डे-नाइट कसोटी - दमादम मस्त कलंदर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 06:04 AM2019-11-24T06:04:00+5:302019-11-24T06:05:09+5:30

कसोटी क्रिकेटच्या पाच दिवसांच्या खेळानं प्रेक्षकांना  जांभई येऊ नये म्हणून त्यात काही बदल सुरू झाले.  कसोटी सामने ‘गुलाबी’ आणि ‘डे-नाइट’ झाले.  त्यावर अनेक मतमतांतरे आहेत; पण अभिजात रूपबंध शिल्लक ठेवून या खेळातली रंगत वाढणार असेल, सामने हमखास निकाली लागणार असतील, अर्थकारण  जमेच्या अंगानं जाणार असेल तर कुणाला नकोय?.

What is the future of Day-Night Test? | डे-नाइट कसोटी - दमादम मस्त कलंदर.

डे-नाइट कसोटी - दमादम मस्त कलंदर.

Next

- चंद्रशेखर कुलकर्णी
भारतातल्या क्रिकेटनं बरोबर अठ्ठेचाळीस तासांपूर्वी एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियममध्ये ‘गुलाबी’ कसोटी सुरू झाली. भारत आणि बांग्लादेश यांच्यात सुरू असलेल्या या सामन्याच्या निमित्तानं आपल्या देशातल्या कसोटी क्रिकेटनं एक अनोखा उंबरठा ओलांडला. या कसोटीत गुलाबी चेंडू वापरला जातोय. चेंडूच्या या गुलाबी बदलावर खूप चर्चा  झडली. कौतुक घातलं गेलं. मोठय़ा प्रमाणात वातावरणनिर्मिती झाली. रंगाच्या बाबतीत बदललेलं, सजलेलं कोलकाता जणू जयपूर बनलं. या सार्‍या बदलाचा क्रिकेटइतकाच क्रिकेटबाह्य अंगानं अन्वयार्थ काय लावायचा? खरं तर हा प्रश्न बहुआयामी आहे. लोकार्शयापासून धनार्शयापर्यंत अनेक कंगोरे त्याला आहेत. सर्मथक आणि विरोधकांची खडाखडी आहे. एक प्रयोग आहे. अर्थात या सार्‍या पैलूंना व्यापून दशांगुळे उरणारा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटवर मन:पूत प्रेम करणार्‍या बहुतेकांच्या मते क्रिकेटमध्ये कसोटी हा खेळ आणि वन डे, टी-20 सारखे अवतार हे डाव आहेत. प्रश्न वटवृक्षाचे गोडवे गाताना पारंब्यांना नावं ठेवण्याचा नाही. प्रश्न आहे, तो जगाच्या पाठीवर होऊ घातलेल्या या बदलाचा अर्थ समजून घेण्याचा! आपण अशा प्रयोगांचा स्वीकार केला नाही तर त्यातून भारतातल्या क्रिकेटचं नुकसान होईल, असं मानणार्‍यांनी गुलाबी कसोटीचा पुरस्कार केलाय, तर याला नाकं मुरडणारे कसोटीच्या अभिजात रूपाला नख लावू नका, असा सूर लावताहेत. भरपूर दागदागिने घालून शास्त्रीय संगीताच्या मैफलीत गायला बसलेल्या एका ख्यातकीर्त गायिकेला,  मग आता उभ्यानं होऊन जाऊ द्या, असा नागपुरी उखडेल टोमणा एका दर्दी रसिकानं मारल्याचा किस्सा प्रचलित आहे. यातला उद्धटपणा बाजूला ठेवू, पण मतितार्थ लक्षात घेऊया की! अभिजात गाणं गळ्यातूनच यावं, पोशाखी रंगढंगानं गळ्यावर मात करू नये, हीच ती भावना. गाणं रंगत नाही म्हणून हार्मोनिअमऐवजी ‘कीबोर्ड’ची साथसंगत मागणारे बुवा अभिजात रसिकांच्या पचनी पडत नाहीत. याचीच दुसरी बाजू अशी, की कालप्रवाहाचा कानोसा घेता आला नाही म्हणून कालबाह्य होऊन अडगळीत पडायचं का?
या संदर्भातले मुख्य प्रश्न समजावून घेतले की संधिप्रकाशातलं गुलाबी कोडं सुटायला मदत होईल. पहिला असा, की चेंडूचा रंग लालऐवजी गुलाबी? कारण मूळ निर्णय सामन्याची वेळ बदलून तो डे-नाइट करण्याचा होता. मग प्रकाशझोतात लाल चेंडू दिसायला त्रास होईल म्हणून अन्य रंगांची चाचपणी झाली. त्यातून गुलाबी रंगावर एकमत झालं. दृश्यमानतेच्या मुद्दय़ावरचा वाद मिटला. मुदलात वेळ का बदलली, याच्या उत्तराचा संबंध अर्थकारणाशी आहे. कामाच्या वेळा टाळून, प्रचलित भाषेत सांगायचं तर ‘प्राइम टाइम’मध्ये सामन्याचं प्रक्षेपण झालं की जाहिराती, प्रक्षेपणाचे हक्क, तिकीट विक्री हे सारं जमेच्या बाजूला सरकणार असा सरळ हिशेब होता. हे सारं कशासाठी? तर कसोटी क्रिकेटचा लोकार्शय वाढविण्यासाठी! पुराणमतवादी आणि क्रांतीचं स्फुल्लिंग पेटवू पाहणारे बंडखोर यांच्यातल्या सनातन संघर्षाची किनार त्याला आहे. याच कसोटी क्रिकेटच्या अभिजात रूपबंधाच्या पलीकडे विचार करायला तयार नसलेल्यांनी 50 षट्कांचे एकदिवसीय सामने स्वीकारलेच की! त्याहीपुढे 20-20ची वावटळ तरी कोणाला थोपवता आली? तरीही खेळाडू, प्रेक्षक आणि पंचांमध्येही एक मोठा वर्ग कसोटीच्या धवलपणावर मार्केटिंगचं रंगलेपन करू नये, या मताचा आग्रह धरून आहे. अर्थात बंडखोर त्यांना सतत जाणीव करून देत राहतात. भविष्याची चाहूल टिपण्याकडे तुम्हाला पाठ नाही फिरवता येणार..! यातलं वास्तव असं, की इतिहास आणि पूर्वानुभवातून हाती आलेली निरीक्षणं यांचा अभ्यास न करताच तत्त्वज्ञान मांडणार्‍यांच्या हाती कसोटी क्रिकेटचं वकीलपत्र गेलंय. म्हणूनच ज्याक्षणी एखादा बदल जाहीर होतो, त्याक्षणी टीकेचं मोहोळ उठतं. रस्त्यारस्त्यांवर आणि चौकाचौकांत त्या बदलाबाबतची भविष्यवाणी होऊ लागते. बव्हंशी हा बदल कसा चुकीचा आहे, हे सांगणारीच ती असते. परिणामी क्रिकेटच्या मैदानावरच्या प्रयोगांना नकळत र्मयादा येते. गुलाबी कसोटी या कात्रीतून यावेळी केवळ गांगुलीमुळे सहीसलामत निसटली आहे. यातून आणखी एक मुद्दा नव्यानं उपस्थित झाला आहे. तो असा, की कसोटी क्रिकेटच्या प्रकृतीची चिंता वाहावी अशी परिस्थिती आहे का? ती धडधाकट आहे, की शरपंजरी पडलीय? याची उत्तरं नि:संदिग्ध आहेत. अर्थकारणानं त्याला दुजोराही दिलाय. कसोटी क्रिकेट धडधाकट आहे. शास्त्रीय संगीताची रॅपशी आणि पंचपक्वानांची फास्ट फूडशी अकारण तुलना करण्याच्या अट्टाहासातून वरपांगी हे चिंतेचं चित्र निर्माण होतं. प्रत्यक्षात कोट्यवधी लोकांचा धर्म असलेल्या क्रिकेटच्या पूजकांनी भारतात अजूनही कसोटीकडे पाठ फिरवलेली नाही. पाच दिवसातला एकही चेंडू न चुकवणारे असंख्य रसिक प्रत्येक शहरात सापडतील. तसाच विचार केला तर 1970च्या दशकात केरी पॅकरनं केलेल्या प्रयोगाचं वर्णन ‘सर्कस’ असं केलं गेलं तरी त्यातून क्रिकेटचं अर्थकारण बदललं, हे सत्य कसं नाकारता येईल?
आता अनेकांना प्रश्न पडलाय, तो कसोटीच्या कपाळी परंपरेनं मिरवणार्‍या टिकलीचा लाल रंग बदलून गुलाबी का करावा, याचा. त्याला दोन पैलू आहेत. पहिला असा, की गुलाबी चेंडू हाताळायला आज ना उद्या सगळेच संघ उत्सुक असणार आहेत. मग आपण का मान वळवायची? दुसरा असा, की या रंगबदलाचा संबंध सौभाग्याशी नसून भाग्याशी आहे. तसं पाहिलं तर कसोटीत नव्हे, पण वन-डेत महिला क्रिकेटनं आंतरराष्ट्रीय पातळीवर या ‘पिंक’ बदलाचा तब्बल दहा वर्षांपूर्वी खुल्या मनानं स्वीकार केला. आपणही गेल्या चार वर्षांत स्थानिक पातळीवर याचा प्रयोग केला आहेच की! त्याचा गाजावाजा झाला नाही, इतकंच!
राहता राहिला मुद्दा खेळाडूंच्या मतांचा. एकीकडे आक्रमकतेसाठी प्रसिद्ध असलेला गांगुलीसारखा माजी कर्णधार गुलाबी बदलासाठी आग्रही आहे, तर तितकाच आक्रमक असलेला आताचा कर्णधार विराट आणि त्याची सेना सावधपणे साशंकता व्यक्त करताहेत. क्षेत्ररक्षण करताना हा गुलाबी चेंडू लाल चेंडूच्या तुलनेत जास्त वेगानं अंगावर येतो. तो हाताच्या पंजाला झिणझिण्या आणण्यासारखा लागतोही. तो क्रिकेटचा नव्हे, हॉकीचा जडशील चेंडू असल्यासारखं वाटतं, या विराटच्या मताकडे दुर्लक्ष नाही करता येत. कारण पाच दिवस सामना बघणारा क्रिकेटप्रेमी सामन्याच्या दरम्यान मैदानावरची प्रतिभा शोधत असतो. या नव्या चेंडूपायी त्या प्रतिभेला नख लागणार असेल तर प्रेक्षक खट्ट होणार आहे. त्याला विराट किंवा रोहितच्या हातून या कारणानं झेल सुटलेलं बघायचं नाहीये. शिवाय यातून फलंदाज आणि गोलंदाजांना असलेल्या समान संधीच्या संतुलनात बिघाड होण्याची शक्यता आहे. हा गुलाबी चेंडू खूप जास्त स्विंग होतो, पण रिव्हर्स स्विंग होत नाही. फिरकी गोलंदाजांना पकड न मिळाल्यानं तो ‘काळ’ ठरू शकतो. शिवाय रात्रीही, म्हणजे सूर्यास्तानंतर पुढे तीन-चार तास सामना होताना पडणार्‍या दवाचा सामनाही प्रामुख्यानं गोलंदाजांनाच करायचाय. क्षेत्ररक्षण करतानाची विराटनं सांगितलेली अडचण गल्लीबोळात ‘एमआरआय’च्या भिजलेल्या चेंडूनं किंवा काळ्या बूच बॉलनं खेळलेल्यांच्या एव्हाना लक्षात आली असणार आहे. 
अर्थात अभिजात रूपबंध शिल्लक ठेवून या खेळातली रंगत वाढणार असेल, सामने हमखास निकाली लागणार असतील, अर्थकारण जमेच्या अंगानं जाणार असेल तर कुणाला नकोय? प्रश्न इतकाच आहे, की या गुलाबी पर्वात काटे खूप आहेत म्हणून फक्त विरोधी मतांची ‘पिंक’ टाकायची, की या काट्यातून मार्ग काढून याच गुलाबाचा गुलकंद करून त्याचा चवीनं आस्वाद घ्यायचा? कुणी म्हणेल थोडासा गुलाबी हो जाए, तर कुणी भारतातल्या या पहिल्यावहिल्या गुलाबी कसोटीसाठी बांग्लादेशी पाठीराख्यांच्या सुरात सूर मिसळायला स्टेडियममध्ये हजेरी लावलेल्या रूना लैलाच्या भाषेत म्हणून जावं.. दमादम मस्त कलंदर!
 

कोलकाता कसोटी अचानक गुलाबी कशी झाली?
क्रिकेटपुरतं बोलायचं तर ‘आयपीएल’ हे नव्या बदलाचं ताजं उदाहरण. ‘बाजार’ म्हणून संभावना झालेल्या याच आयपीएलची पाळंमुळं एव्हाना किती खोलवर रूजली आहेत. आजमितीस आपण या गुलाबी बदलाकडे काहीसे सावधपणे बघतोय. गुलाबी कसोटीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रयोग पहिल्यांदा झाला, तो जेमतेम चार वर्षांपूर्वी. ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अँडलेडमध्ये त्याची मुहूर्तमेढ रोवली. कसोटी क्रिकेटच्या पाच दिवसांच्या खेळानं रसिक प्रेक्षकांना जांभई येऊ लागल्याची बोच हे या प्रयोगामागचं मूळ  कारण. प्रेक्षकांची उदासीनता कमी करतानाच त्यांची सोय बघण्याच्या अंगानं सामन्याची वेळ बदलली. दिव्यांच्या प्रखर प्रकाशाझोतात कसोटीनं एरव्हीची संधिप्रकाशाची सीमा ओलांडली. गुलाबी कसोटी डे-नाइट झाली. 
ऑस्ट्रेलियातली ती मालिका पारंपरिक द्वंद्व असलेली अँशेस नव्हती. तरीही विक्रमी तिकीट विक्री झाली. पण तरीही इतर देशांना हा गुलाबी बदल फार भुरळ घालू नाही शकला. म्हणून तर गेल्या चार वर्षांत सगळ्या देशांत मिळून फक्त 11 कसोटी गुलाबी झाल्या. त्यातल्या पाच ऑस्ट्रेलियात, तर इंग्लंडमध्ये एकमेव. भारतीय उपखंडात म्हणजे भारत, पाकिस्तान, र्शीलंका आणि बांग्लादेशात तर एकही नाही! भारतानं तर गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अँडलेडवरच डे-नाइट गुलाबी कसोटी खेळण्याचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. या विरोधाचा आवाज मोठा नसला तरी त्याची धार तीव्रच होती. असं होतं तर मग अचानक कोलकाता कसोटी गुलाबी कशी झाली? नव्यानंच बीसीसीआयचा अध्यक्ष झालेल्या सौरव गांगुलीची इच्छा, हे त्यामागचं महत्त्वाचं कारण. डे-नाइट क्रिकेटचा गुलाबी अवतार सिद्ध झाला, तेव्हापासून गांगुली त्याचा पुरस्कर्ता होता. अध्यक्षीय अधिकारात त्यानं आपल्याच कर्मभूमीत या कल्पनेला आग्रहानं मूर्त स्वरूप दिलं.

chanduk33@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Web Title: What is the future of Day-Night Test?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.