संयम : मनाचा सच्चा साथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 04:14 PM2020-03-16T16:14:55+5:302020-03-16T16:18:11+5:30

महान तत्त्ववेत्त्यांनी जीवनात संयमाला मानाचे स्थान दिले आहे. दु:ख वा नैराश्याच्या वादळात आपल्याला खंबीर साथ देणारा अन् संताप वा अत्यानंदाच्या लाटेतदेखील वाहून न जाऊ देणारा संयम हाच आपला खरा सखा.

Moderation: The true companion of the mind | संयम : मनाचा सच्चा साथी

संयम : मनाचा सच्चा साथी

googlenewsNext

डॉ. धनंजय गिरमल

आपल्या रोजच्या जगण्यात हमखास उपयोगी पडणारे तसेच मनोव्यापाराच्या दैनंदिन घडामोडीत प्रकर्षाने आढळणारे दोन मनोगुण म्हणजे संयम आणि आक्रमकता. संतुलितपणे वापर करू तर हे दोन्ही गुणच. असंतुलित वापर करू तर दोघांचीही गणना दोषांमध्येच. दोन्हीही मनाचे तोला-मोलाचे साथीदार; पण यांना उपयोगी ठरवायचं का उपद्रवी, ही कळीची गोष्ट मात्र ज्याच्या-त्याच्या बुद्धी व भावनेच्या हातात. (थोडी विचाराने वागते ती ‘बुद्धी’ अन् बेधडक स्वभावाची ती ‘भावना’ अशी समजुतीची वाटणी करू.)

हल्लीच्या जगात जो तो शक्तीचीच पूजा करतोय अन् संयम कुचकामाचा ठरविला जातोय. घराचा विचार करू तर स्वत:ला हवं तसंच जगता यावं म्हणून प्रत्येक सदस्य आक्रमक. शाळेत आपल्या पाल्याला कुणी इतकंसं बोलायचा अवकाश, लगेच पालक आक्रमक. राज्यकर्त्यांना काही सुचवायला जावं तर कार्यकर्ते आक्रमक! महान तत्त्ववेत्त्यांनी जीवनात संयमाला मानाचे स्थान दिले आहे; पण व्यवहारामध्ये मात्र संयमाची भ्याडपणाशी सांगड घातल्याने माणूस वैयक्तिक व सामाजिक पातळीवर आक्रमक बनत चालला आहे. जे प्रत्यक्ष जगण्यात आक्रमक बनण्याचं साधं धाडसही करू शकत नाहीत,

ते समाजमाध्यमांच्या आडोशाने प्रतिक्रियावादी बनत आहेत. वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरील हा अनाठायी आक्रमकपणा भविष्यात विश्वशांतीला धोका पोहोचविणार हे नक्की. दु:ख वा नैराश्याच्या वादळात आपल्याला खंबीर साथ देणारा अन् संताप वा अत्यानंदाच्या लाटेतदेखील वाहून न जाऊ देणारा संयम हाच आपला खरा सखा. आपल्या पाल्यांच्या प्रगतीमधील छोट्याशा अडथळ्यानेही हवालदिल होणारे आजकालचे अतिकाळजीवाहू पालक अन् छोट्याशा पराभवानेही नैराश्याच्या आहारी जाणारे त्यांचे पाल्य, तसेच तमाम विद्यार्थी, परीक्षार्थी व नवतरुण यांना संयम आत्मसात करण्याची खरी गरज आहे, असं नाही का वाटत?
संयम हा मैत्रीबरोबरच अनेक नात्यांमधील बंध घट्ट राखणारा एक बुलंद सेतू आहे. आपल्याला आनंदानं जगायचं असेल तर नाती जपावीच लागतील. संयमाविना नाती जपताही येणार नाहीत. गैरसमज व अविश्वास यांच्या कैचीत सापडलेल्या नात्यांतील निर्भेळ गोडवा एकमेकांना समजावून घेण्यात तसेच समानतेच्या पातळीवर राहण्यातच आहे. एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वावर आक्रमण करण्यात मुळीच नाही. आत्मसन्मानाच्या खुळचट कल्पनेमुळे घटस्फोटाच्या टोकावर उभ्या असंख्य जोडप्यांनी खरोखरीच थोडा जरी संयम धारण केला, तर त्यांच्या संसाराची चाकं सकारात्मकतेने धावतील. हे नक्की!

मनाचा धैर्य हा गुणदेखील संयमाच्या बरोबरीनेच राहतो. हाती घेतलेले कोणतेही काम सिद्धीस जाण्याचा आनंद तेव्हाच मिळेल, जेव्हा आपण धैर्याने तमाम अडचणींना सामोरे जाऊ आणि आपण धैर्यवान तेव्हाच बनू, जेव्हा संयमाची कास धरू. एका क्षणात रावाचा रंक झालेल्या एखाद्या गर्भश्रीमंताला ‘थोडी वाट पाहा मित्रा, हेही दिवस जातील’ असा धीराचा सल्ला संयमच देतो आणि परिस्थितीच्या छाताडावर पाय ठेवून पुन:श्च उभं राहण्याचं सामर्थ्यही तोच देतो. एकामागोमाग एक अशा येणाऱ्या संकटांना वैतागून कधीतरी आपण ठणकावतो, ‘ऐ वक्त, थोडासा ठहर जा, कभी तो मेरी भी बारी आयेगी!’ म्हणजे परिस्थितीला धमकावतानाही, ‘हे मना, संयम राख. आपलीही वेळ येईलच,’ असंच तर स्वत:ला आपण समजावत नाही का?

जगण्याच्या लढाईत कठीण प्रसंगांचे वारे झेलण्यासाठी संयमाची ढाल फारच गरजेची आहे; पण याचीदेखील जाणीव असू दे की, संयमाची ढाल त्याच्याच हातात शोभते, ज्याच्या दुसºया हातात डोळस पराक्रमाची तलवार आहे. संयमाच्या म्यानात बद्ध असलेली पराक्रमाची तलवार बाळगणाराच खरा स्वयंजित अन् खरा

जगजितदेखील !!  एक आफ्रिकन म्हण आहे -

'Axe Forgets Tree Remembers...' शब्दश: अर्थ काढाल तर.. ‘कु-हाड विसरते, पण झाड लक्षात ठेवतं.’ अर्थात ‘दुसऱ्यांना वेदना देणारा विसरून जातो; पण त्याच्यामुळे ज्याला वेदना होते, तो विसरत नाही.’ इथं कु-हाडीला आपण शक्तीचं (आक्रमकतेचं) प्रतीक समजू, तर झाडाला संयमाचं. नाते, मैत्रीमध्ये हे उदाहरण लागू करताना यातना देणारी ‘कु-हाड’ होण्यापेक्षा ‘संयमाचं झाड’ होणं जास्त श्रेयस्कर नाही का?
जगणं म्हणजे तरी काय मित्रा? अनिश्चितता, घनघोर संकटं यांच्याशी सतत झगडा मांडणं! मग या झगड्यात जिंकायचं तर आततायीपणा करून कसं चालेल? अशावेळी आपणाला सहनशील म्हणजेच पर्यायाने संयमी बनलं पाहिजे. खरंच मित्रा, कधी एखाद्या हृदयासमीपच्या नात्याने दु:खाची-विश्वासघाताची डागणी दिलीच, एखाद्या गंभीर आजाराने तुझ्यावर अनपेक्षित घाला घातलाच, एव्हढेच काय तर अनिश्चिततेच्या जीवघेण्या घेºयात सापडून कितीतरी प्रसंगी मनाची कुतरओढ झालीच, तर अशा आणि अन्य कित्येक संकटसमयी कधीच हतबल होऊ नकोस. कोसळून तर मुळीच जाऊ नकोस. संयमाची कास धर! तोच तुला पुन:श्च उभं करेल. कारण ‘काळा’च्या हातात हात घालून चालणारा संयमासारखा कुणीच नाही आणि दुखण्यावरील ‘अक्सीर’ इलाज काळाशिवाय दुस-या कुणाकडेच नाही!!
 

(लेखक, इचलकरंजी येथील आयुर्वेदाचार्य आहेत.)

Web Title: Moderation: The true companion of the mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.