लुप्त होऊ शकते ती विद्या कशी
By Admin | Updated: January 10, 2015 13:02 IST2015-01-10T13:02:42+5:302015-01-10T13:02:42+5:30
अमूर्त-चिंतन, मूर्त हस्तकौशल्य आणि भारतीय ‘विज्ञाना’च्या गर्भधारणेतला अडसर

लुप्त होऊ शकते ती विद्या कशी
>- राजीव साने
आपले पूर्वज कसे होते यात आपले कर्तृत्व काहीच नसते. तो अभिमानाचा किंवा शरमेचा विषय करणे चूकच असते. ‘आपले म्हणून चांगले,’ ही भूमिका सोडून ‘चांगले म्हणून आपले’ ही भूमिका घेण्यानेच आपण, सत्याकडे वा श्रेयाकडे वाटचाल करू शकतो. वांशिक/भौगोलिक वारसदारीपेक्षा ‘वृत्ती’मधील वारसदारी सांगून स्फूर्ती घेतली पाहिजे. जो सिद्धांत कोणीही पडताळून पाहू शकतो व त्यातून तो खोटाही पडू शकतो (पण अद्याप खोटा पडलेला नाही) तोच वैज्ञानिक सिद्धांत होय. या परंपरेचा प्रतिनिधी म्हणजेच, ‘अरिस्टॉटलसुद्धा चुकू शकतो’ हे म्हणण्याची हिम्मत दाखवणारा गॅलिलिओ होय. तो जर माझे स्फूर्तिस्थान असेल, तर तो कोणत्या भूमीत जन्मला व मी कोणत्या भूमीत, याने काय फरक पडतो? हे लक्षात घेता प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होते की नव्हते, या प्रश्नाचा भावनिक बडेजाव व्यर्थ ठरतो.
अचाट दाव्यांची तपासणी
पुष्पक हे खरोखरीचे विमान, युद्धभूमीवरील वार्ता धृतराष्ट्राला कथन करणारा संजय म्हणजेच दूरदर्शन, गांधारीच्या गर्भाचे शंभर तुकडे म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, गणपतीला हत्तीचे मुंडके बसविणे म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी, अशी अनेक समीकरणे सध्या उफाळून आली आहेत. स्वप्नरंजन करून कल्पना सापडणे म्हणजे वस्तू बनविता येणे नव्हे. ज्यूल व्हर्नच्या कादंबरीतील पाणबुडी पुढे वास्तवात आली. पण म्हणून असे कोणीही म्हणत नाही की पाणबुडी बनवण्याचे तंत्र ज्यूल व्हर्नने शोधले. मिथकापुरता अर्थसुद्धा नेमका राखला पाहिजे. उदाहरणार्थ ‘मारु तीचे उड्डाण’ ही लांब-उडी असे, उडणे नव्हे. किती लांब? हा अतिशयोक्ती अलंकार झाला. पण हे उड्डाण दाखवताना आजचे फिल्मवाले, तो उगाचच पोहल्यासारखे पाय हलवतोय, असे दाखवतात. हा मिथकाचाही विपर्यास आहे. विमानाचे वेगाने पुढे जाणे हेच तिरकस पंखांखाली हवेचा जास्त दाब निर्माण करून त्याला उचलते/तोलते. हेलिकॉप्टर चक्क वरून खाली झोत मारून स्वत:ला तोलून धरते. त्याचे तरंगणे हे त्याच्या ‘जाण्या’च्या गतीवर अवलंबून नसते. त्यामुळेच हेलिकॉप्टर सर्वाधिक इंधन खाते. प्रचंड ऊर्जा खर्ची पडते. ऊर्जास्रोत कोणता आणि गुरुत्वाकर्षणावर मात करणारा उलटा दाब नेमका कसा निर्माण होतो, हे सांगितल्याशिवाय ‘विमान’ हा शब्द वापरण्याचा अधिकार मिळत नाही. पारा आणि अभ्रक यांच्या संयोगाने तळपदे यांचे विमानही उडते आणि रसेश्वर दर्शनातील मोक्षही मिळतो! प्रत्यक्षात पारा आणि अभ्रक यांच्यात आंतरक्रि याच होत नाही! ‘‘न्यायमूर्ती रानडे तेव्हा उपस्थित होते.’’ अशा दाव्यांनी, तळपद्यांचे विमान उडाले असे सिद्ध होत नाही. कोणीही पारा आणि अभ्रक यापासून ऊर्जा उत्पन्न करून दाखवावी, प्रश्न संपला!
विमान ही फार पुढची गोष्ट झाली. पुराणातदेखील, ज्याला घोडे लागत नाहीत असा रथ तरी आढळतो काय? युधिष्ठिराचा जमिनीपासून दोन बोटे वर चालणारा रथ (हॉवरक्र ाफ्ट?) असला तरी त्याला घोडे लागतातच. गेला बाजार पवनचक्कीतले, शिडांमधले, पतंगांमधले एअरो डायनॅमिक्स जरी मांडले गेले असते तरच पुढे विमानाची बात! जी सत्ये चिंतनगम्य असतात त्यांचे आकलन कदाचित कोणत्याही काळात होऊ शकेल.
भूमितीची प्रमेये ही एकदाही निरीक्षण न घेता सिद्ध होतात. अशा सिद्धांतांना व्यवहाराची जोड लागत नाही. पायथागोरसच्या अगोदर आम्ही- ही निदान सैद्धांतिक शक्यता तरी आहे. पण कॉम्प्रेसरचा मागमूस नसताना रेफ्रिजरेशन हे असूच शकत नाही. माठ, म्हणजे बाष्पीभवनाने थंडावा, म्हणजे फक्त उष्णता खर्ची पाडून तपमान घटविणे, जे जिभेवर श्वासांचा मारा करून कुत्रासुद्धा करतो! कमी तपमानावरून जास्त तपमानाकडे उष्णता पंप करणे हे कॉम्प्रेसरविना अशक्य आहे.
सहेतुक बेशिस्त
आपण शब्द कोणता वापरतोय आणि संकल्पना कोणती वापरतोय यात हळूच बदल करणे ही केवळ ‘तोंड-चलाखी’ असते. टेस्ट ट्यूब बेबीचा बीजसंयोग जरी टेस्ट ट्यूबमध्ये झाला तरी गर्भपोषण हे नाळेद्वारेच होते. गर्भाशय व नाळेविना गर्भाला ऑक्सिजन व सर्व जीवनद्रव्ये पुरवण्याचे तंत्र पाश्चात्यांनाही (अजूनतरी) सापडलेले नाही. गांधारीच्या एम्ब्रियोचे शंभर तुकडे, तुपाने गच्च भरलेल्या डेर्यांमध्ये सीलबंद करून वर्षभर ठेवले, अशी महाभारतात स्पष्ट नोंद आहे. नुसत्या तुपातून त्यांना ऑक्सिजनादि सर्व काही कसे मिळाले? आणि सत्त्वगुणाचा महामेरू असे जे तूप, त्यातून तामसी/आसुरी असे कौरव कसे काय निपजले? हा एक ‘भारतीय’ प्रश्न आहेच. कशालाही काहीही म्हणणे ही सहेतुक बेशिस्त हे अशा दाव्यांचे एक वैशिष्ट्यच आहे. मुंडके-रोपण म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी नव्हे. प्लॅस्टिक सर्जरी त्याच शरीराच्या त्याच टिश्यूने फक्त बाह्यात्कारी केली जाते. अगदी आजच्या काळातही मुंडक्याच्या लंबमज्जेतील सर्व तंतू, तुटलेल्या मज्जारज्जूला तसेच शिरेला-शीर धमनीला-धमनी वगैरे जोडणे शक्य नाही. सख्ख्या भावाचा अवयवही परका म्हणून रिजेक्ट होऊ शकतो. एखाद्या पेशीच्या जीनोममध्ये किंचित बदल झाला तरी कॅन्सरची भीती असते. हत्तीचा जीनोम आणि माणसाचा जीनोम म्हणजे काय होईल याची दावा करणार्यांना कल्पना तरी आहे का? ‘‘आंघोळीला गेले आहे. आत येऊ नये.’’ एवढी पाटी लावण्याची किंवा निदान दाराला कडी घालण्याची ‘टेक्नॉलॉजी’ नसताना, मुंडके-रोपणाची मात्र होती, असे निदान पंतप्रधानांनी तरी म्हणू नये.
आयुर्वेदिक औषधात जी गुणकारी आहेत त्यांच्यात नेमका कोणता रेणू गुणकारी आहे हे सापडले की ते औषधशास्त्र बनते. उष्ण-थंड, कफ-वात-पित्त अशा सबगोलंकारी संज्ञांनी सैद्धांतिक व्यूह बनत नसतो. ऐसिडीटीला पित्त म्हटले जाते, पण पित्त हे अल्कलाइन असते! पोटातला गॅस आणि सांध्याच्या द्रवातील बुडबुडे हाही गॅसच, अशी साम्ये एकाच विकाराची(वात) मानण्याला कार्यकारणभाव म्हणणे कठीण आहे. पाणिनीच्या व्याकरणाचा संगणकप्रणाली बनविताना नेमका काय उपयोग केला हे विजय भटकर यांनी एकदा तरी प्रकाशित करावेच. नुसता उल्लेख करून मोकळे होता येणार नाही.
भारताचे हुकले कोठे?
या कशाचीही उत्तरे मिळत नाहीत कारण आमच्यात म्हणे डॉक्युमेंटेशनची पद्धतच नव्हती! मग ज्योतिषशास्त्राचे डॉक्युमेंटेशन इतके चोख कसे? मंत्रांसारखा परिमाण देणारी ‘यंत्र’ या आकृत्या काढता येतात मग उपकरणांच्या आकृत्या का काढता आल्या नाहीत? ज्याचे उघड उघड अँप्लिकेशन होते त्याचे मौखिक का होईना पण डॉक्युमेंटेशन होतेच. शेतीतले, कारागिरीतले ज्ञान त्यातील सर्वांना पोहोचत होतेच.
‘सिद्धी’ प्राप्त होणे ही गोष्ट, स्वरूपत:च वैयक्तिक असते. विद्या ही सार्वत्रिक असते. फक्त शुक्र ाचार्यांनाच जी प्राप्त असते ती सिद्धी. म्हणूनच ‘संजीवनी’ ही विद्या म्हणणे चूक आहे. वैयक्तिक साक्षात्कारी आणि अपवादात्मक उपलब्धी म्हणजे विद्या नव्हेच आणि विद्या देण्यात जो कृपण/आखडू असतो तो गुरूच नव्हे. आज पेटंट घेण्याची सक्ती आहे. ते पाडून ठेवणे व इतराना मात्र न मिळू देणे यावर बंदी आहे. र्मयादित कालावधीत मानधन घेतल्यावर ते ज्ञान सर्व मानवजातीचे होतेच. हे पेटंटचे खरे सार आहे. सार्वत्रिकीकरण हे आधुनिक विज्ञानाचे प्राणतत्त्व आहे. कृपणता, गुप्तता, ज्ञान-अनधिकार ही जिज्ञासा-द्रोहाची लक्षणे आहेत. ‘‘कोणालाच नाही मिळाले आणि माझ्याबरोबर सरणावर गेले’’ तरी चालेल पण बिनवशिल्याच्या शिष्याला, कुळा-बाहेरील, जाती-बाहेरील, ‘परक्या’ला मिळू देणार नाही, ही खत्रुड वृत्ती म्हणजे गुरु महिमा आणि पेटंट म्हणजे धंदेवाईकपणा, असे म्हणून आपण आपलेच नुकसान करून घेत आलो आहोत.
भारतातील तत्त्वचिंतन मोक्ष-पुरु षार्थासाठीच झाले. इतर पुरुषार्थ, तत्कालीन संकेतांवर आणि धुरीणांवर सोडले गेले. नित्य तेच सत् अनित्य ते असत् या आग्रहापायी आपण ‘फरक कसा पडत नाही’ हे सिद्ध करत राहिलो व पाश्चिमात्य ‘फरक कसा पडतो’ हे शोधत राहिले. वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यातील अन्यायाचा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला तरी अमूर्त-चिंतन आणि मूर्त हस्तकौशल्य या दोहोत संबंध न उरणे या गोष्टीमुळे ‘विज्ञाना’च्या गर्भधारणेतच अडसर उत्पन्न झाला हे निश्चित.
सिद्धी आणि विद्या
एखादी गोष्ट करता येणे आणि तिची रीत सांगता येणे यात प्रचंड फरक असतो. आपण सगळेच सहजगत्या सुरगाठ बांधतो. कागदावर सुरगाठीची रीत लिहून पहा म्हणजे सिद्धी आणि विद्या यातला फरक कळेल.
सिद्धी ही नुसती सु-श्रुत असून पुरते. विद्या ही मात्र सु-नोंदित आणि हस्तांतरणीयच असली पाहिजे.
दोन साधे निकष
प्राचीन भारताबाबत आणि अगदी आत्ताच्या काळातही जेव्हा निरनिराळे ज्ञान-दावे केले जातात, ते कसे पारखून घ्यावेत, याचे काही सामान्य निकष निश्चित करायलाच हवेत. नाहीतर वाद-मुद्दे एकमेकांना न भिडणारे ‘स्क्यू’ मांडले जाऊन ते गोल गोल फिरत रहातात.
एक निकष असा की एखाद्या क्षेत्नातील साध्या सोप्या गोष्टी सापडण्याआधीच सोफेस्टिकेटेड गोष्ट सापडणे शक्य नसते.
दुसरा असा की ज्या तंत्नाचे उपयोजन रुळते ते लुप्त होऊच शकत नाही.
जगातली पहिली शस्त्रक्रिया!
सुश्रुत लिखित ‘सुश्रुत संहिता’ हा आयुर्वेद आणि शल्यचिकित्सेच्या संदर्भातला प्राचीन संस्कृत ग्रंथ मानला जातो. भारतीय वैद्यकशास्त्र किती प्रगत होते याच्या पुष्ट्यर्थ या ग्रंथाचा दाखला दिला जातो. आयुर्वेदाच्या तीन मूळ ग्रंथांपैकी ‘सुश्रुत संहिता’ हा एक ग्रंथ आहे. सुश्रुत संहितेच्या १८४ अध्यायांमध्ये एकूण ११२0 प्रकारचे आजार, सातशे औषधी वनस्पती, खनिज स्त्रोतांवर आधारित ६४ प्रक्रिया, जंतुस्त्रोतांवर आधारित ५७ प्रक्रिया आणि आठ प्रकारच्या शस्त्रक्रियांचा उल्लेख केला आहे. याच ग्रंथात शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधने आणि उपकरणांचाही विस्ताराने उल्लेख आहे. कॅन्सर, सिझेरियन, न्युरो सर्जरी, प्लास्टिक सर्जरी याशिवाय अस्थिभंग, कृत्रिम अवयवरोपण, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया. इत्यादी अनेक आजारांविषयी विस्तृत विवेचन सापडते.
जगातली पहिली शस्त्रक्रिया सुश्रुत यांनी केली आणि सुमारे ३५00 वर्षांपूर्वी आपल्याकडे शस्त्रक्रिया केल्या जात असे म्हटले जाते.
पृथ्वीभ्रमणाची ‘सूर्यसंहिता’
पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्यासाठी पृथ्वीला ३६५ दिवस म्हणजे साधारणपणे एक वर्ष लागते; ही गोष्ट सर्वात प्रथम कोणी शोधून काढली? खगोलशास्त्रज्ञ स्मार्ट याच्या नावावर हा शोध नोंदला गेला आहे, पण ज्येष्ठ भारतीय गणिती भास्कराचार्य यांनी हे सर्वप्रथम शोधून काढले असे मानले जाते.
‘सूर्यसंहिता’ या त्यांच्या ग्रंथात तसा उल्लेख आढळतो. त्यांनी केवळ हा कालावधी शोधूनच काढला नाही, तर नऊ दशांश अपूर्णांकापर्यंत (३६५.२५८७५६४८८ दिवस) इतके अचूक मापनही केले. पृथ्वीला सूर्यभ्रमणाला ३६५.२५६४ दिवस लागतात असे आज मानले जाते. भास्कराचार्यांच्या गणितात केवळ 0.000२ टक्के इतकाच फरक आहे.
भूगर्भातलं पाणी आणि
टिकाऊ बांधकाम
प्राचीन भारतीय अभियंत्यांना वास्तूनिर्मितीचे प्रगत तंत्रज्ञानही अवगत होते, असा निष्कर्ष मांडला जातो. गायीचे शेण, गूळ, नारळाचे पाणी, अंड्यातला पांढरा भाग इत्यादी गोष्टी ‘नॅचरल पॉलिमर’ म्हणून वापरल्या जायच्या, भूगर्भाच्या पोटातले पाणी हुडकून काढण्यात भारतीय वाकबगार होते असे आजही मानले जाते. त्यासंदर्भात नागपूरचे प्रोफेसर अशोक नेणे यांनी इंडियन सायन्स कॉँग्रेसमध्ये आपला शोधनिबंध सादर केला.
प्लास्टिक सर्जरी आणि टेस्ट ट्यूब बेबीही!
गणपतीला हत्तीचे मुख बसवणे म्हणजे प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातली आद्य शस्त्रक्रिया, गांधारीच्या गर्भातून शंभर कौरव तयार होणे आणि तुपाच्या बुधल्यातला त्यांचा जन्म म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीचा प्राचीन आविष्कार, भारतीय पुराणकथांमधील विमाने म्हणजे प्राचीन हवाईविद्या.
असे अनेक दावे संस्कृत ग्रंथांच्या आधारे केले जातात.