मुंबई - विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत असून या जागांवरील सदस्यांना आज विधान परिषदेत निरोप समारंभ देण्यात आला. यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्याचे कौतुक करताना त्यांना चिमटाही काढला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणात मतभेद असतात, अनेक वेळा वेगवेगळ्या भूमिका असतात. कधी आपण सोबत असतो, कधी संघर्ष करतो. परंतु यापलीकडचे एक नाते राजकारणात असते. ते नाते असते सहप्रवासाचे, त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबतचा प्रवास हा आमचा अनेक वर्षांचा राहिला आहे. अनेक वर्ष आम्ही सहप्रवासी राहिलो आहोत. अनेक चांगल्या गोष्टी समाजासाठी, राज्यासाठी एकत्रित करण्याची संधीही आम्हाला प्राप्त झाली. खरेतर उद्धव ठाकरेंचा जो स्वभाव आणि व्यक्तिमत्व आहे यात राजकारण थोडे कमी आहे. मुळात त्यांचा स्वभाव राजकारणी नाही. त्यामुळेच अनेक वेळा ते जे काही निर्णय घेतात त्यामुळे परिस्थिती वेगळ्या पद्धतीची उद्भवते. मात्र हा एक गुण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचाही होता. एकदा ठरवले की निर्णय घेऊन टाकायचा, असा स्वभाव उद्धव ठाकरेंचा आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच उद्धव ठाकरे तसे छायाचित्रकार आहेत. निष्णात तज्ज्ञ असे ते छायाचित्रकार आहेत. महाराष्ट्राच्या विविध छटा उद्धव ठाकरेंनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कॅप्चर केल्यात. गडकिल्ले, निसर्ग, वारकरी परंपरा हे सगळे त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले. हे सगळे फोटो पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंचे संवेदनशील मन त्यातून पाहायला मिळते. म्हणूनच महाराष्ट्र देशा, पाहावा विठ्ठल ही जी त्यांची कामे आहेत. ते केवळ छायाचित्रण नाही. तर या माध्यमातून आपल्या संस्कृतीची जपणूक करण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केले. हे करण्याकरता खूप कष्ट त्यांनी घेतले आहेत. जेव्हा वारीचे छायाचित्रण केले तेव्हा अतिशय रिस्क घेऊन हेलिकॉप्टरच्या उघड्या दरवाजातून फोटोग्राफी त्यांनी केली. अनेकदा जंगलात छायाचित्रण केले. आपला छंद उद्धव ठाकरे यांनी जोपासण्याचं काम चांगल्याप्रकारे केले असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान, राजकारणात आल्यानंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले. पक्षप्रमुख झाल्यानंतर अनेक संकटे, संघर्ष आले. या संघर्षात बराच काळ आम्ही सोबत पुढे गेलो. २०१० नंतर आणि २०१४ नंतर अधिक जवळीक माझी आणि त्यांची आली. या सगळ्यात मैत्रीची भावना आमच्यात तयार झाली. आज ही भावना नाही असं मी म्हणणार नाही. परंतु त्यांची राजकीय भूमिका आहे आणि आमचीही राजकीय भूमिका आहे. त्या राजकीय भूमिका वेगळ्या झाल्यात. राजकारणात काम करताना अनेकदा मी पाहिले की, एखादा निर्णय घेताना त्याच्या परिणामांची चिंता त्यांनी केली नाही. विशेषत: ठाकरेंची शिवसेना असो वा शिंदेंची शिवसेना...हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात वेगळा पायंडा पाडला. सामान्यतल्या सामान्य माणसाला ज्याला राजकीय चेहरा नाही, त्यातून राजकीय नेतृत्व उभे करणे हा गुण बाळासाहेबांनी त्यांना दिला. उद्धव ठाकरेंनी हा गुण जोपसला असं कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले.
'कोट्या'धीश उद्धव ठाकरे
पू.ल देशपांडे यांना 'कोट्या'धीश म्हणतात परंतु त्यांच्यानंतर ही उपाधी जर कुणाला द्यायची असेल तर ती उद्धव ठाकरेंना देईन. त्यांच्या बोलण्यात अनेकदा पाहतो त्यात मिश्किलपणा असतो. सहजतेने बोलतात. अनेक वेळा ते भिडताना दिसतात, जोरदार प्रतिवाद करताना दिसतात परंतु त्यांचा मूळ स्वभाव शांत, संयमी आणि संबंध जपण्याचा स्वभाव आहे. राजकारणात वेगवेगळ्या प्रकारचा आवेश आणावा लागतो. तो आवेश आणताना त्यांना पाहतो. आता या सभागृहात ते ६ वर्ष होते. त्यांनी ठरवले तर पुन्हा सभागृहात दिसतील. आम्हाला यावेळी सभागृहात कमी कोट्या ऐकायला मिळाल्या. जर तुम्ही परत आलात तर जास्त कोट्या आम्हाला ऐकायला मिळाव्यात ही आमची अपेक्षा आहे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शायरी म्हटलं. "साजिश की सौगात पकड़कर बैठ गए, अनचाहे हालत पकड़कर बैठे गए , और जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए" असं फडणवीस यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.
Web Summary : At farewell, Fadnavis praised Thackeray's work, highlighting his photography skills and calm nature. He humorously suggested Thackeray, known for wit, should return to the house to share more jokes, acknowledging their differing political paths.
Web Summary : विदाई समारोह में, फडणवीस ने ठाकरे के काम की सराहना की, उनकी फोटोग्राफी कौशल और शांत स्वभाव पर प्रकाश डाला। उन्होंने मजाकिया अंदाज में कहा कि ठाकरे को सदन में और मजाक साझा करने के लिए लौटना चाहिए, और उनकी अलग-अलग राजनीतिक राहों को स्वीकार किया।