निरागस प्रदीप

By Admin | Updated: August 9, 2014 14:27 IST2014-08-09T14:27:58+5:302014-08-09T14:27:58+5:30

अभ्यासात अत्यंत हुशार, एकपाठी असा एक मुलगा; पण अतिसंवेदनशीलतेमुळे त्याचे मन एकदा दुखावले आणि मग सुरू झाली सगळ्याच पातळ्यांवर पीछेहाट.. अशा वेळी त्याला सावरणारं, मनापासून समजून घेणारं कुणी तरी हवं असतं. काय झालं त्याचं पुढे?

Niragas Pradeep | निरागस प्रदीप

निरागस प्रदीप

 डॉ. संप्रसाद विनोद

 
खास मुंबईहून भेटायला आलेले प्रदीपचे आई-वडील माझ्यासमोर बसले होते. सोबत त्यांचा मोठा मुलगा प्रदीप होता. तो टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत होता. दुसरा मुलगा बारावीत शिकत होता. कुरतडकर स्वत: एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला होते. त्यांच्या पत्नी शाळेत शिक्षिका होत्या. दोघं मध्यमवर्गीय. कुटुंबवत्सल. मुलांची जिवापाड काळजी घेणारे. त्यांच्यावर उत्तम संस्कार करण्याचा प्रयत्न करणारे आदर्श पालक. प्रदीपचं वय १८ वर्षे. जन्म, शिक्षण, सगळं मुंबईत झालेलं. निरागस चेहर्‍याचा प्रदीप शाळेत असल्यापासून एकमार्गी अभ्यास करणारा. सर्व परीक्षांमध्ये कायम पहिल्या, दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण होणारा शहाणा मुलगा. मुंबईच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या जगात राहून हा एवढा निरागस कसा? असा प्रश्न त्याला पाहून मला पडला. 
‘गेल्या काही महिन्यांपासून प्रदीप सतत काहीतरी विचारात गुरफटलेला असतो.’ काळजीच्या सुरात प्रदीपच्या आईने त्याची ‘कथा’ आणि तिची ‘व्यथा’ सांगायला सुरुवात केली. ‘प्रदीप आता पूर्वीसारखा अभ्यास करत नाही. सतत कावरा-बावरा असतो. त्याला कशाची तरी भीती वाटते. पण, नेमकं कारण काही समजत नाही. आपणहून तो नीट काही सांगत नाही. नेहमीसारखं जेवत नाही. पण, येता-जाता काहातरी अबर-चबर खात राहतो. वजन खूप वाढलंय. रक्तदाब सुरू झालाय. नेहमी १५0/९0-१00 असतो. आम्हाला काय करावं ते समजेनासं झालंय. तुम्हीच त्याला आता या अडचणीतून बाहेर काढा.’ गहिवरल्या आवाजात डोळ्यांतले अश्रू पुसत त्याची आई म्हणाली. वडीलही चिंतातूर होते, पण ते भावनांना आवर घालू शकले. 
प्रदीपशी बोलताना लक्षात आलं, की त्याचं बालपण तसं सामान्य राहिलं होतं. आईवडिलांमध्ये सुसंवाद होता. त्यांची भांडणंही क्वचितच व्हायची. झाली तरी ती लगेच मिटायचीही. भावाशी त्याचं चांगलं पटायचं. मग, नेमकी अडचण कुठे होती? याचा शोध घेता घेता असं आढळलं, की एका कुठल्यातरी परीक्षेत त्याला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे त्याचे शिक्षक त्याला रागावले आणि त्याने ते प्रमाणाबाहेर मनाला लावून घेतलं. ‘शहाण्याला शब्दाचा मार’ या वचनाचं तो मूर्तिमंत उदाहरण होता. वस्तुस्थिती अशी होती, की त्याच्या हुशारीमुळे शिक्षकांना त्याच्याकडून काही रास्त अपेक्षा होत्या. त्याने आपल्या निसर्गदत्त बुद्धिमत्तेला चांगला न्याय द्यायला हवा अशा शुद्ध हेतूनेच ते त्याला रागावले होते. प्रदीपच्या आई-वडिलांनी नंतर ही गोष्ट मला सांगितली. मलाही त्यात काही अयोग्य वाटलं नाही. पण, प्रदीप खूप संवेदनशील असल्यामुळे हे सगळं घडलं असं त्याच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं. एवढय़ा हळव्या मुलाचं या जगात कसं होणार अशी मला काळजीही वाटली. मग, त्याच्या आई-वडिलांचं काय होत असेल याचा मी विचार करू लागलो. 
सुदैवाने, काही भेटीनंतर प्रदीप आणि त्याच्या आईवडिलांशी माझा चांगला सुसंवाद प्रस्थापित झाला. ती दोघं आपले सगळे व्याप सांभाळून विनातक्रार, दर शनिवार-रविवार दीर्घ काळ पुण्याला येत राहिले. मला या गोष्टीचं खूप विशेष वाटायचं. एकदा त्यांना तसं बोलून दाखवल्यानंतर ते म्हणाले, ‘अहो आमचा प्रदीप फार गुणी मुलगा आहे. त्याच्यासाठी वाट्टेल ते कष्ट सोसण्याची आमची तयारी आहे.’ आईवडिलांचं इतकं छान आणि भक्कम पाठबळ असल्यामुळे प्रदीप हळूहळू मोकळा होत गेला. त्याच्याबरोबर मग संवेदनशीलता म्हणजे काय, ती कशी समजून घ्यायची, ती प्रमाणाबाहेर वाढणार नाही याची काळजी कशी घ्यायची, तिला विधायक दिशा कशी द्यायची याविषयी माझ्या अनेक मुक्तचर्चा झाल्या. चर्चांच्या वेळी तो आपली मतं स्पष्टपणे मांडू लागला. त्याचं हळवेपण हळूहळू कमी झालं. 
अभ्यास, परीक्षेत मिळणारे गुण, या गुणांचं मोल आणि र्मयादा या विषयांवरदेखील आमचं बोलणं व्हायचं. काही उदाहरणं देऊन ‘काल्पनिक भीती’ ही ‘वास्तविक भीती’ पेक्षा कशी जास्त असते आणि आपण लोकांना प्रभावित करण्यासाठी काही करायचं नसतं, तर व्यक्त होण्यातला आनंद घेण्यासाठी प्रत्येक गोष्ट करायची असते हे त्याला विस्ताराने समजून सांगितलं. तो मनाने अधिकाधिक खंबीर होत गेला. शेवटी, त्याच्यासारख्या निरागस, निष्पाप मुलाला लोकांनी फसवू नये इतपत ‘व्यावहारिक चातुर्य’ त्याच्यामध्ये निर्माण व्हावं या बाबतीतदेखील त्याची तयारी करून घ्यावी लागली.
बुद्धीने चांगला आणि अंत:करणाने निर्मळ असल्यामुळे त्याला योगविद्येतल्या काही महत्त्वाच्या संकल्पना समजावून सांगणं, त्यावर चिंतन, मनन आणि प्रयोग करायला प्रवृत्त करणं मला सोपं गेलं. त्याला काही अडचणी आल्या तर तो दूरध्वनीवरून बोलून त्यांचं निराकरण करू लागला. नियमित योगसाधना करू लागला. विशेष म्हणजे, उपचारासाठी बर्‍याच वेळा मुंबई-पुण्याच्या फेर्‍या कराव्या लागल्या तरी त्याच्या आईवडिलांकडून त्रासिकता, नाराजी, काय कटकट आहे असा सूर कधी उमटला नाही. नेहमी सर्व प्रकारचं सहकार्य मिळालं. मुख्य म्हणजे, प्रदीपच्या आईवडिलांनी त्याला त्याच्या अडचणीच्या काळात जे ‘समग्र स्वीकाराचं’ बळ दिलं. त्यामुळे, उपचारप्रक्रियेला मोठी बळकटी मिळाली. 
यथावकाश प्रदीप खूप बदलला. त्याचं शिक्षण पुरं झालं. उत्तम नोकरी मिळाली. लग्न झालं. मूल झालं. एका बावरलेल्या सद्गुणी मुलाचं चांगलं होणं हे योगविद्येच्या व्यापक अधिष्ठानाची आणि परिणामकारकतेची खात्री पटवणारं ठरलं. 
 (लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरूआणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)

Web Title: Niragas Pradeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.