भय इथले संपत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:07 PM2019-12-09T12:07:14+5:302019-12-09T12:07:23+5:30

नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी; पण किती जणांना मारणार पोलीस? ही वरवरची मलमपट्टी झाली.

Fear does not end here | भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही

Next

निर्भया ते दिशा किती कळ्या कुस्करल्या गेल्यात निर्घृणपणे! काही सामाजिक भान असलेल्या, पुरत्या भानावर असलेल्या, शिकल्या सवरलेल्या, समाजात आपले स्थान निश्चित करू पाहणाऱ्या, तर काही नुकत्याच उमलू पाहणाºया, समाज म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, हे गावीही नसलेल्या, अजाण निष्पाप! परत एकदा देश हादरला, कळवळला, संतापला. हैदराबादच्या तरुणीवर झालेल्या अत्याचाराने समाजाची संवेदनशीलता परत एकदा प्रत्ययास आली. लोकांचा उद्रेक, क्षोभ रस्त्यावर आला; पण कुणीही व्यक्ती जन्मत: गुन्हेगार असतो का? मग जबाबदार आहे तरी कोण, त्या नराधमांच्या इतक्या टोकाच्या हिंसक प्रवृत्तीला? निर्भयाच्या वेळी गुन्हेगारांची क्रुरता पाहून संपूर्ण देश हळहळला होता. तीच क्रुरता दिशावर अत्याचार करणाºया गुन्हेगारांचीदेखील होती. पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये चारही आरोपी मारल्या गेले. खूप आनंदाचे समाधानाचे सुस्कारे सोडले लोकांनी...पण खरंच हा उपाय कायमस्वरूपी आहे काय ? किंवा पोलिसांना असे करणे प्रत्येकवेळी सहज शक्य तरी आहे काय? निर्भया किंवा दिशावर अत्याचार करतानाच्या ज्या क्रुरतेवर समाज बोलतो, मोर्चे काढतो, बॅनरवर आपल्या संवेदना व्यक्त करतो एवढे पुरेसे आहे काय? हा भावनांचा उद्रेक तेवढ्या पुरताच का? इतर वेळी माणूस इतकाच संवेदनशील असतो का? ही क्रूरता तर केवळ हिमनगाचे टोक आहे. जो डोळ्यांनी दिसतो तेवढेच स्वरूप आहे का स्त्रीवरील अत्याचाराचे? फक्त शारीरिक अत्याचारच क्रुरतेच्या व्याख्येत बसतील का? नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी; पण किती जणांना मारणार पोलीस? ही वरवरची मलमपट्टी झाली. रोग समूळ नष्ट होण्यासाठी केवळ औषधांनी भागत नाही, तर शस्त्रक्रिया करून तो भागच काढून टाकणे गरजेचे असते. अनेक विधवा, परित्यक्ता, प्रौढ कुमारिका यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. सासरच्या आश्रयाने राहणाºया विधवेला तर असे अत्याचार रोजच सहावे लागतात. लहान मुले असतील तर घरही सोडता येत नाही. आधारदेखील महत्त्वाचा असतोच. बाहेर निघाली तर अनेक हिंस्त्र श्वापदे झडप घालण्यासाठी तयारच असतात. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था असते.
खरे तर हे काम केवळ यंत्रणेचे नाही, तर संपूर्ण समाजाचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आज आवेगाने रस्त्यावर येणारा प्रत्येक पुरुष स्वत:ला निरपराधी समजत असेल, पण त्याने स्वत: विचार करावा तो किती निरपराधी आहे. अत्याचारी व्यक्ती या समाजाचाच एक भाग आहे. त्यांची घडण याच समाजात झालीय. त्यांच्या घडणीत समाजाचादेखील वाटा आहेच. याच समाजात अनेक शिक्षित, सभ्य लोक अनेकदा शब्दातून स्त्रीवर अत्याचार करीत असतात, ते त्यांच्या गावीदेखील नसतं. घरातल्या मुलांसमोर वडील आपल्या पत्नीला निर्बुद्ध ठरवतात. चूप बस तू, तुला यातलं काय कळतं! बायकांना अक्कल जरा कमीच असते. ही वाक्ये ऐकत ऐकत मुलं मोठी होतात. सगळ्यात पॉवरबाज शिव्या आई, बहिणीवरच्याच. दुसऱ्यांच्या बहिणीला शिव्या घालणाºया व्यक्तीच्या आई - बहिणीचा सन्मान तिसरा कशाला करेल? पण वाईट या गोष्टीचे वाटते की, यात स्त्रीचा काहीही दोष नसताना भरडली जाते ती स्त्रीच. दोन पुरुषांचे भांडण असो, दोन जाती-धर्मातील वाद असो, वा दोन देशांमधील भांडण, अत्याचार स्त्रीलाच सहन करावे लागतात. भाषेतून मुरलेले नाकारायला खूप वेळ लागतो आणि आपल्या भाषेचा जर विचार केला, तर स्त्रीसाठी अनेक वाईट शब्द आपल्या भाषेत वापरण्यात आलेले आहेत. आपल्या भाषेत निपुत्रिक स्त्रीसाठी शब्द आहे, पुरुषांसाठी नाही. बाहेरख्याली स्त्रीकरिता घाणेरडा शब्द आहे, पुरुषांकरिता नाही. आपल्याकडे चारित्र्याची कल्पना स्त्रीपुरती मर्यादित आहे, पुरुषांसाठी तेच मर्दानगीचे लक्षण मानल्या गेलेय. हे पाहिलं की लक्षात येतं की, मुळात समाज घडतोय तोच चुकीच्या पद्धतीने. या सगळ्यांतून स्त्री केवळ उपभोग्य वस्तू आहे, पुरुषांच्या मालकीची आहे हा विचार पेरला जातो. त्यात आपल्या इथे लैंगिक शिक्षणाचा अभाव किंवा हा विषयच वर्ज्य, यामुळे देखील समाजाची मानसिकता विकृत बनते. स्री ही सामाजिक प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे, हे मान्य व्हायला पाहिजे. तिला दयेची, मायेची, संरक्षणाची भीक नको, तर तिचं जगणं मान्य करणं गरजेचं आहे. ती पंगू नाही, अधू नाही अथवा ती निर्बलही नाही म्हणून तिला सबल करण्याच्या भानगडीत न पडता, तिचं माणूस म्हणून असलेलं अढळ स्थान स्वीकारून उपभोग्य किंवा गरजेची वस्तू न समजता मानवी परिसंस्थेचा एक स्वतंत्र भाग आहे, हे आधी समजून घेणं गरजेचं आहे...
वारंवार स्त्रीच या घटनांची बळी ठरत असताना मर्दुमकीचा अविर्भाव बाजूला सारुन कायमस्वरूपी पर्याय निर्माण होणे अनुकूल ठरेल.. एन्काउंटर, फाशी, जन्मठेप ही एका आरोपीची शिक्षा असेलही, पण तो दूरगामी उपाय नाही, तर त्यासाठी दुसºयाचं अस्तित्व मान्य करून स्वत:चे अधिकार व कर्तव्य समजेल एवढी समजही बरंच काही सांगून जाते...
व्यवस्थेने घातलेला खोडा जर घटनांची वारंवारिता थांबवू शकत नसेल तर तो खोडा मुळासकट हासळून नवा पर्याय उभा करून जळमटांनी झाकोळलेला पेच मोकळा करणं गरजेचं आहे, नाही तर सामान्य मस्तिष्कात असंच चित्र तरळत राहील...
परत परत तेच तेच
पुन्हा मनास लागली ठेच
पुन्हा चर्चा, पुन्हा मोर्चे
तरी सुटेना अजून पेच

 


डॉ. स्वप्ना लांडे

Web Title: Fear does not end here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.