बेभरवशाच्या पावसाने खरीप क्षेत्र जैसे थे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:31 IST2018-06-17T23:31:26+5:302018-06-17T23:31:26+5:30
दर दोन-तीन वर्षांनंतर पाऊसमान बदलत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील खरीप पेरणीचे क्षेत्रही कमी-अधिक होत असून, मागील वर्षी एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

बेभरवशाच्या पावसाने खरीप क्षेत्र जैसे थे!
सोलापूर : दर दोन-तीन वर्षांनंतर पाऊसमान बदलत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील खरीप पेरणीचे क्षेत्रही कमी-अधिक होत असून, मागील वर्षी एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. तूर, उडीद, मका याशिवाय अलीकडे मराठवाड्याच्या लगतच्या क्षेत्रात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात
वाढ होत असली, तरी खरिपाच्या क्षेत्रात फार असा बदल होत नाही.
सोलापूर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बी जिल्हा म्हणून ओळखला जातो. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभऱ्याच्या पेरणीशिवाय ऊस लागवडही मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या क्षेत्रात आजही खरीप पेरणीवर शेतकरी भर देतात. यामध्ये अक्कलकोट, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, करमाळा या तालुक्यात प्रामुख्याने खरीप पेरणी होते. सोलापूर जिल्ह्याचे खरीप पेरणीचे सरासरी क्षेत्र ७९ हजार १७ हेक्टर इतके आहे. जून-जुलै महिन्यात पाऊस जसा पडेल, त्या प्रमाणात खरीप पेरणीचे क्षेत्र कमी-अधिक होते. मागील वर्षी जून महिन्यात चांगला पाऊस पडल्याने प्रत्यक्षात एक लाख ७ हजार ६७४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागांत चांगला पाऊस पडला असला, तरी अनेक भागात अद्यापही पेरणीस उपयुक्त पाऊस झालेला नाही.
ज्या भागात जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागातही नंतर पाऊस लांबणार असल्याचे अंदाज सांगितल्याने पेरणी करण्यास शेतकरी धाडस करत नाहीय. जिल्ह्यातील शेतकरी जूनमध्ये चांगला पाऊस पडला, तर उडीद, मूग, जुलै महिन्यात चांगला पाऊस पडला, तर तूर व सोयाबीनवर भर देतो.