पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. याला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या तपासावरून संताप व्यक्त केला आहे.
“अरे कुणाला मूर्ख बनवता? सध्या पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. 'आपल्याच' माणसांवर का कारवाई करतील? शासनाला जनाची नाही तर मनाची असेल तर वैष्णवीच्या आत्म्याचा विचार करा, तिच्या तहान बाळाचा विचार करा?” असं म्हटलं आहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
“#वैष्णवी_हागवणे प्रकरणात पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा असताना पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. असं मी म्हणत नाही तर आ. मोनिका रांजळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने स्थापन केलेली समिती म्हणत आहे.”
“काल #विधानसभेत या समितीने आपला अहवाल सादर केला. त्यात म्हटले आहे की, सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी, असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिलेले होते. मात्र, हा अहवाल विधानसभेत सादर होईपर्यंत कोणतीही माहिती समितीला दिली गेली नाही.”
“अरे कुणाला मूर्ख बनवता? सध्या पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. असे असताना 'आपल्याच' माणसांवर का कारवाई करतील ? मी आधीच म्हटले होते, प्रकरण ताजे असेपर्यंत आम्ही काहीतरी करतोय असे दाखवले जाईल, प्रकरण शांत झाले की आरोपींना व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जाईल आणि तसंच घडतंय! शासनाला जनाची नाही तर मनाची असेल तर वैष्णवीच्या आत्म्याचा विचार करा, तिच्या तहान बाळाचा विचार करा?” असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.