राखीव साठ्यातून पाणी उचलणे लवकरच थांबणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:55 IST2025-06-21T12:52:37+5:302025-06-21T12:55:15+5:30
धरण क्षेत्रांत पावसाची दमदार हजेरी; पाणीपातळी १३ टक्क्यांवर

राखीव साठ्यातून पाणी उचलणे लवकरच थांबणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांत चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत धरणांतील पाण्याची पातळी १३ टक्के झाली आहे. परिणामी येत्या काही दिवसांत राखीव साठ्यातून पाणी उचलणे बंद होणे अपेक्षित आहे. याबाबत महापालिका प्रशासन लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने प्रशासनाने अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठा उचलण्यास १० जूनपासून सुरुवात केली होती.
यंदा मे महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी साधारणपणे ७ जूननंतर पावसाला सुरुवात होते. मे महिन्यात फक्त मुंबईच नव्हे, तर धरण क्षेत्रांतही पाऊस झाला. आताही जूनमध्ये पावसाचा जोर चांगला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. एरवी जुलैमध्ये भरणारा पवई तलावही यंदा जूनमध्ये वाहू लागला आहे. धरणांतील पाण्याची पातळी वाढत असून, त्यात आणखी काही टक्के वाढ झाली तर राखीव साठ्यातून पाणी उचलणे बंद केले जाईल, असे सांगण्यात आले.
...तर धरणेही आधीच भरण्याची शक्यता
धरणांतील पाणीसाठा १० टक्क्यांच्या खाली गेल्यास राखीव साठ्यातून पाणी उचलले जाते. मात्र, पावसाला आता सुरुवात झाली आहे. अजून पावसाचे चार महिने शिल्लक आहेत. पाऊस दमदार झाला तर यंदा सर्व धरणे अपेक्षेपेक्षा आधीच भरण्याची शक्यता आहे. एक-दोन दिवसांमध्ये धरण क्षेत्रांत किती पाऊस होत आहे, पाण्याच्या पातळीत किती वाढ होत आहे, याचा अंदाज घेऊन राखीव साठ्यातून पाणी उचलणे बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासन घेऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
एक लाख ९० हजार दशलक्ष लिटर साठा
पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांत मिळून पाणीसाठा जवळपास १३ टक्के एवढा झाला आहे. मागील वर्षी हे प्रमाण फक्त पाच टक्के होते. या सर्व धरणांमध्ये मिळून एक लाख ९० हजार ७४१ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. मागील वर्षी हे प्रमाण ७७ हजार ४४० दशलक्ष लिटर एवढे होते.