लेडिज स्पेशलसाठी दोन वर्षे वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 03:40 IST2016-10-18T03:40:50+5:302016-10-18T03:40:50+5:30

महिला प्रवाशांत लक्षणीय वाढ झाल्याने त्यांच्यासाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी सुरू आहे.

Waiting for two years for Ladies Special | लेडिज स्पेशलसाठी दोन वर्षे वेटिंग

लेडिज स्पेशलसाठी दोन वर्षे वेटिंग

अनिकेत घमंडी,

डोंबिवली- मध्य रेल्वेवरील एकंदर प्रवाशांची संख्या वाढतानाच त्यातील महिला प्रवाशांत लक्षणीय वाढ झाल्याने त्यांच्यासाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी सुरू आहे. मात्र, पुढील दोन वर्षांत पाचवा आणि सहावा मार्ग पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याने तोवर तरी नव्या लेडिज स्पेशल लोकल वाढणार नसल्याचे स्पष्टीकरण डीआरएम रवींद्र गोयल यांनी दिले.
उपनगरी रेल यात्री उपभोक्ता समितीच्या निमंत्रित सदस्यांशी ते बोलत होते. संख्येच्या तुलनेत महिला प्रवाशांसाठी मर्यादित डबे, अपुरी जागा यामुळे गाडीत चढताना अनेक अडचणी येतात. गर्दीच्या वेळेत कल्याणहून सकाळी ८वा.च्या सुमारास अवघी एक लेडिज स्पेशल लोकल सोडली जाते. ती त्या स्थानकासह ठाकुर्ली, डोंबिवलीत येईपर्यंतच तुडुंब भरते. परिणामी, अन्य स्थानकांतील महिला प्रवाशांना तिचा उपयोग होत नाही. ती गाडी कल्याण येथून सुटत असल्याने आसनगाव, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आदी स्थानकांतील महिला प्रवाशांना त्याचा उपयोग होत नाही. कल्याणमधील सर्वच महिलांना ती गाडी सोयीची नाही. त्यामुळे सकाळच्या वेळेत बदलापूर-अंबरनाथमधून आणखी एक महिला स्पेशल लोकल सोडण्यात यावी, अशी मागणी एका सदस्याने डीआरएमसमोर मांडली. मात्र, ते शक्य नाही. येत्या दोन वर्षांत आधी पाचव्या-सहाव्या मार्गांचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य आहे. तसेच रेक्स (डबे) उपलब्ध नसून ते जसजसे येतील, त्यानुसार अन्य मागण्यांवर विचार करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
ठाणे स्थानकातून सकाळी ९.१४ च्या सुमारास ट्रान्स-हार्बर मार्गावरून सुटणारी महिला विशेष (मातृभूमी) लोकल रिकामी धावते. त्या गाडीला १२ डबे असून ते पूर्ण भरत नाहीत. त्यामुळे त्या गाडीतील पहिले अथवा शेवटचे सहा डबे पुरुष प्रवाशांसाठी खुले करावेत, यासाठी ठाण्यात दोन वर्षांपूर्वी आंदोलन झाले होते. एकीकडे अशी परिस्थिती असतानाच मुख्य मार्गावर मात्र लोकल उपलब्ध नाही, हे कारण पुढे केले जाते, याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी निवडणुका झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी तातडीने तत्कालीन महाव्यवस्थापक सूद यांची भेट घेतली. त्यावेळी शिवसेनेच्या उल्हासनगर-अंबरनाथसह अन्य ठिकाणच्या महिलांनी सकाळच्या वेळेत आणखी एक महिला विशेष लोकलची मागणी केली होती. तेव्हापासून ही मागणी प्रलंबित आहे. हेही त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले.
>मुख्य मार्गावर विशेषत: बदलापूर ते ठाणे कळवा या स्थानकांदरम्यान महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय असली, तरी राखीव लोकल सोडताना इतर सर्व पर्यायांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे सद्य:स्थितीत तरी जादा महिला विशेष लोकल सोडणे शक्य नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Web Title: Waiting for two years for Ladies Special