रेल्वेचे भुयारी मार्ग पाण्यात

By Admin | Updated: June 28, 2016 02:12 IST2016-06-28T02:12:11+5:302016-06-28T02:12:11+5:30

तांत्रिक त्रुटींमुळे दरवर्षी रेल्वे प्रवाशांना पाय धुवूनच स्थानकात प्रवेश करण्याचा प्रसंग अनुभवायला मिळत आहे.

The underground water of the railway is in the water | रेल्वेचे भुयारी मार्ग पाण्यात

रेल्वेचे भुयारी मार्ग पाण्यात


नवी मुंबई : रेल्वे स्थानकालगतचे भुयारी मार्ग बनवताना झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे दरवर्षी रेल्वे प्रवाशांना पाय धुवूनच स्थानकात प्रवेश करण्याचा प्रसंग अनुभवायला मिळत आहे. बहुतांश भुयारी मार्ग पावसामुळे सध्या जलमय असून, सुमारे तीन ते चार फूट पाण्यातून प्रवाशांना जावे लागत आहे, तर वाहनांसाठी असलेले काही भुयारी मार्ग साचलेल्या पाण्यामुळे बंद पडत आहेत.
पावसाची संततधार सुरू होवून अवघे चारच दिवस झाले असतानाच शहरातील बहुतांश रेल्वे स्थानकालगतचे भुयारी मार्ग जलमय झाले आहेत. त्याठिकाणी सुमारे तीन ते चार फूट उंचीपर्यंतचे पाणी साचले आहे. गाडी पकडण्यासाठी घाई गडबडीत येणारे प्रवासी भुयारी मार्गात साचलेले पाणी पाहून संताप व्यक्त करीत आहेत. परंतु स्थानकाबाहेर जाण्यासाठी अथवा आत येण्यासाठी भुयारी मार्गाशिवाय दुसरा पर्याय देखील नसल्यामुळे प्रवाशांना पाण्यातून चाचपडत वाट शोधत दुसरे टोक गाठावे लागत आहे.
वाशी ते ऐरोली या ट्रान्स हार्बर मार्गावरील सहा स्थानकांसह खारघर, खांदेश्वर व पनवेल रेल्वे स्थानकालगतच्या भुयारी मार्गात प्रतिवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती उद्भवत असते. मात्र सुमारे १५ वर्षांचा कालावधी होवून देखील त्यावर ठोस उपाय राबवण्यात प्रशासन अपयशी ठरलेले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी जिवाचा धोका पत्करत दररोज अनेकांना पाण्यातून जावे लागत आहे.
कोपरखैरणेत वाहनांसाठी व पादचाऱ्यांसाठी असलेल्या दोन भुयारी मार्गात भिंत नाही. यामुळे एका ठिकाणी साचलेले पाणी दुसऱ्या मार्गात जावून दोन्ही भुयारी मार्ग पाण्याखाली जातात. यावेळी पाण्याने ठरावीक उंची गाठल्यानंतर वाहनांची रहदारी पूर्णपणे ठप्प होत आहे. यामुळे रहिवासी भागातून ठाणे-बेलापूर मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना घणसोली, कोपरखैरणे दरम्यानच्या महापे पुलाचा पर्याय वापरावा लागत आहे. तर पादचाऱ्यांना पाण्यातूनच अथवा रेल्वे रूळ ओलांडून जिवाचा धोका पत्करावा लागत आहे. अखेर दिवस-रात्र विद्युत मोटर लावून त्याठिकाणी साचलेल्या पाण्याचा उपसा केला जातो. दिवसभर पाऊस असल्यास मशीनमध्येही बिघाड होण्याचे प्रकार घडत आहेत.
>कोपरखैरणे, घणसोली, रबाळे व ऐरोली या रेल्वे स्थानकांच्या भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचले नाही तर प्रवासी आश्चर्य व्यक्त करतील, अशी परिस्थिती आहे. त्यात मागील काही वर्षांपासून सानपाडा भुयारी मार्गातही पाणी साचण्याला सुरवात झाली असून यंदाही दोन दिवस झालेल्या पावसामुळे त्याठिकाणी दोन फुटाएवढे पाणी साचले आहे.
तुर्भे व रबाळे येथील भुयारी मार्ग असूनही ते बंद ठेवण्यात आले आहेत, तर कोपरखैरणे, रबाळे व ऐरोली रेल्वे स्थानकांच्या भुयारी मार्गात देखील हीच परिस्थिती आहे.

Web Title: The underground water of the railway is in the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.