आदेश झुगारून कोल्हापूरमध्ये टोलवसुली सुरू!
By Admin | Updated: June 17, 2014 03:48 IST2014-06-17T03:48:18+5:302014-06-17T03:48:18+5:30
आज होणार, उद्या होणार, अशी रोज हुलकावणी देत असलेला कोल्हापूर शहरातील वादग्रस्त रस्ते प्रकल्पातील टोल अखेर सोमवारी सायंकाळी ५च्या सुमारास सुरू झाला

आदेश झुगारून कोल्हापूरमध्ये टोलवसुली सुरू!
कोल्हापूर : आज होणार, उद्या होणार, अशी रोज हुलकावणी देत असलेला कोल्हापूर शहरातील वादग्रस्त रस्ते प्रकल्पातील टोल अखेर सोमवारी सायंकाळी ५च्या सुमारास सुरू झाला. राज्य शासनाने रस्ते प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमल्याने ते होईपर्यंत टोलवसुली करू नये, असे कोल्हापूरचे दोन्ही मंत्री अनुक्रमे हसन मुश्रीफ व सतेज पाटील आणि पालकमंत्री हर्षवर्धन पाटील हे सांगत असूनही त्यांच्या नाकावर टिच्चून आयआरबी कंपनीने टोलवसुली सुरू केली.
गेल्या तीन वर्षांत तिसऱ्यांदा टोल सुरू झाला आहे. सायंकाळी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिरोली जकात नाक्यावरील कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले व टोलवसुली बंद पाडली. उर्वरित नाक्यांवर मात्र टोलवसुली सुरू राहिली.
अपुरी कामे असल्याने टोलवसुली करता येणार नाही या मुद्द्यावर टोलविरोधी कृती समितीच्या याचिकेवर २७ फेब्रुवारीस उच्च न्यायालयाने टोलवसुलीस स्थगिती दिली. त्याविरोधात कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने ४ मे रोजी स्थगिती उठवली व जुलैअखेरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय घ्यावा, असे आदेश दिले. परंतु त्या वेळी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने कंपनीने वसुलीचे धाडस केले नव्हते. ती पार पडल्यावर कंपनीच्या हालचाली नेटाने सुरू झाल्या़ परंतु पोलीस बंदोबस्त मिळत नव्हता.
या हालचाली पाहून परवाच ९ जूनला सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने मोर्चा काढला होता. परंतु तरीही कंपनीच्या हालचाली थांबलेल्या नव्हत्या. गेल्या बुधवारीच पोलीस बंदोबस्त दिल्यावर टोलवसुली सुरू करण्याची तयारी कंपनीने केली होती; परंतु त्या दिवशी तो सुरू झाला नाही. त्याच्या आदल्याच दिवशी राज्य शासनाच्या सूचनेवरून रस्ते विकास महामंडळाने रस्ते प्रकल्पाच्या तपासणीसाठी तज्ज्ञ समिती नियुक्त केली. ही समिती अजून पाहणी करण्यासाठी कोल्हापूरला आलेली नाही. दरम्यान, टोल सुरू झाल्याने लोकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. (प्रतिनिधी)