जातनिहाय जनगणनेतूनच समाजाचा सर्वांगिण विकास अपेक्षित, संघाच्या प्रचारप्रमुखांची भूमिका
By योगेश पांडे | Updated: December 21, 2023 18:48 IST2023-12-21T18:47:21+5:302023-12-21T18:48:02+5:30
दोन दिवसांअगोदर हिवाळी अधिवेशनानिमित्त रेशीमबागेत पोहोचलेल्या भाजप व शिवसेनेच्या आमदारांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

जातनिहाय जनगणनेतूनच समाजाचा सर्वांगिण विकास अपेक्षित, संघाच्या प्रचारप्रमुखांची भूमिका
नागपूर : जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून राजकारण परत तापत असल्याचे दिसून येत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखेर याबाबत ठोस भूमिका मांडली आहे. जातनिहाय जनगणनेतून समाजाचा सर्वांगिण विकास अपेक्षित आहे. मात्र असे करत असताना देशातील सामाजिक सद्भाव, अखंडता व सामाजिक समरसतेला धक्का लागणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनिल आंबेकर यांनी केले.
दोन दिवसांअगोदर हिवाळी अधिवेशनानिमित्त रेशीमबागेत पोहोचलेल्या भाजप व शिवसेनेच्या आमदारांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर बोलताना विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी जातीव्यवस्था कालबाह्य आहे. जर जनगणनेमुळे विषमता व तेढ वाढत असेल तर त्याची गरज नाही. समाजात सामाजिक समरसता वाढली पाहिजे यावरच भर द्यायला हवा, असे म्हटले होते. यावरून काही राजकीय पक्षांनी संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे अशी भूमिका मांडली होती. देशातील काही राज्यांत यावरून विविध दावे-प्रतिदावे करण्यात येत असताना अखेर सुनिल आंबेकर यांनी संघाची अधिकृत भूमिका मांडली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारचा भेदभाव व विषमतेपासून मुक्त तसेच समरसता व सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाजाला डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. विविध ऐतिहासिक कारणांमुळे समाजातील अनेक घटक आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिले. त्यांचा विकास आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने विविध शासनांकडून वेळोवेळी अनेक योजना राबविण्यात येत आहेत व संघाचे या पुढाकाराला समर्थन आहे. मागील काही काळापासून जातनिहाय जनगणनेची चर्चा परत सुरू झाली आहे. मात्र याचा उपयोग समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी झाला पाहिजे, असे संघाचे स्पष्ट मत असल्याची भूमिका आंबेकर यांनी मांडली.