शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
3
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
4
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
5
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
6
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
7
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
8
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
9
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
10
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
11
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
12
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
13
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
14
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
15
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
16
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
17
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
18
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
19
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
20
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
Daily Top 2Weekly Top 5

जे कळतं, ते वळत का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 06:05 IST

स्वयंपाक करण्याआधी योग्य ती सामग्री गोळा केली तरी अन्न शिजवावं लागतंच ना? तसंच आहे मनाचं! उपाय कळून काय उपयोग ?- कृती करावीच लागणार ना?

ठळक मुद्देपाच मिनिटांचीही ध्यानधारणा केली नाही. योगासनं शिकले नाही. साधा प्राणायामही केला नाही, तर माझी भीती कशी जाणार?

डॉ. राजेंद्र बर्वे

‘मला न सगळं कळतं, सगळं म्हणजे सगळंच अगदी कळतंच! आपल्याला ना दोन मनं असतात. एक कॉन्शस माइंड आणि अनकॉन्शस. मला ना तशीच दोन मनं आहेत.’ माझ्यासमोर बसून बोलणारी महिला सिक्सरवर सिक्सर मारत होती.

‘कळतंय ना तुम्हाला?’

मी मान डोलावली, ‘म्हणजे साधारण कळतंय..!’

‘तर माझं अनकॉन्शस माइंड आहे ना, त्याच्यापर्यंत संदेश पोहोचतच नाही. त्यामुळे अनकॉन्शस माइंडमधून योग्य मेसेज मला म्हणजे कॉन्शस माइंडला मिळतच नाहीत!’

- हे असे दणादण षटकार मारणाऱ्या फलंदाजाचं अवसान बघताबघता गळालं. डोळ्यात अश्रू आले! मी टिश्यू पेपर दिला. काही वेळ तसाच गेला. असं बरेचदा होतं. आपली समस्या नीट कळली आहे असं समजून आपण स्वत:ची समजूत काढतो. वरवर समजूत पटते; पण ‘दिल हैं के मानता नही’ अशी अवस्था होते.

‘मला ना खूप भीती वाटते. मनाला कितीही समजावलं, तरी भीती संपत नाही. भीतीचं रूपांतर काळीज कुरतडणाऱ्या काळजीत होतं. धीर सुटतो. सगळं कळतं, पण वळत नाही! मग वाटतं कळलंच नसतं तर बरं झालं असतं. अज्ञानातच सुख असतं ना!’

शेवटी मी त्यांना शांत करीत म्हणालो, ‘म्हणजे तुमची समस्या तुम्हाला कळली आहे; पण प्रत्यक्षात त्या कळण्यानुसार तुमच्यात काही फरक पडत नाहीय. कळलेलं वळत नाहीय, समजेची उमज होत नाहीये!’

‘होय, अगदी बरोबर!’ त्या म्हणाल्या!

रुग्ण तसे साधे असतात. त्यांच्या सभोवतालचे लोक खरं म्हणजे त्यांची टिंगलटवाळी करीत असतात. त्यांना खूप त्रास होत असतो म्हणून ते.

‘मी मानसशास्त्राचा खूप अभ्यास करते वाटलं की ते वाचून सगळं आपोआप वळू लागेल..!’

‘तसं नसतं हो,’ मी त्यांना म्हणालो, ‘हे सगळे त्रास मानवशरीर धर्माचे असतात. मनुष्य जन्माला धरूनच येतात. अभ्यास करून माहिती आणि कधी ज्ञानही मिळतं; पण त्यामुळे आपल्या वैयक्तिक त्रासाचे, विकाराचे नि यातनेचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे एक फायदा होतो. आपण आपलं दु:ख, यातना आणि विकाराचं स्वरूप स्वीकारतो; पण समजा मलेरियाचा ताप आला, तर त्याची सर्व लक्षणं पारखून मलेरिया बरा होईल का? ताप कसला आहे ते कळलं तरी तो आपोआप उतरत नाही ना! तुमचं तसं होतंय. समस्येचं स्वरूप आणि मनाची अशी मांडणी कळली तरी प्रश्न आपोआप विरून जात नाहीत. त्याकरिता वेगळे उपाय करावे लागतात. मनाला चुचकारून, गोडीगुलाबीने पटवून नव्या सवयी लावून घ्याव्या लागतात. अगदी घरगुती उदाहरणावरून ही लक्षात येईल तुमच्या!’

बाई खूप विचारात पडल्या आणि डोळे पुसून म्हणाल्या, ‘आलं लक्षात, अहो स्वयंपाक करण्याआधी योग्य ती सामग्री गोळा केली तरी अन्न शिजवावं लागतंच ना?’

मी म्हणालो, ‘अगदी बरोबर समजलं. मी या प्रक्रियेला माइंड लर्निंग आणि बॉडी लर्निंग म्हणतो. म्हणजे मन शिकून समजून घेता येतं, पण अनुभवानं, प्रयत्नानं शरीराच्या अंगवळणी पडावं लागतं. त्याला काही काळ जावा लागणारच ना! काही भाज्या पटकन शिजतात, तर काहींना बराच वेळ लागतो, त्यासाठी समज आणि चिकाटी हवी. सगळ्या भाज्या आणि पदार्थ एकाच विशिष्ट वेळात शिजलेच पाहिजेत असा हट्ट का?’

- बाई एकदम सावरल्या. म्हणाल्या,

‘माझं काय चुकलं हे लक्षात येतंय आता! मी भीती कशी व का निर्माण होते यावर नेटवर खूप रिसर्च केला. खूप माहिती जमा केली; पण पाच मिनिटांचीही ध्यानधारणा केली नाही. योगासनं शिकले नाही. साधा प्राणायामही केला नाही, तर माझी भीती कशी जाणार?’

मी हसत म्हणालो, ‘कोच खेळाडूला शिकवितो, शिक्षक शिक्षण देतात; पण खेळायचं, शिकायचं, त्यासाठी धडपडून प्रयत्न करायचे हे आपलं काम असतं ना!’

(ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ)

drrajendrabarve@gmail.com