विदर्भात संततधार

By Admin | Updated: July 22, 2014 01:00 IST2014-07-22T01:00:30+5:302014-07-22T01:00:30+5:30

विदर्भातील दोन जिल्हे वगळता उर्वरित नऊ जिल्ह्यांमध्ये रविवार रात्रीपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी दिवसभरात काही वेळ उसंत घेऊन पाऊस राहून-राहून बरसत होता.

Vidharbha Santhadhar | विदर्भात संततधार

विदर्भात संततधार

पर्लकोटा नदीला पूर : भामरागडचा संपर्क तुटला
नागपूर : विदर्भातील दोन जिल्हे वगळता उर्वरित नऊ जिल्ह्यांमध्ये रविवार रात्रीपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी दिवसभरात काही वेळ उसंत घेऊन पाऊस राहून-राहून बरसत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आल्याने ५० गावांचा संपर्क तुटला आहे. अहेरी आगारातून सोडण्यात आलेल्या बसफेऱ्यांनाही फटका बसला. दरम्यान, विदर्भात मान्सून सक्रिय झाल्यामुळे पेरण्यांना जोर आला आहे.
अकोला व वाशिम वगळता नागपूर शहरासह ग्रामीण तालुके, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, बुलडाणा आदी जिल्ह्यांमध्ये सर्वत्र सोमवारी दि. २१ जुलै रोजी पाऊस झाला. या पावसामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील ५५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यात २ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन व तुरीसह विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात २७८ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. शिवाय रविवारी केवळ एका दिवसांत २५ ते ३० मिमी पाऊस झाला आहे. एका वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याच्या मते, पुढील आठवडाभरात जिल्ह्यातील संपूर्ण पेरणी आटोपण्याची शक्यता आहे.
दिवसभर ‘रिपरिप’
रविवारी सकाळपासूनच नागपूर व आजूबाजूच्या परिसरात पावसाची रिपरिप सुरू असून सोमवारीदेखील असेच चित्र पाहायला मिळाले. दुपारच्या सुमारास पावसाचा जोरदेखील वाढल्याचे दिसून आले. दिवसभरात शहरात १०.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. वातावरणातील गारवादेखील वाढला होता. दरम्यान, येत्या २४ तासात अशाच प्रकारचे वातावरण राहील व पावसाच्या सरी येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Web Title: Vidharbha Santhadhar