महापौर होणार सर्वसामान्यांच्या आऊट ऑफ रिच?
By Admin | Updated: April 18, 2017 22:13 IST2017-04-18T22:13:45+5:302017-04-18T22:13:45+5:30
दादर शिवाजी पार्क येथील महापौर निवास्थान हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्यामुळे महापौर निवासस्थान भायकळा येथील राणीच्या बागेत हलवण्यात येणार आहे.

महापौर होणार सर्वसामान्यांच्या आऊट ऑफ रिच?
>ऑनलाइन लोकमत
मुंबई ,दि.18 - दादर शिवाजी पार्क येथील महापौर निवास्थान हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्यामुळे महापौर निवासस्थान भायकळा येथील राणीच्या बागेत हलवण्यात येणार आहे. मात्र विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या प्रस्तावाचा विरोध करीत अतिरिक्त आयुक्तांचा मलबार हिल येथील बंगल्यात महापौरांचे निवासस्थान तयार करण्याची मागणी केली आहे. मात्र, मलबार हिलमध्ये उच्चभ्रू वस्ती असल्याने तसेच ते वाहतुकीच्या दृष्टीनेही सोयीचे नसल्याने महापौर सर्वसामान्यांच्या आऊट ऑफ रिच जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
महापौर निवासस्थानाबाबत निर्णय होईपर्यंत महापौर महाडेश्वर यांना समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या दादर येथील प्रशस्त महापौर बंगल्यात काहीकाळ मुक्काम करता आला आहे. मात्र येथे स्मारक उभारण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर महापौरांना राणीच्या बागेतील अतिरिक्त आयुक्तांसाठी राखीव पूर्वीचा बंगला देण्यात येणार आहे. परंतु या प्रस्तावाला शिवसेना नेत्यांनी पूर्वीपासूनच नकार घंटा वाजवली आहे. त्यानुसार विद्यमान महापौरांनीही तीच री ओढली आहे. महापौर बंगल्याची शान व गरीमेला साजेसा बंगला देण्याचा तगादा महापौरांनी प्रशासनाकडे लावला आहे.
त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प ) आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) यांचे निवासस्थान असलेले बंगले महापौर निवासस्थानाची देण्याची मागणी महाडेश्वर यांनी केली आहे. मलबारहिल येथे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांसाठी राखीव दोनच बंगले आहेत. या बंगल्यावरच महापौरांनी दावा केला आहे. मात्र महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असल्याने त्यांना भेटण्यासाठी दररोज शेकडो नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने हा बांगला गैरसोयीचा ठरणार आहे. त्यामुळे महापौरांची ही मागणी मान्य झाल्यास नागरिकांना त्यांच्या भेठीगाठी घेणे दुर्लभ होण्याची शक्यता आहे. प्रतिनिधी
राणीच्या बागेत बंगला यासाठी नको ....
-महापौरांना भेटण्यासाठी शेकडो नागरिक निवासस्थानी येत असतात. तसेच अनेक सामाजिक उपक्रम व कार्यक्रमही महापौर बंगल्यात होत असतात, मात्र राणीची बाग ही शांतता क्षेत्रात गणली जाते. त्यामुळे महापौर निवासस्थानावरील वर्दळीचा राणीबागेत प्राण्यांना त्रास होईल.
-संध्याकाळी ६ नंतर आवाजास प्रतिबंध आहे. मात्र कार्यक्रमानिमित्त ध्वनीक्षेपक लावणे अपरिहार्य आहे. परंतु प्राण्यांना त्याचा त्रास व महापौरांवर टीका होईल.
-राणी बागेतील जागा तुलनात्मक दृष्ट्या अपुरी व गैरसोयीची असल्याने महापौर बंगल्यावर येणाऱ्या पाहुण्यांचे आदरतिथ्य करण्यात कमतरता राहील.