विधान परिषदेवरील नियुक्त्या घटनाबाह्यच
By Admin | Updated: June 12, 2014 01:06 IST2014-06-12T01:06:16+5:302014-06-12T01:06:16+5:30
एकूणच समाजात अविवेकी, धर्मद्वेषी, असहिष्णू, सांप्रदायिक व अत्याचारी शक्तींनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. पुण्यातील अभियंत्याची हत्या, दाभोलकरांचा खुनी न गवसणे, दलितांवरील अत्याचार,

विधान परिषदेवरील नियुक्त्या घटनाबाह्यच
नागपूर : एकूणच समाजात अविवेकी, धर्मद्वेषी, असहिष्णू, सांप्रदायिक व अत्याचारी शक्तींनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. पुण्यातील अभियंत्याची हत्या, दाभोलकरांचा खुनी न गवसणे, दलितांवरील अत्याचार, स्त्रियांवरील बलात्कार अशा घटनांत सातत्याने वाढ होते आहे. यामागे समतेच्या अधिष्ठानावर कारभार न चालणे आणि समाजातली सांस्कृतिक जाण कमी होणे आहे. यामुळेच असांस्कृतिक वातावरण निर्मिती झाली आहे आणि हिंसक वृत्ती निर्माण होते आहे. या मुद्यांकडे लक्ष दिले जावे आणि समाजातील प्रतिभावंतांची मते लक्षात घ्यावी म्हणून घटनेने विधान परिषदेवर प्रतिभावंत, तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचे अधिकार राज्यपालांना दिले आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून या जागांवर राजकीय नेत्यांचीच वर्णी लागते आहे.
यंदाही विधान परिषदेवर करण्यात आलेल्या नियुक्त्या या घटनाबाह्य असून यासंदर्भात अनेकदा निवेदन दिल्यावरही शासनाने घटनाबाह्य नियुक्त्या करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. ही घटनेचा अवमान करणारी बाब असून याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने घेतला आहे. आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शासनाने धर्म, संप्रदाय, संस्कृती यातील विवेक, सहिष्णुता आणि प्रागतिक मूल्यांशी संपर्कच तोडला आहे. राज्याच्या निर्मितीपासून विधान परिषदेवर आतापर्यंत राज्यपालांच्या अधिकारातील १२ नियुक्त्या राज्यघटनेचा भंग करूनच करण्यात आल्या आहेत. घटनेत समाज, साहित्य, संस्कृती, शिक्षण, सहकार या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांसाठी राखीव जागांवर राजकारण्यांनीच डाव साधला. यामुळे या क्षेत्रातील नियुक्त्यांच्या संदर्भाच मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. या बाबीकडे मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे लक्ष आघाडीने वेधले आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात आघाडीच्यावतीने न्यायालयाच जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली आहे.
या बैठकीला विलास भोंगाडे, किशोर दिवेकर, डॉ. चंद्रभान भोयर, रवींद्र फडणवीस, विलास जांभुळकर, प्रकाश दुलेवाले, शरद ठाकरे, ज्ञानेश्वर वांढरे, अरुण वनकर, अरुण लाटकर, योगेश ठाकरे, परसराम राऊत, अॅड. अविनाश काळे आदी अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)