- अतुल कहाते
चीन आणि व्हिएतनाम यांच्यामध्ये सुरू असलेल्या चकमकींमुळे गेले काही दिवस या देशांमधलं वातावरण तापलेलं आहे. वरवर दक्षिण चिनी समुद्रामध्ये चीनचे तेलविहिरी खोदण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आणि हा भाग आपला असल्याची व्हिएतनामची भावना असल्यामुळे त्यांत तणाव निर्माण झाला असल्याचं चित्र दिसत असलं, तरी हा प्रश्न तितकासा सोपा नाही. चीन आणि व्हिएतनाम यांच्यामधले संबंध पूर्वीपासूनच तणावपूर्ण आहेत आणि सध्याच्या घडामोडी या संबंधांमधलं पुढचं पाऊल आहे, हे नक्की. व्हिएतनाम हाच आग्नेय आशियामध्ये चीनच्या सगळ्यात जवळ असलेला देश आहे. चीनच्या साम्राज्यवादी आणि विस्तारवादी महत्त्वाकांक्षी हालचालींवर सगळ्यात बारकाईनं लक्ष ठेवणारा देशही व्हिएतनाम हाच आहे.
खरं म्हणजे चीन आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांमध्ये साम्यवादी समाजव्यवस्था आहे. त्या अर्थानं दोघांचा वेगवेगळ्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा एकसारखा आहे. असं असूनही चीननं कित्येक शतकांपासून आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी केलेल्या कृतींकडे व्हिएतनाम संशयाच्या नजरेनं बघत आलेला आहे. जवळपास एक हजार वर्षं चीनचंच व्हिएतनामवर वर्चस्व असल्यामुळे व्हिएतनाममध्ये चीनचा खूप पगडा आहे. त्यातच ज्या व्हिएतनामशी युद्ध छेडून अमेरिकेनं आपलं हसं करून घेतलं, त्याच अमेरिकेच्या रिचर्ड निक्सन या राष्ट्रपतीनं १९७२मध्ये चीनचा दौरा केल्याबरोबर चीन आणि अमेरिका या दोघांविषयीचा व्हिएतनामच्या मनातला संशय आणखीनच बळावला. १९७0च्या दशकात माओ झेडाँग यांचं निधन होणं आणि चीनमध्ये सत्तापालट होणं, या घडामोडींमुळे व्हिएतमानशी चीनच्या सुरू असलेल्या अघोषित युद्धाकडे कुणाचं फारसं लक्ष गेलं नाही.
१९७८मध्ये व्हिएतनामनं सोव्हिएत संघाच्या अधिपत्याखाली असलेल्या आर्थिक समझोत्यांसाठीच्या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं. तशीच एकूणच सोव्हिएत संघाशी आपण सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करीत असल्याची घोषणा केली. त्यामुळे चीन भडकला. व्हिएतनामचं वर्णन ‘पूर्वेकडचा क्यूबा’ अशा शब्दांमध्ये चीननं केलं. यापाठोपाठ चीन आणि व्हिएतनाम या देशांमधल्या सीमारेषांपाशी चकमकी वाढायला लागल्या. १९७९च्या फेब्रुवारी महिन्यात चीननं व्हिएतनामवर हल्ला करून आपण व्हिएतनामच्या हरकतींना प्रत्युत्तर देत असल्याचं जाहीर केलं. चिनी सैनिकांनी व्हिएतनाममध्ये आठ किलोमीटरपर्यंत चढाई केली. त्यानंतर व्हिएतनामच्या चिवट प्रतिकारामुळे चीनला फार काही करणं शक्य झालं नाही. आणखी काही कारवायांनंतर चीननं व्हिएतनामला पुरेसं धमकावलं असल्याची जाणीव करून दिल्याचं जाहीर केलं आणि हे युद्ध संपवलं. प्रत्यक्षात मात्र चीनची ही मोहीम पुरती फसली असल्याचं चित्र निर्माण झालं. अर्धवट माहिती, अपुरा शस्त्रसाठा तसंच इतर सामुग्री अशा अनेक अडचणींमुळे चीनची या युद्धात बर्यापैकी मानहानीच झाली. या युद्धानंतर चीन आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांनी आपापल्या सीमारेषांवरच्या लष्करी तयारीत आणखी वाढ केली. सोव्हिएत संघानंही व्हिएतनामला लष्करी मदत केली.
१९८0च्या दशकापासून चीननं व्हिएतनामवर लपूनछपून हल्ले करणं आणि व्हिएतनामी सैनिकांना गाफील ठेवून घुसखोरी करणं, असे प्रकार सुरू केले. हे हल्ले प्रामुख्याने सागरी मार्गांद्वारे होत. व्हिएतनामी लष्करापुरतेच हे हल्ले र्मयादित नसत, तर व्हिएतनामी उद्योग, नैसर्गिक संपदा यांवरही होत. असं असूनही वरवर मात्र चीन आणि व्हिएतनाम हे राजकीय तसंच आर्थिक बाबतींमध्ये परस्परसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं भासवायचे. आता मात्र दक्षिण चिनी समुद्रामधल्या वादविवादांमुळे हे संबंध कटू असल्याचं नव्यानं दिसून आलं आहे.
पॅरॅसेल्स आणि स्प्रॅटलिस अशा दोन बेटांना दक्षिण चिनी समुद्रानं वेढलेलं आहे. या बेटांभोवती चीन, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई, फिलिपीन्स अशा अनेक देशांच्या सागरी सीमा आहेत. साहजिकच, या बेटांवर आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी हे सगळे देश उत्सुक आहेत. त्यांपैकी चीन आपला वाटा सगळ्यात मोठा असल्याचं आणि त्याला तब्बल २,000 वर्षांचा इतिहास असल्याचं सांगतो. १९४७मध्ये चीननं प्रसिद्ध केलेल्या एका नकाशात तर या सगळ्याच भागावर आपला हक्क असल्याचा दावा केला होता. व्हिएतनाम मात्र चीनचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावतो. तसंच सतराव्या दशकापासून आपलंच या भूभागावर नियंत्रण असल्याचं मत मांडतो. यासंबंधी आपल्याकडे कागदपत्रं असल्याचंही व्हिएतनामचं म्हणणं आहे. याउलट, आपण या बेटांच्या सगळ्यात जवळ असल्यामुळे खरं म्हणजे आपलाच या बेटांवर मालकी हक्क आहे, असं फिलिपीन्सला वाटतं. या बेटांनजीकच्या भागात भरपूर नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, असा अंदाज व्यक्त केला जात असल्यामुळे इतक्या देशांचा त्यावर दावा आहे. अजून याविषयीची खात्रीलायक माहिती उपलब्ध नसण्याचं मुख्य कारण म्हणजे या वादविवादांमुळेच तिथल्या साधनसंपत्तीचा अभ्यास आजपर्यंत करता आलेला नाही. याखेरीज, मासेमारी आणि जलमार्ग या कारणांमुळेही या भागांना खूप महत्त्व आहे.
२0१२च्या मे महिन्यात व्हिएतनामनं या भागात असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केल्यावर चीननं हल्ले करून ते हाणून पाडले, असं मानलं जातं. तसंच, दक्षिण चिनी समुद्र हा चीनचाच भाग असल्याचं दाखवल्या जाणार्या वादग्रस्त पासपोर्टवर शिक्के मारायलाही व्हिएतनाम सातत्यानं नकार देत आला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये चीननं पॅरॅसेलच्या बेटानजीक तेलविहिरींचा शोध घेण्यासाठीची मोहीम हाती घेतल्यामुळे व्हिएतनाम भडकला. चीन आपल्या मालकीच्या सागरी भागात घुसखोरी करून आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करीत असल्याचा व्हिएतनामचा दावा आहे. १९८२मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं संमत केलेल्या ठरावानुसार हा भाग व्हिएतनामच्या मालकीच्या ‘खास आर्थिक क्षेत्रा’च्या सीमेनुसार व्हिएतनामी किनार्यापासून २00 मैल अंतरावर आहे. याला चीन अजिबात भीक घालत नाही. चीन आपल्या नकाशानुसार पुढे गेला आहे आणि म्हणूनच हा वादग्रस्त भाग आपल्याच मालकीचा आहे, असा चीनचा दावा आहे.
चीनच्या या तथाकथित घुसखोरीमुळे व्हिएतनाममध्ये असंतोष भडकला. हो चि मिन शहरामध्ये सुरुवातीला २0,000 लोकांनी एक शांतता मोर्चा काढला; पण लवकरच काही दंगेखोरांनी परदेशी मालकीच्या कंपन्यांच्या कारखान्यांवर हल्ले सुरू केले. अर्थातच, हे हल्ले चीनच्या घुसखोरीचा बदला घेण्यासाठीचं प्रतीक ठरलं. व्हिएतनामपुढची अडचण म्हणजे त्याचे अमेरिकेशी लष्करी सार्मथ्याच्या दृष्टीनं चांगले संबंध नाहीत आणि उलट साम्यवादी चीनकडे व्हिएतनामी सरकारमधला एक भाग लष्करी बाबतींमध्ये मैत्रीपूर्ण नजरेनं बघतो. म्हणूनच या वादग्रस्त भागामध्ये रक्षणासाठी म्हणून फिरत असलेल्या व्हिएतनामी नौदलाच्या बोटींवर चिनी नौदलानं पाण्याचे मोठे फवारे मारून त्यांना माघार घ्यायला लावल्याचं दृश्य सगळीकडे प्रसिद्ध झालं. त्याबरोबर आपल्या दुबळेपणामुळे अस्वस्थ झालेली व्हिएतनामी जनता पेटून उठली.
एकीकडे आक्रमक चीनची वक्रदृष्टी, तर दुसरीकडे भडकलेली जनता, अशा कात्रीत व्हिएतनाम सापडला आहे. चीनलाही व्हिएतनाममधल्या स्वस्ताईचा फायदा करून घेण्याच्या दृष्टीनं तिथं आपल्या वस्तूंचं उत्पादन करून घेणं परवडत असल्यामुळे चीनही एका र्मयादेपलीकडे हा प्रश्न ताणून धरणार नाही, अशी शक्यता आहे. शेवटी आंतरराष्ट्रीय पातळीवरच त्याचा निकाल लागला पाहिजे, हे नक्की!
(लेखक आंतरराष्ट्रीय आहेत.)
Web Title: The Wrestling Dragon
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.