भाजपचे ३३४ मतदार सहलीला, काँग्रेसच्या हाती कुणी लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 20:43 IST2021-11-29T20:42:21+5:302021-11-29T20:43:47+5:30
Nagpur News भाजपकडून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेसने रवींद्र भोयर यांना रिंगणात उतरवले आहे. अपक्ष मंगेश देशमुख यांनीही माघार घेतलेली नाही. आपले मतदार फुटू नयेत म्हणून अधिक काळजी घेतली जात आहे.

भाजपचे ३३४ मतदार सहलीला, काँग्रेसच्या हाती कुणी लागेना
नागपूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने भाजप-संघ परिवारातील उमेदवार घेतला. काँग्रेसच्या या चालीपासून सावध भूमिका घेत भाजपने लागलीच आपले मतदार एकत्र केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने आपल्या ३३४ मतदारांना पर्यटनाला पाठवून सुटकेचा श्वास सोडला आहे.
भाजपकडून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेसने रवींद्र भोयर यांना रिंगणात उतरवले आहे. अपक्ष मंगेश देशमुख यांनीही माघार घेतलेली नाही. भाजपचे संख्याबळ जास्त असले, तरी आपले मतदार फुटू नयेत म्हणून अधिक काळजी घेतली जात आहे.
काँग्रेस नेत्यांकडून घोडेबाजार करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. आपल्या मतदारांना प्रलोभने दिली जात आहेत, असा दावा करत भाजपने आपले ३३४ मतदार सहलीला पाठवले आहेत. हे सर्व मतदार ९ डिसेंबरच्या रात्री परततील. विजयासाठी २५६ मतांची आवश्यकता आहे. बहुमतासाठी लागणाऱ्या आकड्यापेक्षा जास्त मतदार आधीच पर्यटनासाठी रवाना केल्यामुळे बावनकुळे यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
महाविकास आघाडीची भिस्त पालकमंत्री नितीन राऊत व क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर आहे. काँग्रेस नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या मतदारांसह बसपा, अपक्ष व इतर मतदारांना संपर्क साधला जात आहे. भाजपमध्ये अंतर्गत खदखद आहे. आपले मतदार नाराजीतून फुटतील, या भीतीने भाजपने मतदारांना पर्यटनासाठी नेले आहे. मात्र, निकालानंतर चित्र बदललेले दिसेल, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक मनावर घेतली असताना, ३३४ मतदार एकत्र करून रवाना केले असताना त्यातील एक मोठा गट फुटेल का, हा प्रश्नच आहे.