एकेक दवबिंदू जपताना
By Admin | Updated: December 18, 2014 22:30 IST2014-12-18T22:30:35+5:302014-12-18T22:30:35+5:30
सरळ, साधी, सोपी, बिनकाट्यांची पायवाट कुणाला नको असते?.. सर्वांनाच वाटते, की सारं कसं सुरळीत असावं;

एकेक दवबिंदू जपताना
पराग पोतदार, (लेखक लोकमत पुणे आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)
सरळ, साधी, सोपी, बिनकाट्यांची पायवाट कुणाला नको असते?.. सर्वांनाच वाटते, की सारं कसं सुरळीत असावं; परंतु काही माणसं मात्र वेगळ्याच मुशीत जन्माला आलेली असतात. त्यांचा जगण्याचा आयाम त्यांच्यापुरता र्मयादित नसतोच कधी. अशी माणसं स्वत:ची पायवाट आखू पाहतात. अडचणी, अडथळे, आव्हाने, संकटे हे सारे येणार, हे माहीत असूनही ते पळवाटा शोधत नाहीत. त्यांच्या मनात कायम एक आंतरिक तळमळ असते; जी त्यांना क्षणाक्षणाला अस्वस्थ करत असते. त्या ऊर्मीमुळेच त्यांच्या प्रत्येक कृतीतही कधी अभिनिवेश नसतो, तर दिसून येते ती निव्वळ सहजता अन् पराकोटीची आत्मीयता. त्यामुळेच त्यांच्या कामाचा गाजावाजा नसतो, बडेजाव नसतो.. भपका तर त्याहून नसतो. हा आत्मीयतेचाच झरा काही वेगळे करू पाहत असतो, तितक्याच निर्मळ मनाने.. शरीरविक्रय करणार्या स्त्रियांच्या मुलांच्या जीवनाला आकार देण्यासाठी गेली २५ वर्षे अविरतपणे धडपडणारी ‘नीहार’ ही संस्था अशाच प्रयत्नांचे एक सुंदरसे उदाहरण.
‘नीहार’ या शब्दापासूनच त्या आत्मीयतेचा कळवळा प्रकट होतो. नीहारचा अर्थ कमळाच्या पानावरचा दवबिंदू. हा दवबिंदू पानाकडून ज्या क्षणापर्यंत जपला जाईल, त्या क्षणापर्यंत त्याला एखाद्या मोत्याची नजाकत आणि सौंदर्य टिकणार; पण तोच दवबिंदू पानावरून अलवारपणे ओघळून गेला, तर मात्र क्षणात मातीत मिसळणार. असे किती दवबिंदू आजवर आपल्याही नकळत मातीत मिसळले असतील, त्याची गणना नाही; परंतु जितके शक्य होतील, तेवढे तरी थेंब आपल्या कसोशीने जपावेत, ही उमेद मनाशी बाळगून एका वेगळ्या प्रयत्नांची सुरुवात झाली.
लालबत्तीमध्ये असलेल्या महिलांच्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी पहिले पाऊल टाकले. अर्थात, हे जितक्या सहजतेने आता बोलले जाऊ शकते, तितकी सहज सोपी परिस्थिती २५ वर्षांपूर्वी नक्कीच नव्हती. उजाड अशा माळरानावर संवेदनांचं बीज पेरायचं, तर त्यासाठी त्याहून मोठं संवेदनशील मन लागतं. तुमच्या मनातील अत्यंत प्रामाणिक संवेदना समोरच्याच्या मनाला भिडाव्या लागतात आणि मग तेव्हा कुठे विश्वासाचा पहिला अंकुर उमलत असतो. इथंही अगदी तसंच झालं..
‘वंचित विकास’ या संस्थेच्या माध्यमातून समाजातील अगदी तळागाळातील लोकांसाठी धडपड सुरू झाली होतीच. गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर लाथ मारून जीवनव्रत म्हणून स्वीकारलेले कर्मयोगी विलास चाफेकर हे प्रेरणेचा केंद्रबिंदू. विजयाताई लवाटे यांची या प्रयत्नांना तितकीच मोलाची साथ आणि सुनीता जोगळेकर, मीना कुर्लेकर यांसारख्यांचे अविरत अथक प्रयत्न. या सार्यांनी मिळून शरीरविक्रय करणार्या स्त्रिया आणि त्यांची मुले यांच्यासाठी प्रयत्न करण्याचा वसा घेतला. आरोग्य सुविधा देण्याच्या निमित्ताने लालबत्ती परिसरामध्ये संपर्क होता; परंतु तिथल्या मुलांना त्या वस्तीतून बाहेर काढून त्यांचं जगणं सावरण्यासाठी प्रयत्न करायचे, हे मोठे आव्हान होते; पण कितीही कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती. शरीरविक्रय करणार्या स्त्रिया.. त्यांचे जगणे.. जगण्यातली असहायता.. या सार्या गोष्टी म्हणजे आपल्या तथाकथित सुसंस्कृत समाजाचेच उघडे नागडे रूप. या स्त्रियांची मुले तरी या होरपळीतून वाचवता येतील का, हा विचार केंद्रस्थानी होता. मग झाली प्रत्यक्ष प्रयत्नांना सुरुवात. देहविक्रय करणारी स्त्री कितीही अगतिक, असहाय असली, तरी आपली मुलं, मुली याच चिखलात रुतून पडावीत, असं कुणालाच वाटत नसतं. त्यांना जोडण्याचा आणि मुलांचे आयुष्य फुलवण्यासाठी प्रयत्न करण्याचा हाच महत्त्वाचा धागा होता. आपल्या पोटच्या मुलांची तरी निदान घरगृहस्थी चालावी, असं बायकांना वाटत होतंच. तरीही वस्तीतील घरवाली, गुंड आणि दलाल या सार्यांच्या कचाट्यातून मुलं-मुली सोडवणं फार अवघड काम होतं. त्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. अनेक अडथळे वाटेत आले; पण मनाशी असलेला निर्धार मात्र पक्का होता. शरीरविक्रय करणार्या स्त्रियांच्या मुलामुलींचे पुनर्वसन हे काम म्हणजे चिखलाच्या गोळ्यातून काहीतरी मूर्तिमंत घडवण्यासारखं होतं. कारण त्यासाठी छिन्नी हातोडा उपयोगी पडणार नव्हता. मायेची उबदार सावली, संस्कारांचे शिंपणपाणी यांची खरी गरज होती. दिनांक ५ जुलै १९८९ रोजी १५ मुलामुलींना घेऊन ‘नीहार’ची स्थापना झाली. प्रत्येक मूल म्हणजे त्यांच्या दृष्टीने होता एक दवबिंदू. जिवाच्या कराराने जपायचा असा..
संघर्षाची वाट सोपी नसतेच कधी. गुंडांचा त्रास, समाजातूनच पसरवले जाणारे गैरसमज, मुलांच्या वाट्याला येणारी उपेक्षा, प्रसंगी होत असलेली अवहेलना या सार्यांतून जावेच लागले. सुरुवातीला तर या मुलांना कोणती शाळा प्रवेश द्यायला तयारच नसे. कधी कधी तर मुलांचे केस कापण्यासाठीदेखील कुणी मिळायचे नाही; पण अशा सार्या अडचणींतून वाट काढत मुलांसाठी प्रवास सुरू झाला. लोहगाव-वडगाव शिंदे रस्त्यावरील काकडे वस्ती व शिंदे वस्तीतील खोल्या भाडेतत्त्वावर घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. वर्षभरात या ना त्या अडचणींमुळे तीन वेळा जागा बदलावी लागली. मुलांनाही जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश मिळाला. मुलांची तब्येत आणि अभ्यास यांकडे सार्या कार्यकर्त्यांनी जागरुकतेने लक्ष दिलं. एका चांगल्या दिशेने जाण्याची खर्या अर्थाने रुजवात झाली. निहार या संस्थेमध्ये कोरडेपणा, रुक्षपणा येणार नाही, त्यातलं घरपण मनापासून जपलं जाईल, याचा सार्यांनी प्रयत्न केला.
‘नीहार’मध्ये मुलांना प्रवेश देताना त्यांच्या आयांना संततीनियमनाची शस्त्रक्रिया करून घ्यावी म्हणून समुपदेशन केले. ती प्रारंभिक अटच बनवली. आईला वर्षातून सणवाराला भेटता येई; पण तिच्यासोबत तिचा नवरा किंवा मानलेला नवरा नसावा, ही अट ठेवली. येताना तिने आई म्हणूनच यावे, चेहर्यावर मेकअप नसावा, अशीही सूचना आहे. तिने येताना फक्त आपल्या मुलासाठी न येता तिथे राहणार्या सगळ्यांचीच माय बनून यावे, असा आग्रह ठेवला. त्यामुळे तिथल्या सार्या वातावरणात परस्परांविषयीची एक आत्मीयता भरून राहिली. हळूहळू निहारला आजूबाजूच्या गावकर्यांनीही स्वीकारले. विरोधाची, उपेक्षेची, अवहेलनेची धार हळूहळू कमी होत गेली. मुलांची गुणवत्ता शाळेत अभ्यासात आणि क्रीडाक्षेत्रात झळकली. त्यातून मुलांकडे पाहण्याची दृष्टी बदलू लागली. मुलांसाठी नियमित आरोग्यतपासणी, वाचनालय असे विधायक उपक्रम राबवले. मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या. कोवळे बीजच ते. चांगले पाणी मिळाल्यावर अंकुर न फुटला तरच नवल. १९९५ला निहारमधून पहिली मुलगी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. यशाची मालिका सुरू झाली. सारे काही सुरळीत सुरू असताना निहारमधील काही मुलींना गुंडांनी पळवण्याचा प्रयत्न केला. सारेच भयभीत झाले; परंतु कार्यकर्ते खंबीर राहिले. पोलिसांचा, ग्रामस्थांचा आधार मिळाला आणि पुन्हा विस्कटू पाहणारी घडी सावरली.
शिक्षण घेणार्या मुलांच्या मनावर सुरुवातीपासून एक गोष्ट कायम बिंबवली गेली, ती म्हणजे तुझी आई ज्या परिस्थितीत आज आहे ती हौसेने नाही तर परिस्थितीमुळे आहे. त्यातून तिला बाहेर काढण्याची आणि तिचे शेवटचे दिवस सुखात घालवण्याची जबाबदारी तुझी आहे त्यामुळे शिकून काही तरी बनायचे, ते त्या आईसाठी. तिच्याविषयी कधीही मनामध्ये आकस निर्माण होणार नाही, हे प्रत्येकानेच जपले.
अश्रू आणि घामाचं शिंपण करून जपलेला एकेक अंकुर आता फुलू लागला आहे. थोडीथोडकी नव्हे, तर अनेक मुलं मुली चांगले शिक्षित होऊन त्यांच्या त्यांच्या पाऊलवाटा शोधण्यासाठी निघालेले आहेत. निहारच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी आता पुण्यात तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी सुरुवात केलेली आहे. अर्थात, हा संघर्ष सोपा नाही. त्यासाठी एकाचा एकच हात कधीच पुरणार नाही; पण एकेक दवबिंदू मनापासून जपायचा, तर प्रत्येकाचे जिवापाड प्रयत्न लागणारच. पंचवीस वर्षांच्या या अथक प्रयत्नांतून प्रेरणा घ्यायची, ती हीच.