‘त्या’ निराधर कुटुंबांना हवाय आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:35+5:302021-06-20T04:07:35+5:30
काटोल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा काटोल तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. अनेकांचे सुखी संसार उद्ध्वस्त झाले. तालुक्यात ४० कुटुंब अशी ...

‘त्या’ निराधर कुटुंबांना हवाय आधार
काटोल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा काटोल तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. अनेकांचे सुखी संसार उद्ध्वस्त झाले. तालुक्यात ४० कुटुंब अशी आहेत की, त्यांच्या घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या विधवा पत्नीवर आली आहे. त्यामुळे या निराधार महिलांना आता आधाराची गरज आहे. शासनाकडून अशा महिलांची माहिती गोळा केली जात आहे. मात्र सरकारने अशा महिलांसाठी संजय गांधी निराधार योजनेव्यतिरिक्त कोणत्याही लाभाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे या निराधारांना स्वत:च्या पायावर उभे होण्याकरिता शासनाने बळ देण्याकरिता पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
गत दीड वर्षापासून कोरोनाच्या लाटेमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र बिघडले आहे. लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेला. काहींची जमापुंजी खर्च झाली. कुणावर उपासमारीची वेळ आली तर कुणाचा आयुष्यभराचा आधार अचानक निघून गेला. तालुक्यात आतापर्यंत ९,७०० जणांचा कोरोनाची लागण झाली. यातील ९,५२९ कोरोनामुक्त झाले आहेत. १५५ रुग्णांचा जीव गेला. यामध्ये कुणाची पत्नी, कुणाचे आई-वडील तर कुणाच्या एकुलत्या एक मुला-मुलींचाही समावेश आहे. यातील बहुतांश मृत्यू हे घरातील कर्त्या पुरुषांचे झालेले आहेत. ज्यांचे या काळात आई-वडिलांचे छत्र हरवले अशा अनाथांसाठी शासनाने मदतही जाहीर केली. मात्र अद्याप तरी अशाप्रकारची मदत कुंकू हरविलेल्या महिलांकरिता जाहीर करण्यात आलेली नाही. आता या निराधार महिलांनी कसे जगावे, असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. शासनाने मदतीचा हात म्हणून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत निराधार महिलांची माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. मात्र त्यांना कोणते लाभ देणार, याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.