PM Modi Devendra Fadnavis: जगात सध्या युद्धजन्य परिस्थिती ओढवली असल्याने संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना पुढील काही महिने सोने खरेदी टाळण्याचा आणि पेट्रोल-डिझेल व खाद्यतेलाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनानंतर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेचे समर्थन केले. मोदीजी आपल्याकडून फार मोठी अपेक्षा करत नाहीत. देश संकटात असताना देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
"आज जगभरात मोठे संकट आहे. या संकटकाळात मोदीजींना आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. हा येत्या सहा महिन्यातील शेवटचा मोठा कार्यक्रम असेल. आता मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन आम्ही करणार नाही. मोदीजी जे सांगत आहेत, ते देशहितासाठी सांगत आहेत. आज आपण बघितलं तर जगभरात इंधनाच्या किंमतीमध्ये बरीच वाढ झाली आहे. अमेरिकेत ५१ टक्के, ब्रिटनमध्ये २२ टक्के, फ्रान्समध्ये २५ टक्के, जपानमध्ये ३५ टक्के, जर्मनीत २७ टक्के, इस्रायलमध्ये ३० टक्के, दक्षिण कोरियात ३० टक्के, इटलीमध्ये ३० टक्के, सिंगापूरमध्ये ३० टक्के वाढ आहे. पाकिस्तानसारख्या देशात तर २०० टक्के वाढ आहे. आपल्या देशात मात्र पंतप्रधान मोदींनी मात्र साडेतीन टक्के वाढ केली आहे," असे फडणवीसांनी अधोरेखित केले.
"संघर्षाची परिस्थिती असूनही इतके दिवस त्यांनी ही वाढ होऊ दिली नाही. ज्यावेळी देश संकटात असतो, जगावर संकट असतं, तेव्हा पंतप्रधानांनी काही अपेक्षा व्यक्त केली, तर आपण त्या अपेक्षेनुसार काम करणे, ही आपली जबाबदारी आहे. बंधू-भगिनींनो आपण देशभक्त आहोत, देशभक्ती ही अशा परिस्थितीत, देशासाठी किती त्याग करु शकतो, यावर अवलंबून असते. फार मोठा त्याग मोदींजींनी अपेक्षित केला नाही. परकीय चलन वाचवण्यासाठी सहा महिने सोने खरेदी करु नका. इंधन जेवढं वाचवता येईल तेवढे वाचवा असे सांगितले आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आपल्याला सांगितलेल्या आहेत," असा पुनरुच्चार त्यांनी केला.
"अनिर्बंध पद्धतीने खतांचा वापर करु नका, हे सांगितलं आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. आपण हे करु शकतो. केवळ सहा महिने आपल्याल हे करायचे आहे. सहा महिन्याच जगाची घडी चांगली झाली की या गोष्टी आपल्याला हे करायची आवश्यकता आपल्याला पडणार नाही. प्रत्येक देशभक्त भारतीय आणि छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी सांगितल्यावर आपले मावळे तयार असायचे. अशा या महाराष्ट्रात आपापल्या परीने जे जे शक्य आहे, ते ते आपण करुया," असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Web Summary : Fadnavis supports Modi's appeal to avoid gold purchases and conserve fuel. He emphasizes national responsibility during global crisis, urging citizens to demonstrate patriotism through small sacrifices for six months, echoing Shivaji Maharaj's spirit.
Web Summary : फडणवीस ने मोदी के सोना न खरीदने और ईंधन बचाने के आह्वान का समर्थन किया। उन्होंने वैश्विक संकट के दौरान राष्ट्रीय जिम्मेदारी पर जोर दिया, नागरिकों से छह महीने तक छोटे बलिदानों के माध्यम से देशभक्ति दिखाने का आग्रह किया।