-डॉ. विद्याधर बापट (मानसोपचार तज्ज्ञ) मुलं-मुली वाढत असताना नुसतंच त्यांचं शरीर वाढत नाही, त्यांचं मन फुलत असतं. त्यांचं व्यक्तिमत्त्व उमलत असतं. पौगंडावस्थेत त्याला अनेक पैलू पडत असतात. उत्साह खळाळून वाहत असतो. तरीही गोंधळात टाकणारे प्रश्न त्यांच्या मनात घोंघावत असतात. भारतीयांना अध्यात्मात प्रश्न पडतो, "मी कोण आहे?' पौगंडावस्थेतही हाच प्रश्न पडतो; पण त्याचं स्वरूप फार वेगळं असतं. आपण अचानक असे बदलू का लागलो, या चिंतेने मुले अस्वस्थ होतात आणि त्यांना प्रश्न पडतो, इतरांपेक्षा माझ्यात काहीतरी कमी आहे का? या सगळ्या जगरहाटीत माझं काय स्थान आहे? प्रत्येक गोष्टीत माझ्यावर पालकांचा दबाव का? आईबाबांच्याच कलानं, त्यांना आवडेल तेच मी का करायचे? स्त्री-पुरुष संबंध म्हणजे काय आणि इतरही लैंगिक प्रश्नांनी तो हादरून गेलेला असतो. याच काळात मुलांना सांभाळायला हवं. त्याचा काही कारणानं नुसताच मूड गेला आहे की, हा अस्वस्थतेचा किंवा नैराश्याचा आजार आहे, यातील फरक ओळखायला हवा. हे फक्त तज्ज्ञ व्यक्तीच करू शकते.
बरं, पौगंडावस्थेतील मुले निराश किंवा दुखी: दिसतीलच असंही नसतं. त्यामुळे त्यांच्या नैराश्याच्या आजाराच्या अवस्थेकडे दुर्लक्ष होऊ शकतं. बऱ्याच जणांमध्ये आक्रमकता, चिडचिडेपणाही दिसू शकतो. ही मुलांची शिक्षणाची, महत्त्वाची पायाभरणीची वर्षे असतात. पण याच काळात अभ्यासातली एकाग्रता कमी होण्याची, तसेच ऊर्जापातळी कमी होण्याची भीती असते. मग शाळेत अनुपस्थिती वाढते. गुणांची घसरण सुरू होते. मग आत्मविश्वास कमी होऊ लागतो. पूर्वीच्या हुशार मुलाची गुणवत्ता घसरायला लागते. आता याचं पर्यवसान म्हणून अस्वस्थपणा, चिडचिड वाढते. अपराधीपणाची भावना, तसेच आपण निरुपयोगी असल्याची भावना, उत्साहाचा अभाव वाढतो. त्याला कोणत्याही गोष्टीत स्वारस्य उरत नाही. या काळात स्वतःला इजा करून घेण्याचा किंवा आत्महत्येचा विचार मुलांच्या मनात कित्येकदा येत राहतो. या काळात त्यांना सांभाळायला हवे.
या वयात अस्वस्थता निर्माण करणारं किंवा नैराश्य वाढवणारं मुख्य कारण मेंदूतील रासायनिक बदलात असतं. आनुवंशिकता, हार्मोनल चेंजेस, परीक्षेतील अपयश, आई-वडिलांमधील सततच्या भांडणांमुळे येणारा ताण, जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा धक्का यांतून निर्माण होणारा ताण, एकतर्फी प्रेमातले अपयश, यशाबद्दलच्या चुकीच्या कल्पना, नकारात्मक व्यक्तिमत्त्व, स्व-प्रतिमा क्षीण असणे व आयुष्याविषयी नकारात्मक दृष्टिकोन, गंभीर स्वरूपाच्या आरोग्याच्या तक्रारी, लहानपणी ओढवलेला दुर्दैवी प्रसंग व आघात या पैकी काहीही या आजाराला या वयात निमंत्रण देणारं ठरतं.
पौगंडावस्थेतील अस्वस्थता तसेच नैराश्य दुर्लक्ष करण्यासारखं नक्कीच नाही. त्यामुळे जरा दुर्लक्ष केलं की सगळं काही आपोआप ठीक होईल, वयाचा दोष असेल वगैरे गैरसमजुतीत न राहणे चांगले. ताबडतोब तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे चांगले. विश्वासात घेऊन, प्रेमाने आपल्या पाल्याशी बोला. तुम्हाला त्याच्याविषयी काळजी, प्रेम वाटतंय हे त्याला जाणवू द्या.
विश्वासाचं वातावरण तयार करा. आवश्यक वाटल्यास तत्काळ तज्ज्ञांची मदत घ्या. पाल्याच्या वर्तनातले बदल हे नैराश्याच्या आजारापोटी आहेत किंवा कसे हे तज्ज्ञाला ठरवू द्या. बदल कशाहीमुळे असले तरी पाल्याच्या भविष्याच्या दृष्टीने ते दुरुस्त व्हायला हवेत.
आवश्यक औषधोपचार, समुपदेशन, विशिष्ट मानसोपचार पद्धती आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुलाला पालकांकडून व शिक्षकांकडून मिळणारा भावनिक आधार महत्त्वाचा आहे. वेळेवर काळजी घेतली तर आपण कोमेजणाऱ्या कळ्यांना पुन्हा फुलवू शकतो. त्यांना पुन्हा एकदा सुंदर आयुष्य जगायला मदत करू शकतो. त्यांना तुमच्याबद्दल विश्वास द्या. तुमचा आधाराचा हात त्यांच्या हाती द्या.