मुंबई : मनसे आणि भाजपच्या विचारात, कार्यपद्धतीत अंतर आहे. मात्र, भविष्यात मनसेच्या भूमिकेत बदल झाला, विचार व्यापक झाले, तर परिस्थितीनुसार युतीचा विचार होऊ शकतो. आज तरी तशी शक्यता नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य युतीच्या चर्चेवर खुलासा केला. मात्र, राज यांच्या भेटीबाबत ‘माझी गाडी तिथून बाहेर पडली, हे खरे आहे, पण त्यांच्या गाडीबाबत मला कल्पना नाही,’ असे सांगत फडणवीस-ठाकरे भेटीबाबत थेट उत्तर द्यायचे टाळल्याने गूढ आणखी वाढले.दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सभागृह गुरुवारी राजकीय टोलेबाजी आणि मिश्कील शेरेबाजीने न्हाऊन निघाले. निमित्त होते बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच आॅफ द ईअर पुरस्कारांचे. या मानाच्या पुरस्कार वितरणास राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री नवाब मलिक, महिला व बालविकास कल्याणमंत्री यशोमती ठाकूर, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष ई.पी. ढाकणे, लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा, लोकमतचे संपादकीय आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, बीकेटी टायर्सचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार आणि लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर उपस्थित होते. त्याचबरोबर ‘धुरळा’ या चित्रपटातील कलाकार अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ यांच्यासह झी स्टुडिओचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.राजकीय नेत्यांकडून होणारी टोलेबाजी आणि त्याला रसिकांकडून मिळणारी दाद यामुळे कार्यक्रम रंगतच गेला. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते व्यासपीठावर होते. विविध विषयांवर ठामपणे आपली भूमिका मांडतानाच एकमेकांना चिमटा काढण्याची संधीही नेत्यांनी साधली. राज ठाकरे यांच्याशी आमच्या भेटी अनेक वेळा झाल्या आहेत. मनसे व भाजप एकत्र येण्याची आज तरी चिन्हे नाहीत. मनसे व भाजपच्या विचारात, कार्यपद्धतीत अंतर आहे. आमचा पक्ष राष्ट्रीय आहे. दृष्टिकोनही व्यापक आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन चालावे लागते. भविष्यात मनसेच्या भूमिकेत बदल झाला, तर काहीही होऊ शकते. पण आजतरी तशी शक्यता दिसत नाही.अशा गुपचूप झालेल्या भेटींतून फारसे चांगले घडत नाही, असा टोला लगावून मंत्री नवाब मलिक म्हणाले की, राज ठाकरे यांच्या भेटीबाबत फडणवीस स्पष्टपणे काही बोलत नाहीत. मागे नारायण राणे यांची अहमदाबादला त्यांनी अशीच भेट घेतली होती. त्यांचे पुढे काय झाले ते सगळ्यांना माहीत आहे. गुपचूप भेटीत वाईटच घडते, असा टोला मलिक यांनी लगावला.
''मनसेच्या भूमिकेत बदल झाल्यास युतीचा विचार करू''
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 06:26 IST