शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

जिंदादिल मिरासदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 06:00 IST

द.मां.चा विनोद वाचणे हा जितका सुखद अनुभव असतो, तितकाच तो ऐकणेदेखील. द.मा. बोलायला लागतात आणि गावातल्या चावडीवर, कट्ट्यावर किंवा पारावर गावकरी मंडळी तंबाखू चोळत बसलेली आहेत, गप्पांना रंग चढलेला आहे, लालभडक पिचकाऱ्यांनी आसमंत लालेलाल झालेला हे दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं. आपल्या समृद्ध आणि संपन्न विनोदाने आणि कथाकथनाने मराठी माणसाला निखळ आनंद देणाऱ्या ‘दमां’मधल्या विनोदी लेखकाला जागते केले ते पंढरपूरच्या भन्नाट वातावरणाने.

ठळक मुद्देविनोदी साहित्याचे दालन आपल्या कसदार लेखनाने श्रीमंत करणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार १४ एप्रिल रोजी ९५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्या निमित्ताने...

- प्रा. मिलिंदजोशी

महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात जसे एक मारुतीचे देऊळ असते, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या मातीत पिकणारे एक खास पीक असते, तसा गावरान विनोदही असतो. गावओढ्यासारखा सतत तो खळाळत असतो. भंपक माणसांनी मारलेल्या बढायांतून, अडाण्यांच्या आणि भाबड्यांच्या सहज वागण्यातून, बेरकी लोकांच्या गप्पांतून, जुन्या माणसांच्या आठवणींतून, तरुण लोकांच्या हुंदडण्यातून विनोद उसळ्या घेत असतो. साठ वर्षांपूर्वी मराठी लघुकथेला नवा बहर आला. जुनी चाकोरी सोडून धीट अशा काही नव्या वाटा पाडल्या, त्या प्रा. द. मा. मिरासदार यांच्यासारख्या लेखकांनी.

द.मां.चा विनोद वाचणे हा जितका सुखद अनुभव असतो, तितकाच तो ऐकणेदेखील. द.मा. बोलायला लागतात आणि गावातल्या चावडीवर, कट्ट्यावर किंवा पारावर गावकरी मंडळी तंबाखू चोळत बसलेली आहेत, गप्पांना रंग चढलेला आहे, लालभडक पिचकाऱ्यांनी आसमंत लालेलाल झालेला हे दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं. आपल्या समृद्ध आणि संपन्न विनोदाने आणि कथाकथनाने मराठी माणसाला निखळ आनंद देणाऱ्या ‘दमां’मधल्या विनोदी लेखकाला जागते केले ते पंढरपूरच्या भन्नाट वातावरणाने.

‘दमां’चा जन्म सोलापूर जिल्ह्यांतील अकलूज गावचा. तरीही वास्तव्य प्रामुख्याने पंढरपुरात. बालपण ग्रामीण भागात गेल्यामुळे तिथले जीवन त्यांना जवळून पाहता आले. त्यांचे वडील वकील होते. त्यांच्याकडे खेड्यातले अनेक पक्षकार येत असत. त्यांच्या गप्पा ऐकणे, त्यांचे निरीक्षण करणे यांचा ‘दमां’ना नाद लागला होता. पंढरपुरात त्यांनी नाना तऱ्हेची माणसं पाहिली. त्यांचा स्वभाव, त्यांच्या जगण्याच्या तऱ्हा औरच होत्या.

‘दमां’ना या साऱ्याची लहानपणी मोठी गंमत वाटायची. शाळेत असल्यापासून ‘दमां’ना वाचनाचा प्रचंड नाद होता. ‘शेळी जशी झाडाची पानेच्या पाने फस्त करते, तसा मी पुस्तकाची पाने फस्त करायचो’, असे ‘दमां’नी आपल्या वाचनवेडाविषयी सांगितले आहे. या वाचनवेडापायी ते एकदा गावातल्या ग्रंथालयात अडकून पडले आणि त्यांची कशी फजिती झाली, याचा वृत्तांत त्यांनी आत्मकथनपर लेखात सांगितला आहे. चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे हे त्यांचे लहानपणापासूनचे आवडते लेखक. त्यांच्या पुस्तकांची ‘दमां’नी अक्षरशः पारायणे केली. त्याचप्रमाणे वेताळ पंचविशी, शुकबाहत्तरी, हातिमताई, सिंहासन बत्तिशी, गुलबकावली अशा पुस्तकांच्या वाचनात त्यांना खूप आनंद मिळत होता. या पुस्तकांची भाषा साधी, सोपी आणि सरळ होती. कथानके सुटसुटीत होती. त्यामुळे जे काही सांगायचे ते कथेच्या माध्यमातूनच, अशी ‘दमां’ची धारणा होत गेली आणि कथा या साहित्य प्रकाराविषयी त्यांच्या मनात आकर्षण निर्माण झाले. पंढरपुरात शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आले.

पुण्यात आल्यानंतर त्यांची व्यंकटेश माडगूळकरांशी गाठ पडली ती पुण्याच्या आकाशवाणी केंद्रात. त्यांची ‘बनगरवाडी’ वाचून दमा प्रभावित झालेले होते. एकदा दमा माडगूळकरांना म्हणाले, ‘मी बघितलेला एक नमुना तुम्हाला सांगतो. तो ऐका.’

मिरासदार लहानसहान बारकाव्यांसह गोष्ट सांगू लागले आणि माडगूळकर तल्लीन होऊन ऐकू लागले. ‘कशी काय वाटली गोष्ट?’ असं ‘दमां’नी विचारताच माडगूळकर खुश होऊन म्हणाले, ‘मला तुम्ही ज्या पद्धतीने ही गोष्ट सांगितली. जशीच्या तशी ती लिहून काढा. फक्कड होईल.’

माडगूळकरांनी सुचविताच ‘दमां’नी ती कथा जशीच्या तशी लिहून काढली आणि ‘सत्यकथे’च्या संपादकांकडे पाठवून दिली. त्या कथेचे नाव होते ‘रानमाणूस’. ती कथा सत्यकथेत छापून आली. मिरासदार नावाच्या विनोदी लेखकाकडे महाराष्ट्रातल्या जाणकारांचे लक्ष गेले. मिरासदारांच्या मिरासदारीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १९५७मध्ये ‘माझ्या बापाची पेंड’ हा त्यांचा पहिला विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. दिवाळी अंक ही ‘दमां’साठी मोठी पर्वणी ठरली आणि ते लिहीत राहिले.

शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, रा. रं. बोराडे ही मंडळी लिहायला लागली, त्या वेळेपर्यंत मराठीतला विनोद हा मध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि पांढरपेशा लोकांच्या जीवनातील घडामोडींशी निगडित होता. काही प्रमाणात प्रसंगनिष्ठ होता. या मंडळींनी ग्रामीण जीवनातल्या गमतीजमती, तिथल्या माणसांचे स्वभाव, त्या माणसांच्या भाबडेपणातून घडणारे विनोद प्रामुख्याने मराठी कथांमध्ये आणले. मराठी साहित्याचे विनोदाचे वर्तुळ व्यापक करण्याचा प्रयत्न या पिढीने केला. माडगूळकरांनी दुःख, दारिद्र्य असतानाही प्रचंड सोशिकतेने जीवनाला सामोरे जाणाऱ्या माणसांचे जग त्यांच्या साहित्यातून उभे केले. ‘दमां’नी हास्यकथेच्या माध्यमातून ग्रामीण कथेला पुढे नेले.

देशात आणि परदेशात कथाकथनाच्या माध्यमातून ग्रामीणकथा विशेषतः विनोदी कथा लोकप्रिय करण्याचे श्रेय द.मा., व्यंकटेश माडगूळकर आणि शंकर पाटील या त्रिमूर्तीकडे जाते. अध्यापन क्षेत्रात रमलेल्या ‘दमां’नी विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळविला. विनोदी लेखकाला त्याच्या विनोदाचे नाणे पाडता आले पाहिजे, असं म्हणणाऱ्या मिरासदारांनी विनोदी साहित्याच्या क्षेत्रात त्यांच्या कर्तृत्वाचा स्वतंत्र अध्याय निर्माण केला. वयाच्या ९५ व्या वर्षीही त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे. अशात कानाने कमी ऐकायला येतंय त्यावरही ‘सध्या मी सर्पयोनीत आहे’ असं ते मिस्कीलपणे म्हणतात. या जगातलं दुःख नाहीसं करता येत नाही, पण ते हलकं करण्याची ताकद विनोदात आहे यावर अढळ श्रद्धा असणाऱ्या या खेळकर वृत्तीच्या जिंदादिल साहित्यिकाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.