देशाविरुद्ध बोलणाऱ्यांना धडा शिकवू
By Admin | Updated: July 31, 2016 04:18 IST2016-07-31T04:18:30+5:302016-07-31T04:18:30+5:30
भारतीय सैन्य कोणत्या परिस्थितीत सीमेवर लढा देते, याची सर्वांनी जाणीव ठेवण्याची गरज आहे.

देशाविरुद्ध बोलणाऱ्यांना धडा शिकवू
पुणे : भारतीय सैन्य कोणत्या परिस्थितीत सीमेवर लढा देते, याची सर्वांनी जाणीव ठेवण्याची गरज आहे. सैन्य प्राणांची बाजी लावत असताना भारतमातेच्या विरोधात कोणालाही कोणतेही अपमानास्पद भाष्य करण्याचा अधिकार नाही. असे भाष्य करणाऱ्यांना धडा शिकविला जाईल, असा इशारा संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला.
पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि ‘भारतशक्ती डॉट इन’ यांच्या वतीने संरक्षण विश्लेषक नितीन गोखले लिखित ‘सियाचिन : धगधगते हिमकुंड’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी पर्रीकर बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर अध्यक्षस्थानी होते. या पुस्तकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. वायुदलाचे माजी उपाध्यक्ष ए. एम. भूषण गोखले, सियाचिन विषयक तज्ज्ञ लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी, लेखक नितीन गोखले आदी यामध्ये सहभागी झाले होते.
पर्रीकर म्हणाले, ‘‘भारतीय सैन्य अत्यंत सक्षम, संवेदनशील आणि शक्तिशाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा हेच अंतरिम ध्येय डोळयासमोर ठेवून सैन्य देशासाठी प्राणपणाने लढते. आपले सैन्य क्रूरपणे कोणत्याही भागात घुसखोरी करुन विनाकारण
हल्ला चढवत नाही. भारतीय सैन्याचीही काही तत्वे आहेत आणि ती काटेकोरपणे पाळली जातात. सोशल मिडियाच्या माध्यमातून
सैन्याबाबत गैरसमज पसरवणारे व्हिडिओ व्हायरल होतात. अशा बनावट व्हिडिओंवर विश्वास न ठेवू नये. सैन्य बळकट आहेच; त्यांना नागरिकांचाहीपाठिंबा मिळणेही महत्वाचे आहे. देशभक्ती हे आपले परम कर्तव्य आहे. या गुणांचे बाळकडू घरातूनच मिळत असते. आर्थिक सत्ता आणि सक्षम, बळकट सैन्य असेल तर देशासमोरील सर्व समस्या सुटू शकतात. त्यामुळेच देशावर कोणतेही संकट आल्यास सैन्य हातावर हात धरुन बसणार नाही. देशाच्या रक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व अधिकार भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. सरकारही सुरक्षेसंदर्भात आक्रमकपणे मात्र संयमी भूमिका मांडत आहे.’’
भूषण गोखले म्हणाले, ‘संकटातून संधी शोधणे आणि युध्दाचा अंत ही आपली उद्दिष्टे असायला हवीत. १९७१ च्या युध्दात सीमा निश्चित न झाल्याने सियाचिनचा प्रश्न उभा राहिला. सियाचिन ही भारताची अमूल्य संपत्ती आहे आणि ती इतर कोणाच्याही हाती सोपवली जाणार नाही.’
पुस्तकाचे लेखक नितीन गोखले यांनी पाकिस्तान आणि चीनला हातमिळवणी करता येऊ नये, यासाठी सियाचीनवर तळ ठोकून राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. सियाचिन पाकिस्तानला देऊन टाका, असे म्हणणारे लोक देशद्रोही
आहेत. भारतीय सैन्याच्या
पराकष्ठेमुळे हा भाग अद्याप भारताच्या ताब्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)