वायनाड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 10:26 AM2017-08-08T10:26:24+5:302017-08-08T10:26:27+5:30

निसर्गसौंदर्याची खाण असलेल्या ‘देवभूमी’ केरळला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे. केरळ म्हटले की समुद्रीपर्यटन असाच आजही अनेकांचा समज आहे. मात्र वाघ, हत्ती, गेंडे, उडत्या खारींचे जंगल आणि अगदी कारखानेदेखील इथल्या पर्यटनाचाच एक भाग आहेत. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय तिथली श्रीमंती कशी कळणार?

Wayanad | वायनाड

वायनाड

Next

- संजय पाठक
सगळीकडे हिरवीगर्द वनराई, उंच नारळाची अन् सुपारीची झाडं, मध्येच रांगेत उभे असलेले चहा-कॉफीचे मळे, उंचसखल दºया-खोºयांच्या या क्षेत्रात उंचावरून कोसळणारे धबधबे, दºयांमधून भ्रमंती करीत दूरवर जाणाºया नद्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील वनराईत असलेले वाघ, हत्ती, गेंडे यांसारखी श्वापदे.. काही ठिकाणी इसवीसन पूर्व काळातील गुंफा.. येथील मुक्त आणि स्वच्छ प्राणवायू.. ना गाड्यांचा गोंगाट, ना कसला गोंधळ-गडबड...
इतक्या निसर्गरम्य आणि नीरव शांततेत किमान काही दिवस तरी जाऊन राहावे असे कोणालाही आवडेल. निसर्गाच्या कुशीतला अनुभव ज्यांना घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी त्यांच्या मनातले ठिकाण म्हणजे केरळातील वायनाड...


गेल्या काही वर्षांपासून केरळच्या पश्चिम घाटातील हे पर्यटनस्थळ देश-विदेशांतील पर्यटक आणि पर्यावरणप्रेमींना साद घालते आहे. केवळ पर्यटन आणि भ्रमंतीच नव्हे, तर झीपलाइन, बंजी जंपिंग, रिव्हर राफ्ंिटग आणि ट्रेकिंगचे साहसी खेळ.. ज्याला जे जे हवे ते ते सारे वायनाडमध्ये आहे. याच वायनाडमध्ये मीनमुठ्ठी जलप्रपात, पुकुट तलाव यांसारखी असंख्य आकर्षणं पर्यटकांना साद घालताहेत.
विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या देवभूमी केरळला तसे निसर्गाचे वरदानच लाभले आहे. केरळ म्हटले की समुद्रकिनाºयाचे पर्यटन असा समज असला तरी त्यापलीकडे गर्द झाडीच्या जंगलाची नवी ओळखच वायनाडने करून दिली आहे. कालिकत, म्हैसूर, उटी आणि कुर्ग यांसारख्या पर्यटनस्थळांच्या मध्यवर्ती असलेल्या वायनाडमध्ये पर्यटनस्थळासाठी जे काही लागते ते सारेच उपलब्ध आहे.


मुंबई किंवा कोणत्याही महानगरातून वायनाडला येण्यासाठी रेल्वे किंवा विमानसेवा आहे. कालिकत येथे आंतरराष्टÑीय विमाततळ आहे. तेथून वायनाडला जाण्यासाठी बस किंवा मोटारीने जाण्याची सोय आहे. वळणावळणाचे घाट आणि दुतर्फा असलेली वनराई, डोंगर-दºया बघत तीन तासांचे अंतर कापून आपण वायनाडला केव्हा येऊन पाहोचतो हे कळतही नाही. वायनाडच्या विस्तीर्ण प्रदेशात गेल्यानंतर हरखून गेल्यासारखेच होते. पावसाळा हा येथील ‘आॅफ सिझन’ असला, तरी चेरापुंजीनंतर भारतात सर्वाधिक पाऊस पडणाºया लक्कीडी क्षेत्राच्या आसपास हे स्थळ आहे. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे त्याची प्रचिती येते. एरवी लख्ख उन्हात वायनाडच्या क्षेत्रात फिरण्याची मौज काही वेगळीच.
कन्नूर आणि कोझीकोड या दोन जिल्ह्यांमधील वायनाड हा मूलत: जंगलाचा भाग असून, त्याची सीमा कर्नाटकपर्यंत पसरली आहे. या जंगलात तब्बल ३५ वाघ आहेत. याशिवाय हत्ती, हरीण, काळवीट, गेंडे आणि उडत्या खारीदेखील आहेत. शहरात राहणाºयांना तर त्यामुळे एक वेगळेच थ्रिल अनुभवता येऊ शकते.
वायनाडमध्ये सहजपणे फिरतानाही जंगली श्वापदे दिसल्याचा अनुभव अनेक पर्यटकांनी घेतला आहे. इसवीसन पूर्व काळातील एडक्कल लेणी हे येथील आणखी एक आकर्षण. निसर्ग आणि इतिहास याचा एक अतिशय सुंदर असा संगम याठिकाणी पाहायला मिळतो. पाषाण काळातही हे शहर किती समृद्ध असेल याची साक्ष पटते. नैसर्गिक संपदा लाभलेला हा भाग म्हणजे खरेतर केरळचे आदिवासी क्षेत्र. याठिकाणी जंगले मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील काही सरकारी तर काही खासगी मालकीची आहेत. अगदी चारशे-पाचशे एकर क्षेत्रावरही खासगी मालकी असलेले लोक आहेत.
अशा जंगलात खासगी पद्धतीने पर्यटन केंद्रे वसविणे सोपे असले तरी ते करताना कोठेही अतिरेक झालेला नाही. पर्यटकांच्या निवास आणि भोजनाच्या व्यवस्थेसाठी देशभरातील बड्या कंपन्यांच्या हॉटेल्स-रिसोर्ट यांची शृंखला येथे आहे. मात्र, त्यासाठी वन क्षेत्राचा समतोल बिघडेल अशा पद्धतीने अद्याप मोडतोड झालेली नाही. डोंगरदºया सपाट करण्याचा उद्योग करण्यापेक्षा येथे उंच सखल पद्धतीनेच निवासव्यवस्था करण्यात आल्याने निसर्गात रमण्याचा खरा आनंद मिळू शकतो.
जेथे भौगोलिक क्षेत्र मोठे आहे, तेथे धबधबे, दºया, नद्यांचा अनुरूप वापर करण्यात आला आहे. डोंगर असतील तर ट्रेकिंग, दºयांवर झीप लाइन आणि नदी किंवा तळ्यांमध्ये नौकाविहाराबरोबरच बांबू राफ्ंिटगसारखे अनेक खेळ उपलब्ध आहेत. रेन डान्स, स्विंग फ्री, सायकलिंग, तिरंदाजी कॅम्प, फायर अशा अनेक विविध उपक्रमांची जोड त्याला मिळालेली आहे. जंगलात असलेल्या हॉटेल व्यावसायिकांनी तर ‘नाइट वॉक’सारख्या खास जंगलातील वास्तव्याची अनुभूती देणाºया अ‍ॅक्टिव्हीटीही राबविल्या आहेत.
आयुर्वेदिक मसाज आणि स्पा, त्याचबरोबर तणावमुक्त जीवनासाठी असलेल्या अनेक थेरेपींमुळे वायनाडच्या वास्तव्यातून बाहेर पडताना पर्यटक ताजेतवाने होऊनच बाहेर पडतात. कॉफी आणि चहाचे विस्तीर्ण मळे असलेल्या या भागात कारखानेही आहेत. आश्चर्य म्हणजे हे कारखानेदेखील पर्यटनाचा एक भाग आहेत. पर्यटकांना चहा किंवा कॉफी कशी तयार होत हे सर्व दाखविण्याची सुविधा येथे आहे. काळी मिरी, वेलदोडे, दालचिनी, तेजपान अशी मसाल्याची झाडे निसर्गत:च उपलब्ध असल्याने परतताना वायनाडची आठवण म्हणून इथले मसाले, होम मेड चॉकलेट््स, हलवा, नारळाची बिस्किटे यांसारखे पदार्थ आवर्जून घरी घेऊन जातात. वायनाडच्या निसर्गाचा आनंद घ्यायचा, तर केवळ एखाद-दोन दिवसांची भेट पुरेशी नाही. निवांत वेळ काढूनच येथे यायल हवे. वायनाडच्या आजूबाजूचा परिसरही आवर्जून भेट द्यावी असाच आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेला बाणासुरा सागर डॅम, सुज्जीपुरा, कनंथनपुरा हे धबधबे, कुरवा आइसलॅँड, मुथंगा अभयारण्य, सनराइज व्हॅली, थिरूनली मंदिर.. अशी अनेक रमणीय स्थळे येथे आहेत.


वायनाडची अशीही ओळख
केरळची नवी ओळख असलेल्या वायनाडच्या नावाविषयी वेगवेगळे संदर्भ दिले जातात. मायक क्षेत्र हे या भागाचे जुने नाव. मायक क्षेत्र म्हणजे मायाभूमी. पुढे मायकचे ‘मायनाड’ झाले आणि आता ते ‘वायनाड’ नावाने परिचित आहे. तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या या क्षेत्राच्या नावाची आणखी एक फोड करून सांगितली जाते. ती म्हणजे ‘वायल दाना’. म्हणजेच तांदळाची भूमी. ८ ते ३० अंश सेल्सिअस असे या क्षेत्राचे तपमान असते. परिसरात मुतंगा व तोलपट्टी ही दोन अभयारण्ये, बाणासुरा व कारापुरा ही धरणं तसेच अन्य निसर्गसंपदा मोठ्या प्रमाणात असल्याचे वायनाड टुरिझम आॅर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यूटीओचे अध्यक्ष वांझीखेरन सांगतात. केरळच्या या जंगलभागाचा तसेच ‘मसालेदार’ भागाचा परिचय करून देण्यासाठी ही संघटना गेल्या अनेक वर्षांपासून वायनाड फेस्टिव्हल भरवते. यावेळच्या फेस्टिव्हलचे नाव होते ‘वायनाड स्प्लॅश २०१७’. त्याअंतर्गत देशभरातील पर्यटकांना निमंत्रित करून वायनाडची माहिती देऊन स्थळभेट घडविली जाते. केरळ टुरिझम आणि वायनाड येथील संघटना वर्षाआड अशाप्रकारचे फेस्टिव्हल भरवून टुरिझम कंपन्यांचे लक्ष वेधून घेत असतात. अर्थात केरळ सरकारचाही त्यातील सहभाग खूपच मोठा आहे.

आदिवासींचे उंचावले जीवन
पर्यटन भूमी म्हणून केरळची ओळख आहे. वायनाड हे तर जंगल क्षेत्र. १ नोव्हेंबर १९८० रोजी केरळ राज्याचा बारावा जिल्हा म्हणून त्याला वैधानिक मान्यता मिळाली. राज्यातील सर्वाधिक आदिवासी असलेला हा भाग. कुरिचिया, कुरमा, पणीया, अडिया, काट्टूनाइकर अशा अनेक आदिवासी जमाती येथील मूळ रहिवासी आहेत. वर्षानुवर्षे मोलमजुरी, कॉफीच्या मळ्यात आणि कारखान्यात काम करणाºया या आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. केरळचा पर्यटन विभाग आणि वायनाड टुरिझम आॅर्गनायझेशनच्या मदतीने जाणीवपूर्वक या क्षेत्राचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटनस्थळाच्या आतिथ्यशीलतेत ग्रामस्थांचा सहभाग तर वाढला आहेच, परंतु गावागावांतील अर्थकारणदेखील बदलून गेले आहे. अनेक नद्यांमध्ये बांबू राफ्ंिटगसारखे साहसी नौकानयनाचे प्रकार स्थानिक ग्रामस्थांना उदरनिर्वाहाचे साधन ठरले आहेत.

(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत
मुख्य उपसंपादक आहेत.)sanjay.pathak@lokmat.com
 

Web Title: Wayanad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.