सशक्त, सम्यक विचारांसाठी...
By Admin | Updated: August 23, 2014 13:45 IST2014-08-23T13:45:50+5:302014-08-23T13:45:50+5:30
महाराष्ट्रात जेव्हा बुवाबाजीचे पेव फुटले होते, कुठल्याशा गावात अचानक चमत्कारी बाबा प्रकट होत होते, अंधश्रद्धांचा बाजार भरला होता, तेव्हा डोळस विचार करणार्या कार्यकर्त्यांची एक फळी महाराष्ट्रात कार्यरत झाली. थोडी थोडकी नव्हे, गेली पंचवीस वर्षे हे कार्यकर्ते समाजाच्या विवेक जागरासाठी धडपडत आहेत.. या प्रवासाचा मागोवा व पुढील आव्हानांचा वेध.

सशक्त, सम्यक विचारांसाठी...
अविनाश पाटील
महाराष्ट्रामध्ये १९७0च्या दशकापर्यंत धर्मचिकित्सेची परंपरा कृतिशील राहिली. त्याला त्या आधीच्या दीडशे वर्षांच्या समाजसुधारकांच्या जीवनकार्याचा वारसा लाभला. १९७0पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरे हे त्या दीडशे वर्षांच्या परंपरेतले शेवटचे दुवे ठरले. त्यानंतरची जवळपास दोन दशके अंधश्रद्धा आणि धर्मचिकित्सेच्या अंगाने काही चर्चा घडत नव्हती. त्याला ‘किलरेस्कर’सारख्या मासिकाचा अपवाद होता. १९८२-८३मध्ये महाराष्ट्रात विज्ञानवादी विचार करणार्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने बी. प्रेमानंद या तमिळनाडूमधल्या रॅशनॅलिस्ट ज्येष्ठ कार्यकर्त्याचा दौरा आखला गेला. भारतात किंवा आशिया खंडामध्ये चमत्काराला आव्हान आणि बाबाबुवांचा भांडाफोड करण्याची रुजवात ज्या डॉ. अब्राहम कोऊर यांनी केली, त्यांच्या पठडीत बी. प्रेमानंद तयार झालेले होते. महाराष्ट्राच्या दौर्यात अनेक ठिकाणी त्यांनी विविध चमत्कारांची प्रात्यक्षिके जाहीरपणे सादर केली. त्यामध्ये प्रामुख्याने आग खाणे, आग खेळवणे, आगीवरून चालणे, झोपून अधांतरी तरंगणे, केसाने गाडी ओढणे, अंगावर चाबकाने फटके मारून घेणे, शरीरामध्ये अणकुचीदार तारा खुपसून घेणे अशा पद्धतीचे अघोरी चमत्कारांचे सादरीकरण करून दाखवले जात होते. त्याला जत्रेसारखी गर्दी जमा व्हायची. बी. प्रेमानंद इंग्रजीमधून आपले म्हणणे मांडायचे. त्याचे मराठीत भाषांतर करून देण्याचे काम करण्यासाठी आणि एकूण दौर्याचे संयोजन करण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतले कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यातून त्यांच्या लक्षात आले, की अंधश्रद्धेचा प्रश्न गंभीर स्वरूपात अस्तित्वात आहे आणि त्याच्याबद्दल जनमानसामध्ये प्रचंड कुतूहल आणि उत्सुकता आहे. प्रेमानंदांच्या दौर्यानंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल व्याख्याने आणि लिखाण सुरू झाले. त्यातून प्रभावित झालेल्या कार्यकर्त्यांचे गट उभे राहायला सुरुवात झाली. संघटितपणे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्याचा विचार आणि त्याला वैचारिक अधिष्ठान असण्यासाठी त्याची स्पष्टता मिळविण्याचा प्रयत्न विविध शिबिरे आणि बैठकांमधून महाराष्ट्रात सुरू झाला. त्यामध्ये नागपूर, सातारा, चोपडा, पुणे, लोणावळा, वाई या ठिकाणी महत्त्वपूर्ण शिबिरे झाली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या मार्गदर्शनाखाली वाईला प्राज्ञ पाठशाळेच्या वतीने शिबिर घेऊन अंधश्रद्धेला धर्मात स्थान आहे का, यासंबंधी आणि देवाच्या व विश्वाच्या उत्पत्तीच्या विविध सिद्धांतांची चर्चा घडवून आणली गेली. त्यानंतर महाराष्ट्रात संघटितपणे काम सुरू करण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी पुढाकार घेतला. १९८९मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम स्वतंत्रपणे सुरू झाले. १९९१मध्ये पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलनाची जाहीरनामा परिषद संयोजित केली गेली. त्यानिमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलनाची वाटचाल कुठल्या दिशेने आणि कुठल्या टप्प्यांमधून करता येऊ शकते, याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला. त्यामुळे पुढील डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नेतृत्वात सलग २५ वर्षे उभ्या राहिलेल्या संघटित कामाचे दिशादिग्दर्शन व्हायला मदत झाली. चमत्काराला विरोध, बाबाबुवांचा भांडाफोड आणि अमानुष अघोरी प्रथांच्या विरोधी प्रबोधन यांपासून सुरू झालेले काम आता विवेकवाद आणि मानवतावादाच्या प्रस्थापनेसाठी प्रयत्न करण्यापर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमधून ८0च्या दशकात अनेक बाबाबुवांचे पीक उभे राहिले होते; परंतु २५ वर्षांच्या वाटचालीनंतर असे म्हणता येऊ शकेल, की उघडपणे चमत्कारांचा दावा करणारे आणि त्यासाठी सिद्ध करण्याची तयारी असणारे बुवाबाबा आता महाराष्ट्रात राहिले नाहीत. हे चळवळीचे र्मयादित अर्थाने यश म्हणता येऊ शकेल. अंधश्रद्धांची दुसरी बाजू, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार व प्रचार, प्रसार करणे आहे, असे मानून महाराष्ट्र अंनिसने त्यासाठी स्वतंत्र आघाडी उभारली. भारतीय संविधानाला अभिप्रेत नागरिकत्वाच्या कर्तव्यांचा भाग असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे शिक्षणाच्या गाभा घटकाचा महत्त्वपूर्ण भाग झाला आहे. महाराष्ट्राच्या मूल्यशिक्षणांतर्गत एक महत्त्वाचे मूल्य म्हणून त्याला स्वीकारले गेले. असे असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात त्याच्या विपरीत वर्तन आणि त्याचे कठिणीकरण झालेल्या श्रद्धेतून सर्मथन होताना दिसते. त्यामुळे स्वतंत्रपणे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार संस्कारित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित होते. म्हणून महाराष्ट्र अंनिसने वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाच्या अंतर्गत आत्तापर्यंत हजारो शिक्षकांना आणि लाखो विद्यार्थ्यांंना प्रबोधित करण्याचा प्रयत्न केला आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या सोयीसुविधांचा वापर करून वैज्ञानिक दृष्टिकोन हा जीवनकौशल्याचा भाग मानून कृतिशील करण्यासाठी विशेष प्रयत्नांची आखणी आता अंनिस करत आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी धर्मचिकित्सेचा असलेला अतिशय सर्मथ व कृतिशील वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सतत करते. समाजसुधारकांच्या जीवनविचारांना उजळणी देण्यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या द्विदशकपूर्ती वर्षानिमित्त वारसा समाजसुधारकांचा - अंधश्रद्धा निर्मूलनाचा विवेकाचा अशी मोहीम २00९मध्ये समितीतर्फे राबवण्यात आली. माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणार्या सण, उत्सवांना कालसुसंगत पर्याय देण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातील पर्यावरण र्हास आणि कालविसंगतीवर बोट ठेवून समाजाला विचारप्रवृत्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून गेल्या दशकभरात काही उपक्रम महाराष्ट्राच्या समाजमनाने स्वीकारल्याचे दिसते. त्यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव, पर्यावरणीय होळी, सर्पविज्ञान प्रबोधन, फटाकेविरोधी अभियान यांसारख्या कृती कार्यक्रमांचा समावेश करता येऊ शकेल. उपक्रमशीलतेतून मूल्यविवेकाचा संवाद समाजात घडवून आणण्यावर महाराष्ट्र अंनिसचा विश्वास आहे. त्यासाठी कालसुसंगत आणि भविष्यवेधी उपक्रम समाजाला देण्याचे प्रयत्न अंनिसच्या कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग आहेत. व्यापक समाजपरिवर्तनासाठी विविध आघाड्यांवर कार्यरत असणार्या संस्था, संघटना गटांसोबत जोडून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला अधिक गतिमान व परिणामकारक करण्याचा प्रयत्न समिती करत असते. त्यातूनच संविधान बांधिलकी महोत्सव, जातपंचायतीला मूठमाती अभियान, मानसिक आरोग्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन, फसव्या विज्ञानाच्या विरोधी प्रबोधन व संघर्ष आणि आध्यात्मिक संप्रदायाच्या नावाखाली सुरू असलेल्या बुवाबाजी व शोषणाला विरोध करण्याचा प्रयत्न समिती करत आहे. भारतीय संविधानाला अभिप्रेत मूल्य आशय, कृतिशील करण्यामध्ये आवश्यक प्रबोधन, प्रशिक्षण आणि शक्यतेनुसारचा संघर्ष करण्याची भूमिका महाराष्ट्र अंनिसची राहिली आहे. त्यासाठी संविधानाचे जागरण प्रामुख्याने देशाच्या युवक- युवतींसाठी करण्याला भविष्यात प्राधान्य दिले पाहिजे, असे वाटते. त्यातूनच शोषण करणार्या, दिशाभूल करणार्या अंधश्रद्धांना विरोध उभा राहू शकेल. आधुनिक विचारसरणी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून अंगीकारण्याची शक्यता निर्माण होईल आणि सशक्त व सम्यक विचार करणारा भारतीय नागरिक उभा राहण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकू, असे वाटते.
(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष आहेत. )