शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी लढा सुरूच ठेवणार- उद्धव ठाकरे
By Admin | Updated: May 7, 2017 21:35 IST2017-05-07T18:49:23+5:302017-05-07T21:35:33+5:30
कोणी काहीही म्हणाले तरी सत्तेत असल्यामुळे शेतकर्यांच्या प्रश्नासाठी मी माझ्याच मार्गाने जाणार, असे स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले

शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी लढा सुरूच ठेवणार- उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 7 - कोणी काहीही म्हणाले तरी सत्तेत असल्यामुळे शेतक-यांच्या प्रश्नासाठी मी माझ्याच मार्गाने जाणार, असे स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते आज औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेला खा.चंद्रकांत खैरे, पालकमंत्री रामदास कदम, शहराध्यक्ष बंडू ओक, यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाड्यातून पक्ष बांधणीसाठी आणि शेतक-यांच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी ठाकरे औरंगाबादेत आले होते. सरकारने शेतक-यांचा अंत पाहू नये, शेतक-यांना कर्जमुक्त करा, अशा आशयाच्या आपल्या सरकारला मागण्या आहेत, असे ते म्हणाले.
शेतक-यांच्या हितासाठी अधिवेशन काळात कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. पण अद्याप त्यांनी तसे कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे ते म्हणाले. पण शेतकरी कर्जमुक्त होणारच ही संकल्पना आपण राबवणार असल्याचे यावेळी ठाकरे म्हणाले. सरकारमधून बाहेर पडण्यासाठी मी आज औरंगाबादेत आलो नसून मराठवाड्यातल्या लाखो शेतक-यांना अद्यापही कर्ज मिळाले नसल्याची खंत ठाकरेंनी व्यक्त केली. सत्तेकडून शेतक-यांना न्याय मिळतो की, नाही हेतपासून आपण पुढचे पाऊल उचलणार असल्याचे ते म्हणाले.
समृद्धी महामार्ग प्रकरणात जर शेतक-यांच्या जमिनी जात असतील तर आपण शेतक-यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि सरकारला जाब विचारू, असे शेवटी ठाकरे म्हणाले. जीएसटीबाबत शिवसेना ठाम असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था एक घटक आहे. त्यांना कर गोळा करण्याचा अधिकार दिला होता तो आता काढला आहे. सर्व शहरांना एकाच तराजूत तोलू नये. प्रत्येक शहराची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. जकातीच्या बाबतीत त्यातील जाचाला विरोध होताच. मुंबईमध्ये रोजचा जकात रोख गोळा व्हायचा. त्याचा हिस्सा बजेटमध्ये मोठा होता. जीएसटी आल्यावर राज्य सरकार, केंद्र शासनाकडे आशाळभूत नजरेने पाहावे लागणार आहे. दरमहा, दरवर्षी जकातीत १ टक्का वाढ व्हायची, ती झालेली नाही. पुढे परालंबित्वता येईल. मुंबई मनपाची साडेतीन हजार कोटींची थकबाकी शासनाकडे आहे. थकबाकी आल्यानंतर जीएसटीबाबत विचार करू. प्रत्येक शहराची स्वायतत्ता कायम ठेवा. ब-याच वर्षांनंतर देशात आणि महाराष्ट्रात सत्तांतर झाले. देशाला हिंदुत्वत्वादी राष्ट्र करायचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर देशाला कणखर राष्ट्रपती पाहिजे. त्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव योग्यच वाटते, असे सेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. देशात अनेक राज्यात राज्यपाल आरआरएसचे कार्यकर्ते झालेले आहेत. माजी कृषिमंत्री शरद पवार राष्ट्रपती होऊ शकतात. असे खा. संजय राऊत म्हणाले होते. याचे स्पष्टीकरण देताना ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांनी त्यांना गुरू मानले आहे. खा. राऊत यांचा तो शाब्दिक वाद होता. परंतु शिवसेनेची भूमिका मोहन भागवतांसोबत आहेत. भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी योग्य आहे.