पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल शनिवारी जाहीर झाला असून, यंदाही महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला आहे. सुमारे शंभर जणांनी या परीक्षेत यश मिळविले आहे. पुण्यातील अबोली नरवणे हिने राज्यात प्रथम कमांक पटकावला आहे. देशपातळीवर ती ७८व्या क्रमांकावर आहे. अबोली सध्या भारतीय महसूल सेवेत कार्यरत आहे. स्वप्निल टेंबे, अभिजित शेवाळे, अनिकेत पाटणकर आणि संदीप घुगे यांनीही घवघवीत यश मिळवले आहे. देशभरात यंदा मुलींनी बाजी मारली असून, दिल्लीतील अपंग असलेल्या भारतीय महसूल सेवा अधिकारी ईरा सिंघल हिने देशातून पहिला क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे पहिल्या चारही जागा मुलींनीच काबीज केल्या आहेत. केरळची रेणू राज ही द्वितीय, भारतीय महसूल सेवेतील अधिकारी निधी गुप्ता हिने तिसरे स्थान पटकाविले आहे. दिल्लीतीलच वंदना राव चौथ्या तर आयआरएस अधिकारी सुहर्ष भगत पाचव्या क्रमांकावर आहेत.देशातून यूपीएससीच्या १ हजार ३६४ पदांसाठी साडेचार लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १६ हजार २८६ उमेदवार अंतिम परीक्षेपर्यंत पोहोचले होते. मुलाखतीपर्यंत ३ हजार ३०८ विद्यार्थी पोहोचले. त्यानंतर चार दिवसांतच निकाल जाहीर झाला. यात पहिले चार क्रमांक मुलींनीच पटकावले आहेत. दिल्लीच्या ईरा सिंघल हिने देशात पहिला क्रमांक पटकावला. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरही मुलींनीच बाजी मारली. मुलांमध्ये सुहर्ष भगत हा देशात पहिला आला आहे. (प्रतिनिधी)माझे प्रेरणास्थान सचिन तेंडुलकर असून, त्याने आपल्या खेळाप्रति ठेवलेली निष्ठा समोर ठेवूनच मी यूपीएससीचा अभ्यास केला. त्यामुळे या परीक्षेत मला दुसऱ्यांदा यश मिळाले. केवळ हुशारी असून चालत नाही, तर कठोर परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. - अबोली नरवणे, राज्यातून पहिलीमी आनंदित आहे. विश्वासच बसत नाही. मी केवळ परीक्षेची तयारी केली होती. मला आयएएस अधिकारी व्हायचे होते. विकलांग लोकांसाठी काम करण्याची माझी इच्छा आहे.- ईरा सिंघल, देशात प्रथम
यूपीएससीत महाराष्ट्राचा दबदबा!
By admin | Updated: July 5, 2015 03:09 IST