पश्चिम विदर्भाला केंद्रीय मंत्रिमंडळाची हुलकावणी
By Admin | Updated: May 27, 2014 01:50 IST2014-05-27T01:50:51+5:302014-05-27T01:50:51+5:30
विविध आघाड्यांवर अन्याय सहन करणार्या विदर्भाला किमान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये तरी झुकते माप मिळेल, अशी वैदर्भीयांची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली.

पश्चिम विदर्भाला केंद्रीय मंत्रिमंडळाची हुलकावणी
यवतमाळ : विविध आघाड्यांवर अन्याय सहन करणार्या विदर्भाला किमान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये तरी झुकते माप मिळेल, अशी वैदर्भीयांची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. नितीन गडकरी वगळता विदर्भातील कुणालाही मोदी टीममध्ये स्थान मिळाले नाही. पश्चिम वैदर्भीयांची तर घोर निराशा झाली. केंद्रीय मंत्रिमंडळात यावेळी अमरावतीचे आनंदराव अडसूळ, अकोल्याचे संजय धोत्रे, यवतमाळ-वाशिमच्या भावना गवळी आणि चंद्रपूरचे हंसराज अहीर यांच्या पैकी कुणाला तरी संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. अडसूळ यापूर्वी बुलडाण्याचे खासदार असताना अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये अर्थराज्यमंत्री होते. ते पाचव्यांदा निवडून आले आहेत. भावना गवळी या शिवसेनेकडून एकमेव महिला खासदार आहेत. मोदींनी गुजरातची सूत्रे आनंदीबेन पटेल यांच्याकडे सोपवून ज्याप्रमाणे महिलांचा सन्मान केला. त्याचप्रमाणे मातोश्रीवरूनही भावना गवळींना मंत्रिमंडळात स्थान देऊन महिलांचा सन्मान राखला जाईल, अशी अपेक्षा महिला वर्गात होती. भावना गवळी तब्बल चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. अकोल्यातून संजय धोत्रे यांनीसुद्धा लोकसभेतील विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. बुलडाण्यातून प्रतापराव जाधव निवडून आले. मात्र यापैकी कुणालाही मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नाही. त्यामुळे पश्चिम विदर्भातील भाजपा-सेना कार्यकर्त्यांसह मतदारांचाही हिरमोड झाला आहे. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या दोन दिवसपूर्वी अचानक चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांचे नाव मंत्रिमंडळासाठी पुढे आले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे कोळसा मंत्रालयाची जबाबदारी दिली जाईल, असाही अंदाज माध्यमांकडून वर्तविला गेला. मात्र प्रत्यक्षात आज अहीर यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही. विदर्भातील भाजपा-सेनेच्या सर्व १० जागा निवडून देणार्या नितीन गडकरी यांचाच कॅप्टन म्हणून मंत्रिमंडळात समावेश केला. त्यांनाच मोदींनी मॅन आॅफ द मॅच दिल्याच्या प्रतिक्रिया राजकीय गोटातून उमटत आहेत. भावना गवळी अथवा हंसराज अहीर यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला असता तर यवतमाळ जिल्ह्याला केंद्रात प्रतिनिधित्व मिळाल्याचे समाधान नागरिकांना लाभले असते. कारण चंद्रपूर मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)