Ladki Bahin Yojana Update:महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेवरुन सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याचे समोर आले. हजारो महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेत या योजनेचे पैसे लाटल्याचे उघड झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडकी बहीण योजनेत चूक झाल्याचे म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा या योजनेवरून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातच मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना अदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडक्या बहिणींना आश्वासन देते की, ही योजना बंद होणार नाही. सरकारी काम करणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे जानेवारी महिन्यातच समजले होते. तेव्हाच पैसे थकवले होते. लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत. महायुती सरकारच्या काळातील ही योजना आहे. ही योजना बंद होणार नाही. मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल, असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
कॅबिनेट बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा
कॅबिनेट बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ऊस तोड महिलांच्याबाबत चर्चा झाली नाही. मात्र, ही गंभीर बाब आहे. यावर तोडगा काढला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांना ऊसतोड कामगार महिलांच्या आलेल्या रिपोर्टबाबत विचारणा केली आहे. त्याची कारणे शोधायला सांगितली आहेत, असेही अदिती तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर १ लाख ६० हजार ५५९ महिला-पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता २ हजार ६५२ महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उघडकीस आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आले होते. तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचलले. त्यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच ८ लाख ८५ हजार महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा आर्थिक लाभ उचलल्याचे तपासात आढळून आले आहे.