माळढोक धोक्यात
By Admin | Updated: August 2, 2014 15:05 IST2014-08-02T15:05:24+5:302014-08-02T15:05:24+5:30
आफ्रिका खंडाशी नाते सांगणारा हा पक्षी शेकडो वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात आला. पाकिस्तानबरोबर भारतातील अनेक राज्यांत त्याचे अस्तित्व होते. मात्र, आता ही संख्या झपाट्याने घटत आहे. आजपासून माळढोकांची गणना सुरू होत आहे. त्यानिमित्त वस्तुस्थितीचा घेतलेला वेध..

माळढोक धोक्यात
- राजेंद्र केरकर
नान्नज अभयारण्यातून माळढोक पक्षी अक्षरश: नामशेष होण्याच्या वाटेवर आहे.
माळढोक म्हणजे ग्रेट इंडियन बस्टर्ड. माळावरती आढळणारा ढोक म्हणजे बगळा म्हणून या सुंदर पक्ष्याला ‘माळढोक’ म्हटले जात असले तरी त्याचा बगळ्याशी दुरान्वयेही संबंध नाही. आफ्रिका खंडाशी नाते सांगणारा हा पक्षी शेकडो वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात आला आणि त्यामुळे पाकिस्तानबरोबर भारतातील पंजाब, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूत एकेकाळी तो आढळत होता; परंतु आज यातील काही राज्यांच्याच माळरानांवर माळढोकचे अस्तित्व शिल्लक राहिलेले आहे. माळढोकला ओसाड आणि निर्जन माळरानाची विलक्षण ओढ असल्याने त्याचा नैसर्गिक अधिवास दिवसेंदिवस संकटात सापडत चालला असून त्याची देशभरात २५0-३00 च्या आसपास संख्या उरली आहे. या पक्ष्याची आज अतिसंकटग्रस्त पक्ष्यांमध्ये गणना केली जात आहे. अंडी उबविण्यासाठी २५ दिवस आणि त्यानंतर उडायला येईपर्यंत आणखी ७५ दिवस पिलांना आईबरोबर फिरावे लागते. माळढोकच्या या प्रदीर्घ विणीच्या हंगामानेही त्याच्या अस्तित्वावर गदा आणली आहे.
महाराष्ट्रातील सोलापूर शहरापासून मार्डी-होंसळकडे जाताना माळढोक अभयारण्याचे क्षेत्र लागते. नान्नज येथील या अभयारण्याचे क्षेत्र माळरानाने युक्त असल्याने आणि एकेकाळी माळढोकला आवश्यक असलेला मुबलक दाणागोटा आणि पिण्याचे पाणी येथे उपलब्ध असल्याने येथे माळढोकचे वास्तव्य प्रामुख्याने होते. नान्नज येथील वन खात्याच्या विश्रामगृहात काम करणार्या लिंबाजी गायकवाड यांनी १९९0 मध्ये आपण २५-३0 च्या आसपास माळढोक पाहिल्याची आठवण गप्पा-गोष्टींच्या ओघात सांगितली. वन खात्याने नान्नज येथील आपल्या कार्यालयात माळढोक पक्षी गणनेच्या ज्या नोंदी ठेवलेल्या आहेत, त्यानुसार २00२ मध्ये ४ नर १७ माद्या आणि एक पिल्लू अशा २२ माळढोकांची नोंद सापडते. माळढोक हा बहुभार्या पक्षी असून डौलदार नृत्य करत, स्वत:भोवती गिरक्या घेत तो माद्यांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. एकांतवास अधिक प्रिय असलेल्या या पक्ष्यासाठी महाराष्ट्र सरकारने अभयारण्याची निर्मिती केली असली तरी त्याचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अभावानेच केल्याने आज नान्नज येथून हा पक्षी इतिहासजमा होणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मार्डी, नान्नज, कारंबा, वडाळा, काटी, गंगेवाडी आणि पिंपळा या गावांतील लोकवस्तीचा प्रचंड दबाव अभयारण्य क्षेत्रावर असल्याने माळढोकची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. २00३ मध्ये माळढोकची संख्या जेव्हा १३ झाली, त्याच वेळी वन खात्याने माळढोकच्या अस्तित्वासाठी योजनाबद्ध प्रयत्न राबविणे महत्त्वाचे होते. २00५ मध्ये २२ असलेल्या माळढोकच्या संख्येत २00७ मध्ये वाढ होऊन त्यात २४ माद्या आणि ६ नरांची नोंद आढळते. २00९ मध्ये माळढोकची संख्या २१ वर आली ती नंतर पुन्हा वाढली नाही. २0१0 मध्ये ९, २0११ मध्ये १३ आणि २0१२ मध्ये १0 वर आलेले माळढोक गेल्या वर्षी जेव्हा ३ वर आले, ही खरे तर माळढोकसाठी धोक्याची घंटा होती.
आज माळढोक पक्ष्यांचे दर्शन व्हावे म्हणून नान्नजला जावे तर कित्येक मैलांची पायपीट करूनही हा पक्षी अभयारण्य क्षेत्रात दृष्टीस पडणे कठीण झाले आहे; परंतु सकाळी लवकर उठून गेल्यास कृष्णमृगाच्या कळपाचे त्याचप्रमाणे गौरा होला, ह्युम पर्णवट्यासारख्या पक्ष्यांचे मात्र दर्शन घेता येते. गेल्या वर्षीच्या पावसाळी मोसमात २७ जून आणि ९ जुलैला माळढोकच्या दर्शनाची नोंद झाली असून त्यानंतर यंदाच्या जूनमध्येही माळढोकचे दर्शन घडल्याची नोंद झाली आहे. आकाराने गिधाडापेक्षा मोठा, उंची अंदाजे तीन फूट तर चाळीस पौंडाचे वजन असलेला हा पक्षी खरे तर छोट्या शहामृगाची आठवण करून देत असतो. वर गडद बदामी, त्याच्यावर काळ्या रेषा, खालच्या बाजूस पांढरा, छाती आणि पोटाच्या सीमेवर काळा पट्टा असलेल्या या पक्षाच्या डोक्यावर ठळक असा काळा तुरा असतो आणि त्यामुळेच माळढोकचे देखणेपण नजरेत भरणारे असेच असते. नान्नज येथील अभयारण्याची शान म्हणून ओळखल्या जाणार्या माळढोकच्या नैसर्गिक अधिवासावर आज आलेले संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वन खात्यामार्फत अभावानेच ठोस आणि नियोजनबद्ध प्रयत्न झालेले आहेत आणि त्यामुळे माळढोकांच्या वैभवासाठी ख्यात असलेल्या या परिसराला उतरती कळा आली आहे. नान्नज येथील कार्यालयात अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. कुलकर्णी यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ १२२९ चौ. कि.मी. इतके असले तरी आपल्या ताब्यात ८१0 हेक्टर एवढेच क्षेत्र असून न्यायालयाच्या नव्या आदेशानुसार हे अभयारण्य ३३६ चौ. कि.मी. क्षेत्रापुरते र्मयादित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सांगितले. एक वनपाल, ६ वनरक्षक आणि ५ वनमजूर एवढय़ा मनुष्यबळावर अभयारण्याची देखरेख करावी लागत आहे. माणूस आणि माळढोक यांच्यात असलेले स्नेहाचे दुवे खंडित झाल्याने आज हा पक्षी विस्मृतीच्या उंबरठय़ावर आहे, हे निश्चित भूषणावह नाही.
(लेखक पर्यावरण कार्यकर्ते आहेत.)