बियाणे विक्रेत्यांवर वॉच!

By Admin | Updated: May 28, 2014 01:03 IST2014-05-28T01:03:06+5:302014-05-28T01:03:06+5:30

मान्सूनची चाहूल लागताच शेतकर्‍यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. मशागत करून शेतीला पेरणीसाठी सज्ज केले आहे. आता केवळ मान्सूनची प्रतीक्षा आहे. पुढील जून महिन्यात त्याचे

Watch the sellers of seeds! | बियाणे विक्रेत्यांवर वॉच!

बियाणे विक्रेत्यांवर वॉच!

गुण नियंत्रण विभागाची शोधमोहीम : स्पेशल स्क्वॉड सज्ज

जीवन रामावत - नागपूर

मान्सूनची चाहूल लागताच शेतकर्‍यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. मशागत करून शेतीला पेरणीसाठी सज्ज केले आहे. आता केवळ मान्सूनची प्रतीक्षा आहे. पुढील जून महिन्यात त्याचे आगमन होताच पेरणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी खत व बियाण्यांची जोमाने खरेदी सुरू झाली आहे. शेतकर्‍यांची खत व बियाण्यांच्या दुकानात गर्दी वाढू लागली आहे. मात्र या घाईगर्दीत कुणी शेतकर्‍यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करू नये, यासाठी कृषी विभागाने बियाणे विक्रेत्यांवर करडी नजर रोखली आहे.

विशेष म्हणजे, यंदा सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गतवर्षी अतवृष्टीमुळे विदर्भातील सोयाबीन पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा शेतकर्‍यांना पेरणीसाठी सोयाबीन बियाणे उपलब्ध होईल की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी यापूर्वीच यंदा सोयाबीनचे लागवड क्षेत्र कमी होऊ न कापसाचे क्षेत्र वाढण्याचे भाकीत केले आहे. गतवर्षीची आकडेवारी पाहता, नागपूर विभागात ४ लाख २२ हजार ५४४ हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड झाली होती. त्यासाठी १ लाख ९५ हजार ४४८ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. शिवाय यंदा ३ लाख ७८ हजार ३५0 हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड होण्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. त्यासाठी २ लाख ८३ हजार ४७0 क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्यास व्यापार्‍यांकडून त्याचा काळाबाजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु कृषी विभागाचे गुण नियंत्रण अधिकारी अशा व्यापार्‍यांवर नजर रोखून बसले आहेत; शिवाय दुकानांची तपासणी करून बियाण्यांचे नमुने गोळा केले जात आहेत.

७0 भरारी पथके

कृषी विभागाने बोगस बियाणे विक्रेत्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. याचाच एक भाग म्हणून कृषी विभागाने ७0 भरारी पथके सज्ज केली आहेत. यामध्ये सुमारे ५३0 अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला. याशिवाय सोयाबीनसाठी विशेष कक्षही तयार करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून सोयाबीनसंबंधीच्या सर्व तक्रारी स्वीकारून त्यांचे निराकरण केले जाणार आहे. या कक्षाची एका वरिष्ठ कृषी अधिकार्‍यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

२९ जणांविरुद्ध न्यायालयीन खटले

गतवर्षी कृषी विभागाने नागपूर जिल्ह्यात एकूण ६६५ बियाण्यांचे नमुने घेऊन त्यांचे परीक्षण केले असता ३३ नमुने अप्रमाणित आढळून आले होते. त्यापैकी १९ नमुने ताकीदयोग्य असल्याने संबंधित कंपनी व विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली होती; शिवाय १४ लोकांविरुद्ध न्यायालयीन कारवाई करण्यात आली. याशिवाय रासायनिक खतांचे एकूण ४0७ नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी ५४ नमुने अप्रमाणित आढळून आले होते. त्यानुसार ३८ कंपन्या व विक्रेत्यांना ताकीद देउन, इतर १५ लोकांविरुद्ध कठोर न्यायालयीन कारवाई करण्यात आली होती. अशाप्रकारे गतवर्षी एकूण २९ लोकांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले.

अशी झाली कारवाई

कृषी विभागाच्या माहितीनुसार, गतवर्षी हिंगणा तालुक्यातील एमआयडीसीमधील मे. फिस्ट्रल हिंक्स विरुद्ध कृषक वापरासाठी असलेल्या युरिया खताची अवैध साठवणूक व वापर केल्याप्रकरणी ७४ बॅग खत जप्त करून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे, यात आरोपीला अटकही झाली होती. तसेच नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथील मे. धरती अँग्रो एजन्सीज व मे. कृषी मित्र यांनी बीटी कापूस बियाण्यांची अधिक दराने विक्री केल्याप्रकरणी १ लाख ८३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. शिवाय कुही तालुक्यातील मे. श्रेयस कृषी सेवा केंद्र यांनी मुदतबाह्य कीटकनाशकांचा साठा दुकानात ठेवून त्याची विक्री केल्याप्रकरणी ५७ हजार रुपयांचा माल जप्त करून कारवाई करण्यात आली होती.

Web Title: Watch the sellers of seeds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.