हरवले ते गवसले
By Admin | Updated: December 20, 2014 16:17 IST2014-12-20T16:17:16+5:302014-12-20T16:17:16+5:30
हरवलेले जेव्हा गवसते, तेव्हा तो एक सुखद धक्का ठरतो. त्यात आपली वस्तू सुखरूप परत मिळाल्याचा आनंद तर असतोच; पण त्याहून मोठा आनंद असतो माणसावरचा आणि माणूसपणावरचा विश्वास कायम राहण्याचा! त्यामुळे जे तात्पुरते हरवले होते, त्यापेक्षा जे गवसते ते मात्र खर्या अर्थाने अनमोल असते.

हरवले ते गवसले
डॉ. नीलिमा गुंडी
कविवर्य भा. रा. तांबे यांनी आपल्या एका गीतामध्ये आर्त प्रश्न विचारला आहे : ‘हरवले ते गवसले का?’ त्या प्रश्नाचे माझ्यासाठी उत्तर अनेकदा ‘हरवले ते गवसले’ असे आहे. लहानपणापासून स्वत:च्या वस्तू हरवण्याचा अनुभव मी बर्याचदा घेतला आहे. माझ्या स्वभावाची ती उपजत र्मयादा माझ्या आईवडिलांनी शांतपणे स्वीकारली होती. त्यामुळे मी ‘विशेष सवलत’ असल्यासारखी वस्तू हरवत राहायचे! विशेषत: पेन हरवण्यात मी उच्चांक गाठत असे. वस्तू लहानसहान असल्या तरी त्याभोवती गुंफलेल्या आपल्या आठवणी मोलाच्या असतात. वस्तूच्या किमतीपेक्षाही आपल्या भावविश्वात त्या वस्तूंना स्थान असल्यामुळे लागणारी चुटपूट जास्त बोचणारी असते. मी हा अनुभव अनेकदा घेतला. मात्र, माझ्या कित्येक हरवलेल्या वस्तू माझा माग काढत परत माझ्याकडे येत राहिल्या, ही बाब नक्कीच अपवादात्मक म्हणावी लागेल.
मी कॉलेजमध्ये असतानाचा एक अनुभव आहे. मी मुंबईच्या रुईया महाविद्यालयात इंटरआर्ट्ससाठी प्रवेश घ्यायला रांगेत उभी होते. प्रवेशासाठी एकूणच खूप गर्दी होती. त्या गर्दीत काही तरी कारणांनी अगदी चेंगराचेंगरी झाली. मग बर्याच वेळाने माझे प्रवेशाचे काम झाले. तेवढय़ात कोणाचे तरी माझ्याकडे लक्ष गेले आणि ती व्यक्ती म्हणाली, ‘अग, तुझ्या एकाच कानात सोन्याची रिंग आहे.’ ‘झालं का! आम्ही जिथे रांगेत उभा होतो, तो परिसर मी पिंजून काढला. रिंग सैल होऊन पडली असेल, असे मला वाटले. सोन्याची रिंग ही ‘हरवली’ असे आईवडिलांना सहज सांगण्याजोगी गोष्ट नव्हती. मी मनातून घाबरले होते. तेवढय़ात दोन मुली आल्या. मला त्यांनी मी काय शोधतेय याबाबत विचारले. मी उत्तर दिल्यावर त्यातली एक म्हणाली, ‘ही बघ तुझी दुसरी रिंग. मी शिवाजी पार्कला राहते. मी घरी जाण्यासाठी बसमध्ये चढले, तेव्हा माझ्या या मैत्रिणीला माझ्या केसात काही तरी चमकताना दिसले. पाहते तो काय! सोन्याची रिंग! मी ती बस सोडून पुन्हा कॉलेजमध्ये आले! गर्दीत चेंगराचेंगरीत तुझी रिंग माझ्या केसात अडकली असणार!’ त्या मुलीने सगळी हकीकत सांगून माझी रिंग मला परत केली. तिचे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नव्हते!
दुसरा अनुभव मुंबईच्या लोकलमध्ये आलेला आहे. मी रुईया महाविद्यालयात नव्यानेच लेक्चरर म्हणून लागले होते. रोज कल्याण-दादर प्रवास लोकलने करत होते. त्या प्रवासाची नि त्यातल्या गर्दीची सवय मला होती. पण काही वेळा गर्दी अगदी अनपेक्षित वळण घेते. तसे एकदा झाले. मी कॉलेजमधून घरी येत होते. मला कल्याणच्या आधीच्या स्टेशनवर- डोंबिवलीला- एका मैत्रिणीकडे जायचे होते. ती मैत्रीणही माझ्याबरोबर होती. डोंबिवलीला उतरताना चढणारी गर्दी आणि उतरणारी गर्दी यांच्यात इतकी रेटारेटी झाली, की माझ्या खांद्यावर अडकवलेली मोठी पर्सच गायब झाली! मी प्लॅटफॉर्मवर उतरले.
पण बरोबर पर्स नाही! गाडी सुटली. मी डोंबिवली प्लॅटफॉर्मवर कुठे पर्स पडली आहे का, याचा शोध घेतला. पण छे! कोणी पर्स चोरली तर नाही ना? या कल्पनेने मी अगदी निराश झाले. त्या पर्समध्ये माझ्या कितीतरी गोष्टी होत्या. त्यामुळे मैत्रिणीकडे जायचा बेत रद्द करून मी पुढच्याच गाडीने घरी जायचे ठरवले. माझ्या कफल्लक अवस्थेची दया येऊन मैत्रिणीने मला थोडे पैसे दिले. मी कल्याणला घरी चेहरा पाडूनच गेले. तोच आईला खालून हाक आली, ‘अहो वैद्यबाई, फोन आहे.’ त्या वेळी घरोघरी फोन नव्हते. आमच्या चाळीत फक्त केसकरांकडे फोन होता. आई त्यांच्याकडे गेली. तेव्हा आईला फोनवर मिळालेला निरोप असा होता- ‘माझी पर्स गाडीतच पडली होती. ती कोणाची आहे, याचा शोध घेताना पासावर माझे नाव आढळले. मला आणि विशेषत: आमच्या आईला अनेक वर्षं ओळखणार्या कारखानीसबाई डोंबिवलीला चढल्या होत्या. त्यांनी ती पर्स मला पोहोचवायची जबाबदारी स्वत:कडे घेतली.’ त्यांनीच केसकरांकडे फोन करून हा निरोप दिला. दुसर्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन ती पर्स आणताना झालेला आनंद अवर्णनीय होता!
या प्रसंगी माझी वस्तू माझ्यापर्यंत पोहोचवणार्या बाई माझ्या ओळखीच्या होत्या. पण अगदी अनोळखी व्यक्तीने माझी वस्तू मला मोठय़ा सौजन्याने नि जबाबदारीने परत केल्याचा सुखद अनुभवही मी लोकलच्या प्रवासात घेतला आहे. मी कॉलेजला जाताना वेळापत्रकानुसार रोज गाडी पकडत असे. त्यामुळे माझी रोजची ठराविक गाडी नसे. एकदा पावसाळ्यात आलेला हा अनुभव आहे. कल्याणला पाऊस होता, म्हणून मी छत्री घेऊन निघाले होते. छत्री जुन्या पद्धतीची कापडी, काळ्या रंगाची होती. तिच्यावर माझे नाव होते. छत्री खिडकीशी अडकवून मी निवांत बसले. वार्याने मला डुलकी लागली. माटुंगा आले आणि मला एकदम जाग आली. तिथे पाऊस नव्हता. मी घाईत गाडीतून उतरले. छत्री तशीच खिडकीशी राहिली! छत्री गाडीत राहिल्याचे लक्षात येईपर्यंत गाडी सुटून गेली होती. त्या गाडीत माझे ओळखीचे कुणीही नव्हते. त्यामुळे छत्री गेल्याबद्दल मी स्वत:च स्वत:चे सांत्वन केले. पण आशा मोठी चिवट असते! मी तुमची छत्री माझ्या ऑफिसमध्ये नेऊन ठेवली आहे. आज मी ती घरी नेईन. उद्या तुम्ही याच गाडीला या. मी तुमची छत्री घेऊन येते.’ मी त्यांच्या या उद्गारांनी अक्षरश: थक्क झाले! असेही लोक जगात असतात तर..! माझं मन भरून आलं होतं!
या अनुभवांमध्ये ‘हरवले ते गवसले’ हा सुखद धक्का होता. आपली वस्तू सुखरूप परत मिळाल्याचा आनंद होता. पण त्याहून मोठा आनंद होता, माणसावरचा विश्वास कायम राहण्याचा! त्यामुळे जे तात्पुरते हरवले होते, त्यापेक्षा मला गवसले ते मात्र अनमोल होते. आजही ते माझ्यासाठी अनमोलच आहे!
(लेखिका ज्येष्ठ समीक्षक आहेत.)