मराठवाड्यास नाशिकचे पाणी रेल्वेने द्यावे!
By Admin | Updated: October 19, 2015 02:58 IST2015-10-19T02:58:05+5:302015-10-19T02:58:05+5:30
गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १.३६ टीएमसी पाणी वहन मार्गाने सोडण्यास जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी कडाडून विरोध दर्शविला आहे

मराठवाड्यास नाशिकचे पाणी रेल्वेने द्यावे!
नाशिक : गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १.३६ टीएमसी पाणी वहन मार्गाने सोडण्यास जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. त्याऐवजी रेल्वे किंवा टँकरने पाणी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता गंगापूर धरणावर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आ. अनिल कदम व आ. कदम व आ. राजाभाऊ वाजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गंगापूर ते जायकवाडी हे अंतर २३४ कि.मी. असून, प्रस्तावित १.३६ टीएमसी (३८.३८ एमसीएफटी) पाणी हे वहन मार्गाने जायकवाडीपर्यंत पोहोचू शकणार नाही. वीजपुरवठा खंडित करून हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. शिवाय वहन मार्गाने ८० टक्के पाण्याची गळती होऊन ते वाया जाणार आहे. २०१२-१३मध्येही मराठवाड्यात टंचाईची स्थिती उद्भवली तेव्हा तीन आवर्तने देण्यात आली होती, परंतु पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचू शकले नव्हते, असे कदम यांनी सांगितले. रेल्वेवॅगनद्वारे पाणी पोहोचविता येऊ शकेल, असेही कदम म्हणाले.