दोन वर्षांनंतर सात आरोपी निष्पन्न

By Admin | Updated: October 31, 2016 01:38 IST2016-10-31T01:38:33+5:302016-10-31T01:38:33+5:30

स्थानिक गुन्हेगारांच्या वर्चस्ववादातून भोसरीत २०१४ मध्ये अक्षय काटे याचा खून झाला

Two years later, seven accused appeared | दोन वर्षांनंतर सात आरोपी निष्पन्न

दोन वर्षांनंतर सात आरोपी निष्पन्न

पिंपरी : स्थानिक गुन्हेगारांच्या वर्चस्ववादातून भोसरीत २०१४ मध्ये अक्षय काटे याचा खून झाला होता. हा खून ज्या टोळीने केला, त्या टोळीत विकास माळी याचाही सहभाग होता. अक्षयच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शनिवारी भोसरी गव्हाणेवस्ती येथे विकासचा खून झाल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले असून, विकासच्या खुनातील आरोपी निष्पन्न झाले आहेत. प्रमुख सूत्रधार मल्लेश कोळी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भोसरीत अक्षय काटे याचा खून झाला. या खुनातील आरोपींमध्ये आरोपी विकासचा सहभाग होता. अल्पवयीन असल्याने त्याला सुधारगृहात पाठवले होते. काही महिन्यांपूर्वीच तो सुधारगृहातून बाहेर आला होता. अक्षयच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने विकासला धारदार शस्त्राचे वार करून संपविण्यात आले. नुकत्याच झालेल्या या खून प्रकरणात मल्लेश कोळी, शांताराम वाघमारे, शिवमप्रसाद, प्रशांत, अनिकेत ऊर्फ अंड्या, श्रीकांत या आरोपींचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हे सर्व आरोपी भोसरीत राहणारे आहेत. त्यातील आणखी एक आरोपी ज्ञानेश्वर लांडगे हा येरवडा तुरुंगात आहे. विकास माळीचे अक्षय काटेच्या खून प्रकरणानंतर वर्चस्व वाढले आहे. (प्रतिनिधी)
>गुन्हेगारी वर्चस्व वाढल्यास आपल्या टोळीला जड जाऊ शकते. हे लक्षात घेऊन विकासच्या विरोधातील टोळीने त्याला संपविण्याचा निर्णय घेतला. ज्ञानेश्वर लांडगे तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वीच त्याच्या या टोळीने विकासचा गेम केला. खुनाचा बदला खून अशा स्वरूपाची ही भोसरीत घडलेली घटना आहे. भोसरीत स्थानिक गुंडांमध्ये वर्चस्ववाद असल्याचे या घटनेच्या माध्यमातून पुढे आले आहे. महापालिका निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच घडलेल्या या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title: Two years later, seven accused appeared