- अंकुश काकडे- अर्थात ही महापालिकेची नाट्यगृहे मुख्यत: नाटकांसाठी, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बांधण्यात आलीत. सुरुवातीच्या काळात ती नाटकांसाठीच वापरली जात होती. परंतु, गेल्या १०-१५ वर्षांत नाटकांशिवाय महापालिकेचे कार्यक्रम, विविध पक्षांचे कार्यक्रम, मेळावे, अधिवेशन, शाळांची स्नेहसंमेलन यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागलाय, त्यामुळे अनेक वेळा वाद होऊ लागलेत. काही वेळा नाटकांच्या प्रयोगाची तिकीट विक्री झालेली असते. शाळेचे किंंवा बुकिंग केलेल्या संस्थांचे कार्यक्रमाची निमंत्रणेदेखील गेलेली असतात, पण अशावेळी राजकीय पक्षाचे कार्यक्रम ठरतात. त्यासाठी त्यांचे व्हीआयपी येणार म्हणून ज्यांनी नियमानुसार बुकिंग केलेले असते, पैसे जमा केलेले असतात, त्यांचे कार्यक्रम त्यांना रद्द करण्यास सांगितले जातात. याबाबत अनेक वेळा आंदोलने झाली, पण सत्ताधाऱ्यांना त्याची फिकीर नसते. विशेषत: बालगंधर्व रंगमंदिराच्याबाबतीत असे प्रसंग अनेक वेळा घडले आहेत.महापालिकेने स्वत:चा विचार करीत असताना समोरच्या नाट्यसंस्थेचा, इतर संस्थांचाही विचार करायला हवा. आज शहरात ही नाट्यगृहे असताना लाल देवळाजवळ असलेले नेहरू मेमोरियल हॉल हे कॅम्पमधील नाट्यगृह, शहरापासून थोडंसं दूर असलेलं तसेच जवळपास नागरी वस्ती नसल्यामुळे तेथे मराठी नाटकांचे कार्यक्रम फारसे होत नाहीत. पण हिंंदी, इंग्रजी, गुजराती नाटके बऱ्यापैकी होतात. खासगी असल्यामुळे तेथील स्वच्छतागृहे हीदेखील उत्तम असतात हे महत्त्वाचे. ही सर्व नाट्यगृहे पाहत असताना आपल्याला लक्ष्मी रोडवरील डुल्या मारुती मंदिराजवळ असलेलं आर्यभूषण तमाशा थिएटर विसरता येणं शक्यच नाही! १००-१२५ वर्षांपूर्वी सुरू झालेलं हे तमाशा थिएटर १९३३ पासून कै. अहमदशेठ तांबे आणि त्यानंतर त्यांची सर्व मुले आजपर्यंत या कठीण परिस्थितीतही चालवित आहेत. आजही या ठिकाणी १००-१२५ तमाशा कलावंत आहेत, तसेच या थिएटरला फार मोठा राजकीय, सांस्कृतिक वारसा आहे. या थिएटरमध्ये आपली कला सादर केलेल्या कलावंतांची नावे पाहिली तर सध्याच्या तरुण पिढीला निश्चितच आश्चर्य वाटेल. यमुनाबाई वायकर या ६-७ वर्षे तेथे राहण्यास होत्या, त्यांना राष्ट्रपतींनी पद्मश्री पदक देऊन गौरविले होते. आर्यभूषणमध्ये तुकाराम खेडकर, तमाशा सम्राट काळू-बाळू यांचे फड कायम असत. भाऊ बापू मांग नारायणगावकर यांचा तमाशा फड आणि त्यात सहभाग घेणाºया त्यांच्या ३ मुली विठाबाई, केशरबाई, मनोरमा यांनी या क्षेत्रात केलेली उत्तुंग प्रगती थक्क करणारी आहे. विठाबार्इंना तर संगीत अकादमी पुरस्कार २ वेळा प्राप्त झाले होते. तसेच राष्टÑपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते १९५७ मध्ये राष्टÑपती पदक देऊन गौरविले होते.१९५५-५६ च्या काळात मोरारजी देसाई यांनी तमाशाबंदीचा निर्णय आणला होता, त्याला विरोध करण्यासाठी या थिएटरमध्ये परिषदा होत त्याला वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, ह. रा. महाजनी, राजाभाऊ थिटे एवढेच काय पु. ल. देशपांडे हेदेखील तेथे हजर होते. विशेष म्हणजे त्यांनी त्यावेळी हार्मोनियमवर ‘झाला महार पंढरीनाथ’ हे गीत सादर केले होते, अशी आठवण श्री. नूरमहंमद तांबे सांगतात. दादू इंदुरीकर, तुकाराम खेडेकर, जगताप पाटील, निळू फुले, राम नगरकर येथे नियमित येत असत. उषा चव्हाण यांनी लहानपण येथे घालवले, अनंत माने यांच्या ‘सांगत्ये ऐका’ या गाजलेल्या चित्रपटातील सर्व महिला सहकलाकार याच थिएटरमधील होत्या, अशीही माहिती मिळते. पूर्वी चवली-पावली असे चलन होते, त्यावेळी येथील कार्यक्रमांना पावली म्हणजे सध्याचे २५ पैसे तिकीट होते. आता हेच तिकीट २५ रुपये झाले असल्याचे नूरमहंमद तांबे यांनी सांगितले. आजही हे थिएटर फारशी सुधारणा न होता, आहे त्या स्थितीत अजूनही सुरू आहे, हे विशेष म्हणावे लागेल. (उत्तरार्ध) (लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
पुण्यातील नाट्यगृहे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 07:00 IST