दुपारनंतर मतदानाचा टक्का वधारला

By Admin | Updated: October 15, 2014 14:22 IST2014-10-15T07:49:42+5:302014-10-15T14:22:22+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का दुपारनंतर वधारला असून दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२ टक्के मतदान झाले आहे.

The voting percentage increased after noon | दुपारनंतर मतदानाचा टक्का वधारला

दुपारनंतर मतदानाचा टक्का वधारला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का दुपारनंतर वधारला असून दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२ टक्के मतदान झाले आहे. 
महाराष्ट्राच्या २८८ तर हरियाणाच्या ९० जागांसाठी बुधवारी सकाळी मतदानाला सुरूवात झाली. सकाळी मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र सकाळी अकरानंतर मतदारांचा प्रतिसाद वाढत गेला. किरकोळ अपवाद वगळता राज्यात सर्वत्र शांततेत मतदान सुरु आहे. मतदारांनी मतदान करावे यासाठी सेलिब्रीटीही वारंवार आवाहन करत आहेत. 
महाराष्ट्रातील ८ कोटी जनता ४११९ उमेदवारांचे तर हरियाणातील १.६० कोटी जनता १३५१ उमेदवारांचे भवितव्य ठरवत आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसेल तरी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड, मनरेगा कार्ड, पॅनकार्ड, बॅक अथवा पोस्ट यांची फोटो असलेली खातेपुस्तिका तसेच छायाचित्र असलेली पेन्शनची कागदपत्रे या पर्यायी ओळखपत्रांसह मतदान करता येऊ शकते.
महाराष्ट्रात यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि मनसे या पाचही पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने पंचरंगी लढत पहायला मिळणार आहे. या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 
मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली असून दोन लाख राज्य पोलिसांच्या मदतीला निमलष्करी दलाची मोठी कुमक असेल. 
 
दुपारी एक वाजेपर्यंत झालेले मतदान
उस्मानाबाद - ३५ टक्के, भंडारा - ३३ टक्के, यवतमाळ - २९.७९ टक्के, हिगोली - ३६ टक्के, औरंगाबाद - ३२.३५ टक्के, पुणे - ३३ टक्के, लातूर - ३७ टक्के, धुळे - ३१. ३७ टक्के, नंदुरबार - ३४. ११ टक्के,  अकोला - २४ टक्के, यवतमाळ २९ टक्के, बीड - ३२.७० टक्के, मुंबई २१.६ टक्के, बुलढाणा २८ टक्के, मुंबई उपनगर - २६ टक्के, अमरावती - २८.१५ टक्के, 
कोल्हापूर - ३२ टक्के, नांदेड - ३५ टक्के, सिंधुदुर्ग - २८ टक्के, सांगली ३७.७० टक्के, वाशिम - २७ टक्के, सातारा - ३४ टक्के, ठाणे - २१.१९ टक्के, गोंदिया - ३९ टक्के, पालघऱ - २९ टक्के
 
तांत्रिक बिघाडांमुळे मतदान यंत्रे निकामी
नागपूरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदान यंत्र बंद पडले असून मतदानाची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. तसेच नाशिकमधील मनपा शाळेतील एक मतदान यंत्रही बंद पडल्याचे समजते. तर मुंबईतील शिवडी येथेही बीडीडी चाळीतील बूथवर मतदान यंत्र बंद पडले आहे. 
 
मतदार यादीत नाव नसल्याने मशिन फोडले
सातारा येथील पाटण तालुक्यातील भुरकेवाडी येथे एका कार्यकर्त्याने मतदार यादीत नाव नसल्याने व्होटींग मशिन जमिनीवर आदळून फोडले. या घटनेनंतर पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले तसेच केंद्रात नवीन मशिनही बसवण्यात आले.
 
 
विदर्भात मुसळधार पाऊस 
विदर्भात मुसळधार पावसामुळे मतदानावर परिणाम झाला असून रामटेक येथे मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. वनेर येथे पारशिवनीत आवडेघाटातील एका मतदान केंद्रावर वीज कोसळल्याने एक पोलीस ठार झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.
 
सेलिब्रिटींनीही बजावला मतदानाचा हक्क
सर्वसामान्य जनतेप्रमाणे अनेक सेलिब्रिटींनीही बुधवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदार यादीत नाव नसल्याने गुणी अभिनेता अतुल कुलकर्णीला लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नव्हते. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी त्याने बुधवारी सकाळीच मुंबईत मतदान केले. तर अभिनेता अभिषेक बच्चनने त्याची आई जया बच्चनसह मतदान केले. अभिनेत्री रेखानेही सकाळी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. तर सचिन तेंडुलकरनेही पत्नीनीसह मतदान करत मतदारांना आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. याशिवाय उद्धव ठाकरे, राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
 

 

Web Title: The voting percentage increased after noon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.