इंदिरांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहिलेले अरविंद नेताम संघस्थानी प्रमुख अतिथी
By योगेश पांडे | Updated: June 4, 2025 21:22 IST2025-06-04T21:21:57+5:302025-06-04T21:22:29+5:30
अखिल भारतीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा आज रेशीमबागेत समारोप : सरसंघचालक करणार मार्गदर्शन

इंदिरांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहिलेले अरविंद नेताम संघस्थानी प्रमुख अतिथी
योगेश पांडे
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा गुरुवारी रेशीमबाग मैदानावर समारोप होणार आहे. या २५ दिवसीय वर्गाच्या समारोपप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. तर माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
नेताम हे इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री तर पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात कृषी राज्यमंत्री मंत्री होते. २०२३ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत छत्तीसगडमध्ये ‘हमार राज’ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर संघस्थानी येणारे ते कॉंग्रेसशी संबंधित दुसरे मोठे नेते ठरणार आहे.
नागपुरात २२ मे रोजी कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचे उद्घाटन झाले होते. यात देशातील विविध भागातील ८४० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या वर्गाच्या समारोपप्रसंगी संघाकडून नामांकित व्यक्तीला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात येते. २०१८ साली प्रणव मुखर्जी या कार्यक्रमाला आले होते व त्यावरून कॉंग्रेसमधून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले होते. यंदाच्या कार्यक्रमासाठी संघाकडून नेताम यांना निमंत्रण देण्यात आले व त्यांनी त्याचा स्वीकार केला. नेताम हे कॉंग्रेसच्या मुशीतून घडलेले नेते आहे. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर भागातील नेते असलेले नेताम हे इंदिरा गांधी तसेच पी.व्ही.नरसिंहराव यांच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री होते. आदिवासी नेते अशी ओळख असलेल्या नेताम यांनी २०२३ मध्ये कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली व हमरा राज नावाचा पक्ष स्थापन केला होता. ते संघस्थानी येणार असल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सरसंघचालक काय बोलणार?
दरम्यान ऑपरेशन सिंदूर व जातीआधारित जनगणनेची घोषणा या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरसंघचालक काय भाष्य करणार याकडे सामाजिक व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषत: जातीआधारित जनगणनेचे संघाने स्वागत केले असले तरी आकडेवारी गोळा करण्यासाठी ही प्रक्रिया योग्य आहे अशी भूमिका मांडण्यात आली होती.