Uddhav Thackeray on Lockdown: “महाराष्ट्र लॉकडॉऊनच्या उंबरठ्यावर...”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं
By प्रविण मरगळे | Updated: March 11, 2021 22:41 IST2021-03-11T22:34:35+5:302021-03-11T22:41:33+5:30
Coronavirus in Maharashtra, CM Uddhav Thackeray Statement on Lockdown: आज बाधित होणाऱ्या ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत, त्यांना होम क्वारंटाईन होण्यास परवानगी दिली तर ते मला काहीच होत नाही असे वाटून बाहेर फिरतांना दिसत आहेत

Uddhav Thackeray on Lockdown: “महाराष्ट्र लॉकडॉऊनच्या उंबरठ्यावर...”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं
मुंबई – राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यात कोरोना बाधितांची संख्या प्रचंड खाली गेलेली असतांना आता मागील काही दिवसांपासून ती पुन्हा झपाट्याने १२ ते १३ हजार प्रति दिन अशी वाढत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. शासकीय, आरोग्य कर्मचारी कोरोना नियंत्रण, काँटॅक्ट ट्रेसिंग आणि उपचाराच्या कामात गुंतत आहे. आज ही नागरिक कोरोना चाचणी करून घ्यायला घाबरत आहेत. पण तसे न करता नागरिकांनी पुढे येऊन कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले.( CM Uddhav Thackeray Appealed to State people over Corona increase in Maharashtra)
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आज बाधित होणाऱ्या ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत, त्यांना होम क्वारंटाईन होण्यास परवानगी दिली तर ते मला काहीच होत नाही असे वाटून बाहेर फिरतांना दिसत आहेत, त्यामुळे कुटुंबच्या कुटुंब बाधित होतांना दिसत आहेत. त्यांना काही होत नाही पण घरातलीच एखादी व्यक्ती त्यामुळे गंभीर झाली तर काय करणार? असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विचारला
Uddhav Thackeray on MPSC Exam: येत्या आठवडाभरात MPSC परीक्षा घेणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
नाईलाजाने कडक निर्णय
कोरानाची ही लाट वाढू नये, शिखर पातळीवर जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत, आपल्याकडे पुरेशी आरोग्य सुविधा आज तरी उपलब्ध आहे, त्यामुळे लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांना मास्क लावणे, अंतर ठेवणे, हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन करावेच लागेल, लस घेतली तरी ही त्रिसुत्री पाळावी लागेल असेही मुख्यमंत्री म्हणाले
त्याचसोबत राज्य लॉकडॉऊनच्या उंबरठ्यावर असताना जिथे गर्दी होते तिथे कार्यालयांमध्ये, हॉटेल्स आणि अन्य ठिकाणी नवीन बंधने घालावीच लागतील, येत्या काही दिवसात यासंबधीचे निर्णय होतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच आवश्यकता असेल तर शासनाच्या परवानगीने लॉकडॉऊन लावण्याच्या सूचना आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, दुसऱ्या लाटेचा जगभरातील अनुभव फार वाईट आहे, ब्राझीलसारख्या देशात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे, तिकडे हाहाकार झाला आहे. तिथली आरोग्य व्यवस्था कोलमडून पडत आहे. ती परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात अजिबात येऊ द्यायची नाही, आपल्याकडे पुन्हा लॉकडाऊन लागू द्यायचं नाही, त्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त, त्रिसुत्रीचे पालन करून शासनाला सहकार्य करावे असं कळकळीची विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केली आहे.