ऐसी अक्षरे
By Admin | Updated: November 28, 2015 18:16 IST2015-11-28T18:16:20+5:302015-11-28T18:16:20+5:30
अंकाचं काम करणारे काही जण कॅनडात राहतात. काही अमेरिकेत, काही कोलकात्यात, काही जण मुंबईत, आणि काही पुण्यात. ते ऑनलाइन भेटतात आणि सगळेजण मिळून एक अत्यंत दर्जेदार असा व्हर्चुअल दिवाळी अंक काढतात. तो कसा?

ऐसी अक्षरे
>- मेघना भुस्कुटे
दिवाळी संपते. वर्षाकाठच्या सुट्टय़ा घेऊन होतात. एनारायांची एखादी डिसेंबरी भारतवारी होते. दिवाळी अंकाच्या कामात पडलेला पिट्टा, झालेली चिडचिड, घडलेले साहित्यिक वाद, फेसबुकावर झालेला प्रसिद्धी कम धुळवडीचा धमाल धिंगाणा आणि डोकं तरंगत राहावं अशी वाचकांची दिलखुलास दाद हे सगळंही हवेतून हळूहळू काढता पाय घेतं. ‘‘आता मी काही दिवस अजिबात लिहिणार वाचणार नाहीय. ऑनलाइन तर अजिबात येणार नाहीय. बाकी काही आयुष्य आहे का नाही?’’ असा त्रगा करून झालेला असतो.
कागदी दिवाळी अंक वाचताना ‘‘आयला! आपण यांच्या तोडीस तोड अंक काढतो की’’ असा किडा डोक्यात वळवळायला लागलेला असतो. नियमित व्यायामाचे संकल्प सालाबादपणो जुने होतात, नाताळच्या सुट्टय़ा भोगून परतलेले क्लाएण्ट्स नव्या जोमानं पुढय़ात कामं ओतू लागतात आणि एका सकाळी साचत आलेल्या सामूहिक कंटाळ्याला कुणीतरी व्हॉट्सॅप ग्रुपवर वाचा फोडतं :
‘‘यंदा आपण नेलं निभावून! शेवटी अंक भारी निघाला. पण पुढच्या दिवाळीला असली वायङोड धावपळ होता कामा नये. वेळेवर विषय ठरवून कामाला लागायचं!’
हा महिना असतो फेब्रुवारी. हमखास.
दिवाळी अंकाच्या संकल्पनेची खलबतं तशी खासगीत त्याही आधीपासून सुरू असतात. पण आमच्या संपादकीय ग्रुपमधे त्यांना हे असं फेब्रुवारीत तोंड फुटतं.
आम्ही म्हणजे रोज नाक्यावर भेटून, सिगारेटी फुकत, कॉफ्या ढोसत साहित्यिक गप्पा छाटणारे आणि सत्यकथाछाप भणंग-चश्मिष्ट-रोम्यांटिक साहित्यिक वाटलो का तुम्हांला? - चक्क, चुकलात.
आम्ही तुमच्यातलेच आहोत. आयटीत किंवा तत्सम कंप्यूटरी घोडेनाचव्या उद्योगात रोज किमान साडेदहा तास हमाली करणारे, आपापल्या हापिसाचं चकटफू इंटरनेट मन:पूत वापरणारे, नेमानं ट्रॅफिकमधे अडकून ‘भ’कार गिळणारे आणि व्हॉटसॅप-फेसबुकावर भरपूर टीपी करणारे. पण आवडीनं मल्टिप्लेक्सीय सिनेमे आणि नाटकं बघणारे, मोदी-मोदीविरोध-सिनेमा-साहित्य यांवर तावातावानं वाद नि भंकस करणारे - भाषेचा थोडा किडा चावलेले. सर्वसामान्य मराठी लोक. रोज भेटणं सोडा - आमच्यातले सगळे जण सगळ्यांना समोरासमोर भेटलेलेसुद्धा नाहीत.
आमच्यातले काही जण कॅनडात राहतात. काही जण अमेरिकेत, तीन निरनिराळ्या शहरांत. काही जण कोलकात्यात, काही जण मुंबईत, आणि काही जण अर्थात - पुण्यात. पण आमची घट्ट मैत्री आहे. आम्ही रोज व्हर्चुअल गप्पा हाणतो आणि आम्ही सगळे जण मिळून एक अत्यंत दर्जेदार असा व्हर्चुअल दिवाळी अंक काढतो. ‘ऐसी अक्षरे’ नावाचा दिवाळी अंक. आमच्या दिवाळी अंकाला कागदाचं बंधन नसतं. कारण तंत्रज्ञानाच्या कृपेनं इंटरनेट आपल्याच तीर्थरूपांचं आहे. तिथे काहीही छापून प्रसिद्ध करायला कागदाचं चिटोरंही लागत नाही. इंटरनेटच्या मासिक बिलाखेरीज काही खर्च नाही. मग छापखाने, पृष्ठसंख्या, कागदाची नि जाहिरातीची किंमत, संभाव्य खपाचे आकडे यांची गणितं जुळवण्याचाही काही प्रश्न नाही. त्यामुळे आम्हाला बाजारावर डोळा ठेवून ‘तडजोड करावी का?’ असा नैतिकबैतिक पेच कधी पडत नाही. प्रथितयश लेखकांना आणि नवोदित प्रयोगशील लेखकांना आम्ही तितक्याच मोकळेपणानं जाऊन भेटतो आणि आमच्या त्या-त्या वर्षीच्या संकल्पनेबद्दल लिहिण्याची गळ घालतो. यांत रूढ अर्थी साहित्यिक असतात, तसेच त्या- त्या क्षेत्रंमधले दिग्गज उच्चशिक्षित किंवा जाणकारही असतात. त्यांना पुरेशी मेहनत घेऊन लिहिण्यात रस हवा फक्त. आम्हाला उत्तम, विचार करायला लावणा:या, वाचकाला धरून ठेवणा:या लेखनाशी मतलब आहे. नाव तितकंसं महत्त्वाचं नाही. तो आमचा निकष तर नाहीच नाही.
आम्ही प्रयोग करायला भीत नाही. पलीकडल्या वर्षी नाही का, आम्ही चक्क अशी कविता छापली होती, जी तुमच्या बोटाच्या मर्जीनुसार रूप पालटेल. वाटतं ना अचाट? धनंजयची ‘सामसूम एक वाट’ ही कविता सुरुवातीला एक ओळ सादर करते. मग तिच्यातल्या आवडलेल्या शब्दावर तुम्ही क्लिक केलंत, की पुढची ओळ देते. पुन्हा हव्या त्या शब्दावर क्लिक केलंत की पुढची ओळ. मजा म्हणजे, शब्द बदलला की पुढची कविताही बदलते. असले काहीही.
धमाल मल्टिमीडिया प्रयोग आम्ही करत असतो. प्रयोगाला वाव देतो किंवा व्यावसायिक गणितांना फाटय़ावर मारतो, म्हणजे दर्जाबद्दल आम्ही यथातथा असतो असं मात्र नव्हे. आम्ही त्या बाबतीत अत्यंत व्यावसायिकाहूनही व्यावसायिक आहोत. लेखक ही जमात अतिशय आळशी असते, हे आम्ही (आमच्यावरूनच!) पक्कं ओळखून आहोत. त्यामुळे आम्ही फेसबुकावरून-व्हॉट्सॅपवरून-इमेलीवरून आमच्या लेखक मंडळींशी सहा-सहा आठ-आठ महिने आधीपासून संधान बांधून असतो. (खोटं नाही, आमच्या भा. रा. भागवत विशेषांकात (http://666. ं्र2्रं‘2ँं1ी.ूे/ु1ु31) लिहिणा:या लेखकांना विचारा!) त्यांच्या लेखनाची तीन-तीन वाचनं होतात. त्यावर चर्चा होते. लेखकाचा शब्द अंतिम हे मानून पण शक्य तितक्या जास्त अभिप्रायांचा आणि शब्दाशब्दाचा विचार करून आमची ही संपादकीय झकाझकी चालते. आणि मजा म्हणजे मुख्य धारेत लिहिणारे लेखकही आमच्या या संपादकीय मेहनतीची किंमत चोख जाणून असतात. कुरकुर न करता आमच्यासोबत आवडीनं काम करतात.
साहजिकच आहे, आम्ही त्यांचे लाड करतो, त्यांच्या लेखनावर भरपूर मेहनत घेतो, त्यांना भरपूर वेळ देतो आणि अंक अजिबात विक्रीसाठी नसताना (होय होय, चकटफू. कुणीही आमच्या सायटीवर या नि वाचा! हवं तर, तुमचं म्हणणं मांडा, दाद पोचवा, सामील व्हा.) आम्ही लेखकांना मानधनही देतो. त्यांना लिहायला वेळ नसेल, पण त्यांचं म्हणणं पुरेसं महत्त्वाचं आहे असं आम्हाला वाटलं तर आम्ही त्यांची मुलाखत रेकॉर्ड करतो (फोन वा प्रत्यक्ष वा कसंही) आणि चक्क आपसांत वाटून घेऊन स्वहस्ते लिहून काढतो. मुद्रितशोधन करतो - एकदा नाही, तीन वेळा. त्या लेखनासाठी चित्रं-रेखाटनं काढतो. आणि मग दृष्ट लागण्यासारखं जे रसायन तयार होतं, त्याची भरपूर जाहिरात करून ते वाचकांपर्यंतही पोचवतो. आम्ही आपापली कामं नि रुटीनं सांभाळून हे सगळं हौसेनं, रात्री जागवून, डोळे तारवटवून करतो. याचं एकमात्र उत्तर आहे : कारण आम्हांला ‘खाज’ आहे. आम्हाला आमच्या भाषेत - आमचं आजचं - समकालीन - स्मार्ट आणि संवेदनशील जगणं लिहायची आणि वाचायची खाज आहे. या खुजलीखातर आम्ही ‘ऐसी अक्षरे’ गिरवतो. इथे लिहा-वाचायला पै लागत नाही, तशी उच्चभ्रू-हायफंडू लोकांच्यात उठबसही लागत नाही. फक्त ऑनलाइन असलं की भेट होऊ शकते!
‘ऐसी अक्षरे’साठी -लिंक
((http://www.aisiakshare.com/
tdiwali15)