'माळीण' नंतर तरी?
By Admin | Updated: August 2, 2014 15:00 IST2014-08-02T15:00:47+5:302014-08-02T15:00:47+5:30
माळीण गावातील दुर्घटनेचे खापर नेहमीप्रमाणेच निसर्गावर फोडले जाईल. वास्तव मात्र निराळे आहे. डोंगररांगांतील मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळेच गेल्या काही वर्षांत असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. त्यानंतरही यासंबंधी काही धोरण निश्चित केले जात नाही, यापुढे तरी आपण काही धडा घेणार?

'माळीण' नंतर तरी?
- डॉ. सतीश ठिगळे
निसर्ग कधीही अचानक घाव घालत नाही. त्याच्या प्रत्येक आपत्तीच्या- त्यातही अशा दरडी कोसळण्याच्या प्रकाराच्या नेहमीच पूर्वसूचना मिळत असतात. मात्र, मानवाकडूनच अशा सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. वास्तविक त्याकडे गंभीरपणे पाहून लगेचच आपत्ती निवारक उपाययोजना अंमलात आणण्यास सुरुवात करणे गरजेचे आहे. घटना घडून गेल्यानंतरच आपण त्यांचा कार्यकारणभाव शोधण्याच्या तयारीला लागतो. पुणे जिल्ह्यातील माळीण गावातील दुर्घटनाही याला अपवाद नाही.
सह्याद्री पर्वतराजीच्या कुशीत, कोकणात आणि घाटमाथ्याच्या सान्निध्यात, दरडी कोसळण्याच्या घटना विशेषत: पावसाळ्यात घडत असतात. आजही सह्याद्री परिसरात डोंगर पायथ्याशी किंवा उतारावर वसलेली शेकडो गावे धोक्याच्या उंबरठय़ावर आहेत. डिंभे धरणाच्या जलाशयामुळे यापैकी काही गावांचे डोंगर उतारावर स्थलांतर झाले आहे. ते तसे करतानाच काळजी घ्यायला हवी होती. तसे तर केले गेले नाहीच, पण उलट डोंगर पोखरण्याचे व त्याची बांधणी ढिली करण्याचे प्रकार घडले. त्याचा परिणाम दिसतोच आहे.
माळीण गाव डिंभे धरणाच्या परिसरातच आहे. या परिसरात डोंगरमय प्रदेश आणि अतवृष्टी या नैसर्गिक कारणांमुळे, तसेच रस्ताबांधणी किंवा रुंदीकरण, जंगलतोड आणि डिंभे जलाशयाच्या पातळीत पावसाळ्यात होणारे बदल या मानवनिर्मित कारणांमुळे डोंगरउतारांचा समतोल ढळू लागल्याच्या घटना गेली २0 वर्षे घडत आहेत. या परिसरात असलेल्या
भागात डोंगररांगांना तडे जाणे, घरांना भेगा पडणे, झाडे कलणे अशा घटना वेळोवेळी दृष्टोत्पत्तीस येतात. लोकवस्ती असलेल्या भागात या घटनांची तीव्रता अधिक जाणवते.
मातीमुरुमाचा सच्छिद्र स्तर आणि त्याखाली बेसॉल्ट हा कठीण खडक, अशी या परिसराची संरचना आहे. पावसाचे पाणी झिरपून सच्छिद्र स्तर आणि त्याखालील कठीण खडकाच्या सांध्यातून उताराकडे वाहू लागते. पावसाळ्यात हा सांधा निसरडा होतो आणि अतवृष्टीदरम्यान सच्छिद्र खडक व त्यातील पाणी याचे वजन न पेलल्यामुळे घसरू लागतो. दरडी कोसळण्याची शक्यता दर्शविणारी ही पूर्वचिन्हे आहेत. दि. ३ ऑगस्ट २00३ रोजी माळीण गावापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या पांचाळे खुर्द या गावातही अशा घटना घडल्या होत्या. तेव्हापासूनच या सूचना मिळत होत्या; मात्र नेहमीप्रमाणेच त्याची दखल घेतली गेली नाही.
किमान आतातरी अशा आपत्ती टाळण्यास प्राधान्य द्यायला हवे. कोणताही डोंगर खोदताना त्याचे परिणाम काय होतील, याचा अभ्यास करायला हवा. डोंगर उतारांना तडे जाणे व तडे गेलेला भूभाग खचू लागणे, त्यामुळे भिंतींना भेगा पडणे, घरांची पडझड होणे, झाडे विद्युतखांब कलणे ही पूर्वचिन्हे दरडी अचानक कोसळत नाही हे दर्शवितात; म्हणून संबंधित गावातील नागरिक, प्रशासकीय कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, संघटनांचे कार्यकर्ते यांना या सूचनांची जाणीव करून देणे, त्या ओळखण्याचे प्रशिक्षण देणे, असे काम झाले तरी आपण किमान मनुष्यहानी तरी नक्की टाळू शकू.
सहज करता येण्यासारख्या गोष्टी..
गावठाणावरील भागात डोंगर उतारावर कोणत्याही प्रकारे मानवी अतिक्रमण टाळणे, डोंगराचा पायथा (इं२ी) संरक्षित करणे.
दरडी कोसळण्यासंबंधीच्या पूर्वचिन्हांची, जी
दरडी कोसळण्याआधी काही दिवस किंवा तास स्पष्ट दिसू लागतात, जाणीव करून देण्यासाठी आणि ती आढळल्यास सुरक्षित जागी तात्पुरते स्थलांतर कसे करावे, यासंबंधी जनजागरण मोहीम राबविणे.
जनजागरण मोहिमेत शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सामावून घेणे, त्यांना आपत्तीविषयक वस्तुनिष्ठ प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
आपत्तीशी सामना करताना राजकीय क्षेत्रातील नेते आणि प्रसिद्धिमाध्यमे यांनी संयम बाळगून आपत्तीग्रस्त विभागातील जनता अधिक भयभीत होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे. आत्मविश्वास वाढविणे हे अपेक्षित आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रात सक्षम मनुष्यबळाची वानवा आहे. जे मनुष्यबळ आहे ते अपुरे आहे. मदतकार्य त्वरित होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग जरूर करावा; परंतु त्याचबरोबर त्याच्या आपत्तीजनक परिस्थितीत र्मयादा जाणून स्थानिक जनतेस सामावून घेणे आवश्यक आहे.
(लेखक आपत्ती व्यवस्थापनातील जाणकार व भूपर्यावरणशास्त्रज्ञ आहेत.)