"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:12 IST2025-04-30T13:09:49+5:302025-04-30T13:12:30+5:30
पहलगाम हल्ल्याबाबत केलेल्या विधानावर टीका होत असताना शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
Pahalgam Attack: पहलगाममध्ये २६ निष्पाप लोकांची हत्या झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जगभरातून या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वच राजकीय पक्षांनी कारवाई करण्यासाठी सरकारला पाठिंबा दर्शवला होता. या घटनेवर शरद पवार यांनी केलेल्या विधानाने सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये कितपत सत्य आहे ते मला माहिती नाही, पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्त्रियांना सोडल्याचं दिसतंय असं शरद पवार म्हणाले. आता शरद पवार यांनी त्या विधानावरुन भाष्य केले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शरद पवार यांनी केलेल्या एका विधानावरुन टीका केली जात होती. शरद पवारांनी मतांच्या लांगूलचालनासाठी राजकारण करू नये, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांचे नातेवाईक यामध्ये मारले गेले आहेत त्यांनी काय सांगितलं ते ऐकावं आणि मत मांडावं असे म्हटलं होतं. ठाण्यात पत्रकारांनी याविषयी विचारले असता शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
"त्यात टीकेचा विषय काय होता. कशासाठी टीका केली जातेय. जे काही पहलगामला झालं तो माझ्या मते हा देशावरचा हल्ला आहे. ज्या व्यक्ती यामध्ये शहीद झाल्या त्यांनी देशासाठी किंमत मोजली आहे. त्यामुळे यामध्ये धर्म, जात, पात, भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत. आज भारतीयांवर कुठल्या शक्तींचा हल्ला होत असेल तर देशवासीय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावे लागेल. मी जाहीरपणाने सांगितले होते की देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी जी काय उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आहे. हीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत," असे शरद पवार म्हणाले.
शरद पवारांनी जाणीवपूर्वक ते विधान केले - छगन भुजबळ
"शरद पवार यांना सगळे कळते. कोण काय बोललं हे त्यांना माहिती असते. पाकिस्तानला आपल्याला टक्कर द्यायची असेल तर हिंदू मुस्लीम वाद वाढता कामा नये यासाठी त्यांनी मुद्दाम ती गोष्ट टाळली. तोच पाकिस्तानचा प्रयत्न आहे. कारण आपल्या देशात २२ कोटी मुस्लम असतील. या सगळ्यांबरोबर आपण लढत बसलो तर बाहेरच्या लोकांबरोबर कसे लढणार? म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक तसे वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे त्यांचा निषेध करण्याचा प्रश्न नाही. त्यांना सगळं काही समजतं," असे छगन भुजबळ म्हणाले होते.