पटसंख्या शून्य झाल्यामुळे पनवेलमधील तीन शाळा बंद
By Admin | Updated: August 22, 2016 03:11 IST2016-08-22T03:11:11+5:302016-08-22T03:11:11+5:30
पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या तीन शाळांची पटसंख्या शून्य झाल्यामुळे शाळा तात्पुरत्या बंद पडल्या आहेत.

पटसंख्या शून्य झाल्यामुळे पनवेलमधील तीन शाळा बंद
पनवेल : पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या तीन शाळांची पटसंख्या शून्य झाल्यामुळे शाळा तात्पुरत्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांअभावी पनवेल तालुक्यातील मराठी शाळांवर संकट ओढावले आहे.
पनवेल तालुक्यातील चाफेवाडी, चिंचवाडी आणि खंगारपाडा या शाळांची पटसंख्या शून्य झाल्यामुळे या शाळा बंद झाल्या आहेत. चाफेवाडी शाळेतील दोन विद्यार्थी माणगाव येथील आश्रमशाळेत गेले असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली तर चिंचवाडी शाळेतील विद्यार्थी शेजारच्या शाळेत गेले असल्यामुळे या शाळांतील पटसंख्या शून्य झाली आहे. परिणामी तिन्ही शाळा बंद झाल्या आहेत. या तीन शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती अन्य शाळेत पर्यायी शिक्षक म्हणून करण्यात आली आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २६४ शाळा असून एकूण विद्यार्थी संख्या २२,५७७ आहे.
गतवर्षी पनवेल तालुक्यात ४ जुलैला शाळाबाह्य विद्यार्थी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये ५४५ शाळाबाह्य विद्यार्थी सापडले होते.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी संख्येत चालू वर्षी घट झाली असून २०१५ रोजी विद्यार्थी संख्या बावीस हजार आठशे अठरा होती. विद्यार्थी संख्या घटल्यामुळे तालुक्यातील तीन शाळेत शून्य पटसंख्या झाली आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दुर्गम आदिवासी भागातील मुले किमान प्राथमिक शिक्षण घेत आहेत.
तालुक्यातील एकूण २१ केंद्रामधील जवळपास २९ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. यामुळे शासनाच्या नवीन धोरणानुसार २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळा बंद केल्या तर तालुक्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. दहा - पंधरा घरांच्या छोट्या वाड्याची बरीचशी गावे या पनवेल तालुक्यात आहेत. (वार्ताहर)