शिरूर शहरावर पाणीसंकट; तीन दिवसांआड पाणी

By Admin | Updated: June 30, 2016 01:40 IST2016-06-30T01:40:45+5:302016-06-30T01:40:45+5:30

शहराला पाणीपुुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यातील पाणी तळाला गेल्याने शिरूरकरांवर पाणीसंकट कोसळले आहे.

Water conservation on the city of Shirur; Three days water | शिरूर शहरावर पाणीसंकट; तीन दिवसांआड पाणी

शिरूर शहरावर पाणीसंकट; तीन दिवसांआड पाणी


शिरूर : शहराला पाणीपुुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यातील पाणी तळाला गेल्याने शिरूरकरांवर पाणीसंकट कोसळले आहे. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे शहराला उद्यापासून (दि. ३०) तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेला घ्यावा लागला आहे.
शहराला सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मार्च महिन्यात बंधाऱ्यात पाणीसाठा मर्यादित झाल्याने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. यानंतर नगर परिषदेने बंधाऱ्याच्या वरील भागातील इतर बंधाऱ्यातील पाणी खाली आणण्यासाठी १० ते १५ दिवस प्रयत्न केले. हे पाणी बंधाऱ्यात पोहोचण्यापूर्वी आहे तो पाणीसाठा कमी होत गेल्याने ३ एप्रिलपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. १७ एप्रिलला वरील बंधाऱ्यातील पाणी या बंधाऱ्यात आले. मात्र, हा साठाही मर्यादित असल्याने नगर परिषदेने शहराला दोन दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू ठेवला.
यादरम्यान सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यासमवेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कुकडी प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
या मागणीनुसार ५ मे रोजी कालव्याद्वारे सोडलेले पाणी बंधाऱ्यात पोहोचले. यातून बंधारा अर्धाच भरला; मात्र यानंतर शहराला पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. या बंधाऱ्यातील पाणी शेतीसाठी उपसले गेल्याने हा साठाही कमी होऊ लागल्याने १६ जूनपासून पुन्हा २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आताची परिस्थिती याहून गंभीर झाल्याने नगरपरिषदेला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पाणीटंचाईच्या या परिस्थितीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच पाणी वाया जाऊ नये यासाठी नळाला तोट्या बसवून घ्याव्यात, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
पाऊस पडल्याशिवाय बंधाऱ्यात पाणीसाठा उपलब्ध होणार नसल्याने शहरावर पाणीसंकट कोसळले आहे. शहरात गेल्या तीन दिवसांत पाऊस झाला नसून, धरणक्षेत्रातही पाऊस नाही. अशात पाऊस न झाल्यास शहराला मोठ्या पाणीसंकटाचा सामना करावा लागेल.

Web Title: Water conservation on the city of Shirur; Three days water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.