Sharad Pawar: त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटणं अयोग्य; शरद पवारांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 17:03 IST2021-11-17T17:03:24+5:302021-11-17T17:03:48+5:30
हिंसाचाराच्या घटनेनं प्रभावित झालेल्या व्यापारी आणि उद्योजकांना मदत देण्यासाठी सरकारने धोरण तयार करण्याची गरज आहे असं मत शरद पवारांनी मांडले आहे.

Sharad Pawar: त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटणं अयोग्य; शरद पवारांनी व्यक्त केली खंत
नागपूर - त्रिपुरात काही घडले त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटणे ही अयोग्य बाब आहे. ज्याप्रमाणे कायदा हातात घेण्यात आला व हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काही राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले ते चुकीचेच होते. त्रिपुरात काही झाले यात दुकानदार, व्यापाऱ्यांची काय चूक? त्यांना किंमत मोजायला लागली. अशा निष्पाप दुकानदार, व्यापाऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात का होईना, पण भरून देण्यासाठी सरकारने मदत धोरण तयार करावे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मांडले आहे.
शरद पवार(Sharad Pawar) नागपुरातील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी पवार म्हणाले की, अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाली होती. समस्या कुठली असो आणि त्यावर रिएक्शन होणे योग्य नाही. काही लोकांनी कायदा हातात घेतला. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जावी. अशा हिंसाचाराचा सर्वात वाईट परिणाम हा व्यवसाय आणि उद्योगांवर होतो. या दोन्ही क्षेत्रांचा दंगलीसोबत काहीही संबंध नाही मात्र सर्वाधिक फटका त्यांना सहन करावा लागतो असं त्यांनी सांगितले.
तसेच प्रभावित झालेल्या व्यापारी आणि उद्योजकांना मदत देण्यासाठी सरकारने धोरण तयार करण्याची गरज आहे. कुठलंही सरकार १०० टक्के मदत करू शकत नाही. पण पॉलिसीत सुधार करण्याची आवश्यकता असल्याचंही पवारांनी सांगितले.
नितीन गडकरींचं कौतुक तर देवेंद्र फडणवीसांचा टोला
प्रादेशिक असमतोलामुळे काही भागातील विकासाला चालना मिळू शकली नाही. प्रत्येक भागाचा विकास करणे ही राज्य चालविणाऱ्यांची जबाबदारी असते. अनेकदा नेते जेथून येतात त्या भागाचा जास्त विकास होतो. पाच वर्षात विदर्भातील नेतृत्व असून देखील उद्योग क्षेत्राच्या समस्या दूर होऊ शकल्या नाही. त्या समस्या तेव्हाच सोडविल्या जाऊ शकत होत्या. नेतृत्वात विकासदृष्टी हवी अशा शब्दात शरद पवारांनी उल्लेख न करता देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis)टोला लगावला. तर दुसरीकडे केंद्र सरकारमध्ये काही पक्ष, प्रांत यांचा विचार न करता पूर्ण देशाच्या विकासाचा विचार करतात. संसदेत कुणाचीही समस्या दूर करण्याची इच्छा दाखविणारे कमी मंत्री आहेत, त्यात नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांचे नाव अग्रक्रमाने येते. प्रत्येक समस्यांचे निवारण त्यांच्याकडे आहे. ते एक असे व्यक्ती आहेत की जे बघत नाहीत, की समोरचा व्यक्ती हा कुठल्या पक्षाचा आहे. त्यांच्या समोर समस्या आल्यात की त्याचा तोडगा ते काढणार अशा शब्दात पवारांनी नितीन गडकरींचं कौतुक केले आहे.