सोशल तरूणाई
By Admin | Updated: October 11, 2014 19:09 IST2014-10-11T19:08:10+5:302014-10-11T19:09:29+5:30
महाराष्ट्रातील विधानसभेची या वेळची निवडणूक पंचरंगी होणार आहे. गंमत म्हणजे, या निवडणुकीच्या रणधुमाळीत मनामनांवर गारूड केले आहे तेदेखील अशाच पंचरंगी सोशल मीडियाने. फेसबुक, व्हॉट्सअँप, ट्विटर, यू ट्यूब आणि ब्लॉग या पंच माध्यमांच्या सहभागाने निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. या नवमाध्यमांचा प्रसार व प्रभाव आहे तरी कसा?

सोशल तरूणाई
>- डॉ. दीपक शिकारपूर
पूर्वी मुलं गप्पा मारण्यासाठी कट्टय़ावर किंवा एखाद्या चौकात जमायची; परंतु आता गप्पांसाठी उठून कुठे जायची गरजच उरली नाही. हातात इंटरनेट नावाचे एक आयुध आले. त्यात सोशल मीडिया नावाचे शस्त्र आले आणि तरुणाईच्या आवाक्यात आकाश आले. राजकारण, निवडणुका यांचेही व्यासपीठ तिथेच भरले. अशा बदलत्या तरुणाईविषयी..
तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये माहिती आणि संवादाचे तंत्रज्ञान (इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी झ्र कउळ) सर्वांत आघाडीवर आहे. यामुळे पूर्वी असलेले अंतराचे बंधन आता नाहीसे झाले आहे आणि आज सर्वांना सर्व प्रकारची माहिती मिळू शकते, तसेच परस्परांशी गतिशील संवादही होऊ शकतो. अशा प्रकारे सर्व जग जोडले जाऊन ‘ग्लोबल व्हिलेज’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. तंत्रप्रणालींच्या संयोगांमुळे विशेषत: चित्र, ध्वनी आणि माहितीच्या एकत्रित वापरामुळे झ्र एकात्मिक माहिती, संवाद आणि करमणुकीचे एक वेगळेच दालन उघडले आहे. इंटरनेट ही चैनीची बाब नसून, एक अत्यावश्यक घटक बनत चालली आहे.
घराबाहेर पडताना पूर्वी घरातील मंडळी आपल्याला विचारत असत, रुमाल घेतला का? पाकीट व्यवस्थित आहे ना? आता त्यात अजून काही गोष्टींची भर पडली आहे. मोबाईल, लॅपटॉप आता त्याच यादीत आले आहेत. आपली मुले जेव्हा म्हणतात, की मित्राबरोबर गप्पा मारत होतो, याचा अर्थ पूर्वी कट्टा, पटांगण असं आपण समजायचो. परंतु आताच्या पिढीत गप्पा या ूँं३, ल्ल’्रल्ली, ६ँं३२ंस्रस्र अशा असतात. पूर्वीच्या कट्टा, अड्डय़ांची जागा याने घेतली आहे.. सोशल नेटवर्किंग फक्त वैयक्तिक गप्पाटप्पांसाठीच उपयुक्त नसून, दैनंदिन व्यवहारातील दळणवळण त्यामुळे व्यक्तिसापेक्ष झाले आहे. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीची जागा ‘घरोघरी ाूंीु‘’ आणि ३६्र३३ी१ने घेतली आहे. जन्मापासून संगणकीय युगातच वावरणारी म्हणजे साधारण १९९५ नंतर जन्मलेली मुले-मुली यांच्या इंटरनेटकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मूलभूत फरक असणार आहेच. आजच्या मुलांना ‘डिजिटल नागरिक’ म्हणतात. त्यांच्या संभाषणाच्या, गप्पा मारायच्या, संवादाच्या कल्पना पूर्णपणे वेगळ्या आहेत. अशा व्यक्ती इंटरनेटला आपल्या मानसिक व बौद्धिक क्षमतांचे एक एकात्मिक, विस्तारित अंगच मानतात. आभासी (व्हच्यरुअल) अनुभवांच्या विश्वाचे तर इंटरनेट हे प्रवेशद्वारच आहे. आभासी अनुभव घेण्याच्या शक्यतेमुळे काही काळाने मानवी मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीमध्येच विलक्षण फरक पडू शकेल. इंटरनेट उशाशी घेऊनच ही नवी पिढी इंटरनेटला आसपासच्या वातावरणातून वेगळे काढूच शकणार नाही आणि विचार करण्याइतक्या किंवा बोलण्याइतक्याच सहजपणे त्यांच्याकडून इंटरनेटचा व सोशल मीडियाचा वापर केला जाईल.
लोकांचे मोठय़ा संख्येने इंटरनेटवरील अनेक सोशल साईटवरून एक ‘अस्तित्व तयार झाले आहे. इंटरनेटवरील सोशल मीडिया हा जगभरातील नागरिकांच्या आयुष्यातील व समाजातील एक महत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करून अनेकांना लोकांपर्यंत आपले विचार, मते, माहिती पोहोचविण्याचा एक नवा मार्ग पुढे आला आहे.
गेल्या काही महिन्यांत सोशल नेटवर्क वापरकर्त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. या वर्षाखेरपर्यंत शहरी भारतातील सोशल मीडिया वापरकर्त्यांची संख्या नऊ कोटींचा टप्पा ओलांडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इंटरनेटची वाजवी किमतीतील सहज उपलब्धता, स्मार्टफोन्स आणि आकर्षक डेटा प्लॅन्स यामुळे सोशल मीडियाच्या वापरामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. युवा पिढीबरोबरच अनुभवी व्यावसायिकही या नवीन कार्यसंस्कृतीत सहभागी होत आहेत. मोबाईल, आय फोनसारख्या सतत बदलत्या उपकरणांतील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया सतत बदलती व सुटसुटीत होत आहे. व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी कंपन्यांकडून या नेटवर्किंगचा फार मोठय़ा प्रमाणात उपयोग केला जाईल. ग्राहकाला माहिती देण्याची सध्याची मानसिकता बदलून ती संवादाकडे नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न उद्योगविश्वाकडून केला जाईल.
नागरिक पत्रकार म्हणजेच सिटीझन र्जनालिस्ट हा सध्याच्या संगणक आणि माहिती तंत्रज्ञान युगात एक अभिनव आणि बर्यापैकी विश्वासार्ह असा जनतेचा थेट सहभाग असणारा पैलू समोर येऊ लागला आहे. तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या संपर्क सुविधांमुळे एरवी आत्मकेंद्रित झालेला समाज आता हळूहळू बोलायला लागला आहे. ओसामा बिन लादेन याला मारण्यासाठी अमेरिकन हेलिकॉप्टर्स जेव्हा घिरट्या घालत होती, ती बातमी एका संगणक अभियंत्याने दिली. त्याने प्रथमत: ती घरघर ऐकली आणि ती माहिती ट्विटरवर टाकली. त्या वेळी त्याच्या संपर्कात केवळ ७५0 व्यक्ती होत्या; पण या बातमीने त्याच्या संकेतस्थळावर झुंबड उडाली. त्याची संख्या झाली ८६ हजार. आंतरराष्ट्रीय महत्त्वाची बातमी सर्वप्रथम जाहीर करण्याचे श्रेय अशा प्रकारे एका नागरिक पत्रकाराला मिळाले. विकिपीडिया हे या वाचकांच्या सहभागातून त्यांनी तयार केलेल्या मजकुराच्या, माहितीच्या महाजालामुळे केवढय़ा प्रमाणात विस्तारित झाले आहे, ते आपण पाहतो आहोतच. विकीन्यूज हे त्यांचे संकेतस्थळ हे नागरिक पत्रकारितेलाच वाहिलेले आहे.
सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे निवडणुका- त्यावरही संगणकीय तंत्र आणि उपकरणांनी स्वत:चा ठसा उमटवला आहे. प्रत्यक्ष मतदानापासून विजयी उमेदवाराबाबतचे अंदाज वर्तवण्यापर्यंतच्या अनेक पैलूंमध्ये हे तंत्रज्ञान समाविष्ट झालेले आढळते. सर्वच उमेदवारांच्या मतदानाआधीच्या प्रचाराची धामधूम आता सोशल मीडियामुळे चांगलीच बदलली आहे! उमेदवाराची प्रतिमा, त्याने केलेली विधाने या बाबींना एफबी आणि ट्विटरवर जास्तीत जास्त लाइक्स आणि शेअरिंग मिळविणे हे प्रत्यक्ष मिरवणुका, पोस्टर आणि हॅँडबिलांइतकेच किंवा त्यांपेक्षाही महत्त्वाचे मानले गेले आहे. स्मार्टफोन आणि इतर तंत्रांच्या प्रसाराच्या विलक्षण वेगामुळे हे शक्य झाले आहे. संगणकीय तंत्राचा एक नवीन आविष्कार या वेळी पाहायला मिळाला आहे. मतदारांचा आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक स्तर तसेच वयोगटाबाबतची माहिती एकत्रितपणे देणारे नकाशे दाखविणे व मुख्य म्हणजे ते एकमेकांवर ठेवून (सुपरइंपोज पद्धतीने) पाहणे शक्य झाले आहे. उदा. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्या क्षेत्रातील कशा प्रकारच्या मतदारांनी कोणत्या पक्षाला मतदान केले, हे सुपरइंपोज केलेल्या नकाशांच्या साह्याने अल्पावधीत मनोरंजक पद्धतीने पाहता आले.
भारतातील तरुणाई या सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करीत आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधीही दिवसागणिक निर्माण होत आहेत. विविध प्रकारची सॉफ्टवेअर, अँप, साइट यांच्या निर्मितीचा आणि तदनुषंगिक उत्पादनांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. सोशल मीडिया ही एक ताकदच सर्वसामान्य वाचकांना लाभली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इतर माध्यमे जसे टीव्ही, बातमीपत्र इत्यादींमार्फत फक्त एका दिशेने संवाद किंवा संपर्क साधला जाऊ शकतो. याउलट, या सोशल मीडियामधून दोन्ही बाजूंनी म्हणजेच वाचक व संपादक संपर्क होऊन संभाषण घडू शकते. त्वरित माहितीचा प्रसार व आदानप्रदान हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पण, या माध्यमाचा गैरवापरही होताना आढळून येत आहे.
प्रसिद्ध व्यक्तींच्या निधनाच्या अफवा, खोट्या बातम्या या माध्यमाच्या शक्तीबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत आहेत. त्यातच आता विघातक शक्ती फूट पाडून, दंगली, हिंसाचार घडविणे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून खोट्या क्लिप्स दाखवत आहेत. चलत्चित्रणात बदल करून आपल्याला हवे ते चित्रण निर्माण करणे व चित्रे अदलाबदल करून विपर्यास व भडक दृश्ये अशा साईटवर टाकणे, हा आता काही समाजकंटकांचा पूर्णवेळ उद्योग झाला आहे. यावर उपाययोजना करणे अवघड आहे. देशातील सायबर कायदे सक्षम आहेत; पण त्यांची अंमलबजावणी वेळखाऊ आहे. काही अपवादात्मक बाबींत त्वरित अटक झालीही आहे.
अस्तित्वात असलेल्या मानवी नातेसंबंधांचा दर्जा व खुमारी वाढविण्यासाठी तंत्रज्ञान वापरणे हेच केव्हाही श्रेयस्कर.
(लेखक संगणकतज्ज्ञ आहेत.)