गीते सादर करून या कार्यक्रमात रंग भरला.
गायिकांना पल्लवी राजदेरकर यांनी संवादिनीवर तर कांचन घाटोळे यांनी तबल्यावर साथसंगत केली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात साहित्य रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)